Monday, 20 March 2017
या कातरवेळी, पाहिजेस तू जवळी
नेहेमीप्रमाणे आज कट्टयावर सगळे जमले होते खरे पण आज रोजच्या सारखं बिलकुल वाटत नव्हतं. खामकरांची उणीव सर्वांनाच जाणवत होती. शेवटी रेगे म्हणाले, "खामकर नाही तर एकदम चुकल्या चुकल्या सारखं वाटतंय" "हो ना, बिचाऱ्यांची मुलाशी शेवटची भेट झाली असती तर बरं झालं असतं." एक निश्वास सोडून कर्वे म्हणाले. "हे तुम्हाला वाटतंय हो. त्यांच्या मुलाला काही आहे का त्याचं! म्हातार्या आईवडलांना सोडून खुशाल अमेरिकेला जाऊन बसायचं. इकडे म्हातारा म्हातारी असले काय आणि नसले काय, यांचे राजाराणीचे संसार चालू!" देशपांडे संतापून म्हणाले.
"पण मी म्हणतो, या आजकालच्या मुलांना एवढं इंग्लंड अमेरिकेला जाऊनच का राहायचं असतं ? भारतात काही मिळत नाही का?" देशपांडे चिडक्या सुरात म्हणाले.
Tuesday, 14 March 2017
अंजलीची गोष्ट - सेकंड चान्स
ऑपरेशन थिएटरची लिस्ट संपवून अंजली बाहेर आली. अनास्थेटिस्ट बरोबर तिचं केसबद्दल बोलून झालं होतं. आता दोन तास निवांत वेळ होता. पण सकाळपासून उभं राहून ती थकली होती. दुपारचे तीन वाजले होते आणि आत्ता कुठे तिला बसायला फुरसत मिळाली होती. जेवायला जावं की चहाच मागवावा असा विचार करत ती हॉस्पिटल मधल्या तिच्या छोट्याश्या रूम मधे शांत बसली होती. इतक्यात नर्स आत डोकावली. "डॉक्टर एक पेशंट सकाळपासून थांबून आहे. तुम्हालाच भेटायचंय म्हणतोय" "काय मनीषा! आत्ता कुठे मी फ्री झाले आणि लगेच.... कोण आहे?" अंजलीने तक्रारीच्या सुरात विचारलं. "शिर्के, त्याची बायको नाही का गेल्या वर्षी आपल्या वॉर्डला एडमिट होती." नर्सने माहिती पुरवली.
"शिर्के" म्हटल्याबरोबर अंजलीच्या डोळ्यासमोर तो दिवस उभा राहिला. सात आठ महिन्यांपूर्वीची गोष्ट... शिर्के पतीपत्नी अंजलीच्या ओपीडी मधे आले होते.(ओपीडी म्हणजे हॉस्पिटलमध्ये जिथे पहिल्याप्रथम पेशंटला तपासलं जातं). सावित्री शिर्के. वय ४९. हिरडीवर पांढर्या रंगाची पुळी. सतत थोडी थोडी दुख. मामुली उपचारांनी फरक पडेना म्हणून पतीपत्नी हॉस्पिटलला आले होते. सावित्री लोकांकडे धुणीभांडी करत असे. शिर्के पन्नाशीच्या थोडे पुढे . एका घरी ड्रायव्हर म्हणून कामाला होते. अंजलीने सावित्रीची प्राथमिक तपासणी केली. तंबाखूची सवय आणि हल्ली वजन कमी झालंय का ला तिचं हो असं उत्तर! अंजलीच्या मनात संशयाची पाल चुकचुकली.
काही तपासण्या करून घ्यायला सांगून तिने त्यांना एका आठवड्याने रिपोर्ट्स घेऊन बोलावलं. त्यांचे पेपर्स अंजलीने सावित्रीच्या हातात परत दिले . ते नेमके सावित्रीच्या हातातून पडले आणि जमिनीवर पसरले. "नीट धरनबी जमंना. एक गोष्टं हिच्याच्याने नीट हुईल तर!" शिर्के रागावून फटकन बायकोला बोलले. खालच्या वर्गातल्या लोकांचं चारचौघांत बायकोचा अपमान करणं अंजलीला नवीन नव्हतं तरी तिने शिर्केंकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. ते वरमले आणि नवरा बायको रूम मधून बाहेर पडले.
एका आठवड्याने रिपोर्ट्स घेऊन दोघे पुन्हा आले. अंजलीची शंका खरी ठरली होती. सावित्रीला हिरडीचा कॅन्सर झाला होता. सुरुवातीची स्टेज होती पण कॅन्सर नक्की होता. अंजलीच्या घशाशी आवंढा आला. असले डायग्नोसिस पेशंट्सना आणि नातेवाईकांना सांगणं तिला नको वाटत असे. तिने नर्सला मिस्टर शिर्केना आत पाठवायला आणि सावित्रीला बाहेर थांबवून घ्यायला सांगितलं. शिर्के आत आले. समोरच्या खुर्चीत अंग चोरून बसले. त्यांच्या मनावरचं दडपण त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होतं. "काय झालं डाक्टर? रिपोर्टमदी काय लिवलंय?" त्यांनी अधीर होऊन विचारलं. "रिपोर्ट्स फारसे चांगले नाहीयेत, शिर्के. तुमच्या मिसेसना हिरडीचा कॅन्सर झालाय. सुरुवातीची स्टेज आहे. बरं झालं लवकर कळलं. ताबडतोब ट्रीटमेंट सुरु करूया. हे सरकारी हॉस्पिटल आहे त्यामुळे खर्च असा काही फार होणार नाही पण जर तुम्हाला वाटत असेल तर टाटा हॉस्पिटलला नेऊ शकता. मी चिट्ठी लिहून देईन...." अंजली पुढे अजून बोलणार होती. पण तिने बघितलं शिर्केंचे डोळे भरून यायला लागले होते. ती टाटा बद्दल सांगेपर्यंत स्वतःच्या हातांच्या तळव्यांमध्ये चेहरा झाकून शिर्के हमसून हमसून रडत होते. अंजलीचं मन सुन्न झालं. पतीच्या वियोगाचं दुःख तिला ठाऊक होतं. त्यामुळे शिर्केना कसं वाटत असेल याची तिला कल्पना होती. त्यांच्या खांद्यावर हलकंसं थोपटून ती म्हणाली, "तुम्हाला वाटतंय तेवढं वाईट नाही आहे. सुरुवातीची स्टेज आहे. कुठे पुढे पसरल्याचं आत्ता तरी दिसत नाहीये. त्या बर्या होतील" जोरजोरात मान हलवत शिर्के उद्गारले "समदी माझीच चुकी हाए डाक्टर ! माज्याच चुकीमुळे समदं झालंया " धक्कादायक किंवा वाईट डायग्नोसिस ऐकल्यावर लोक इतरांना असंबद्ध वाटेल असं बोलतात हे अंजलीने याआधीसुद्धा पाहिलं होतं. त्यांच्या डोक्यातून असले भलते सलते विचार काढण्यासाठी ती म्हणाली, "हा हिरडीचा कॅन्सर आहे. दुसर्या कोणामुळे होणारा रोग नाही" "मग माझ्याच बायकोला कसा झाला" शिर्केंचा प्रश्न ऐकून अन्जलीच्या मनात विचार आला की दुःखात प्रत्येक माणसाला पडणारा "मलाच हे का?" हा प्रश्न सुखात मात्र कोणालाच पडत नाही.... यांना काय सांगावं ...,"त्या तंबाखू घेतात. तंबाखू हे हिरडीच्या कॅन्सरचं सगळ्यात कॉमन कारण आहे." आता शिर्केंचे हुंदके थांबले होते. "तंबाखू तर मी पन घेतुया. शिवाय बिडी, झालाच तर अधीमधी दारूसुद्धा घेतु म्या. तरी मला न्हाई झालं . तिला झालं. मी सांगतु तिला का झालं. गेल्या साली मला गावाला जायाचं हुतं. पन सुट्टी भेटंना मग म्या सायबाला सांगितलं बायकू बिमार हाये. त्यांनी इचारलं काय झालंया, माज्या तोंडून निघालं क्यान्सर. मालक पार गपगार. लागल तेव्हा सुट्टी घेत जा, नीट दवापानी कर म्हनला. मग काय कधी मधी मी सुट्ट्या मारायचो, जादा पैसे मागायचो. तिच्या क्यान्सरच्या नावानं पैसं घेऊन म्या दारू पिली , तीनपत्ती खेळलू.... काय न्हाई केलं इचारा... !" शिर्केंच्या डोळ्यातून घळाघळा पाणी येत होतं. "माजी म्हातारी सांगायची वंगाळ बोलू नगस. 'तो' वरून बघत असतुया. आणि मी तिलाच वरडायचो , गप बस्स म्हातारे म्हनून. न म्हातारी व्हती तेव्हा तिच्याशी, ना ही आहे तर हिच्याशी, कंदी सरळ तोंडाने बातच न्हाई केली. सदा हाडतूड केलं. हिच्या बापानं लग्नात फार पैसं न्हाई दिलं . आता माजी पोरं लग्नाची झाली तरी हिच्या मायबापाशी कधी धड न्हाई बोललो मी. कुठचंच सुख न्हाई दिलं हिला आनि आता तर असं वंगाळ बोलून हिचा जीवच घेतला म्या!"
अंजली स्तब्ध झाली. हा निव्वळ योगायोगच होता हे तिला ठाऊक होतं. पण तिची आईसुद्धा तिला सांगत असे, नेहेमी चांगलं बोलावं , 'वास्तू करी तथास्तु!'. तिने तो विचार थांबवला. शांत , स्थिर आवाजात ती शिर्केना म्हणाली, "शिर्के , तुम्हाला तुमची चूक कळली ही चांगली गोष्ट आहे. असं समजा की देवाने तुम्हाला एक संधी दिली आहे सुधरायची. सावित्रीचा कॅन्सर अगदी सुरुवातीच्या स्टेजचा आहे. कॅन्सर स्पेशालिस्ट तुम्हाला सगळं समजावून सांगतीलच. रेडिओथेरपी घ्यावी लागेल. कदाचित ऑपरेशन. बोलणं थोडं अफेक्ट होऊ शकतं पण जीव नक्की वाचेल. या गेल्या पाच मिनिटांत ज्या ज्या गोष्टींचा पश्चात्ताप झाला ना तुम्हाला तसा तो परत करावा लागणार नाही एवढीच काळजी घ्या. त्या बर्या होतील." "नक्की ना डाक्टर?" शिर्केनी डोळे पुसून विचारलं. "हो नक्की. १०८ टक्के. अंजलीने म्हटलं. शिर्केनी हात जोडून ते कपाळापर्यंत वर नेऊन देवाला करावा तसा तिला नमस्कार केला. पुढे अंजलीकडून चिठ्ठी घेऊन ते टाटा हॉस्पिटलला गेले. तिथून त्यांनी सावित्रीची ट्रीटमेंट पूर्ण करून घेतली.
आज बर्याच महिन्यांनी शिर्के पतीपत्नी पुन्हा आले होते. दोघांचेही चेहरे आनंदी होते. सावित्रीचा कॅन्सर पूर्ण बरा झाला होता. ते खोलीत आल्यावर शिर्केनी सावित्रीला खुर्चीत बसू दिलं. ते स्वतः उभे राहिले. टाटा मधून मिळालेले डिस्चार्ज पेपर्स त्यांनी अंजलीला दाखवले. अंजलीला मनापासून आनंद झाला. "काय मग सावित्री, बरं वाटतंय ना आता? त्रास गेला ना पूर्ण?" "व्हय डाक्टर तुम्ही ह्यास्नी ग्यारंटी दिलेली !! हे नेहेमी मला सांगायचे, डाक्टरणीने सांगितलंय तू बरी व्हशील. १०८ टक्क्याची ग्यारंटी दिलेली हाये. तसंच झालं बगा . तुम्ही ह्यास्नीपन काई दवा दिली कांय? अक्षी बदलून गेले जनू...." सावित्रीने हसून विचारलं. अंजलीने फक्त हसून त्या दोघांकडे पाहिलं . त्या दोघांसाठी तिला मनोमन आनंद झाला. तिचा निरोप घेऊ शिर्के पतीपत्नी हॉस्पिटल मधून निघाले. आजार एकाचा होता आणि ट्रीटमेंट दोघांची झाली होती.
डाॅ. माधुरी ठाकुर
Wednesday, 8 March 2017
Women's Day
I woke up this morning and as usual checked some messages on the mobile. Whatsapp was flooded with women's day messages. I smiled and thought what difference does it really make...... I still have to get out of my bed, give boys their breakfast, go to work, cook, clean so what exactly is going to happen differently..... what good thing is going to come my way because it is women's day.... then why do we even have these days.... these celebrations.... even Indian culture has it, guru-poornima, deep amavasya, polaa so what is the purpose???
And then suddenly I realised that I was looking at women's day from the wrong angle. Rather than thinking what will I GET, I should have thought what can I GIVE. It is a day to remind myself of all those women who have influenced my life. Being grateful to them. Telling them that they have influenced my life in such a positive way, that they have done a fantastic job and I am so lucky to have them as a part of my life. May this be my mother, my Gurumata Nandai, my teachers, inspirational personalities such as Sudha Moorthy, Mother Teresa from whom I am learning so much.... and of course all of you lovely friends!!
So here I am telling you that YOU are very important to me. I may not say this often but I really love you, adore you. You are in my thoughts and prayers.... on this women's day and always.....
Your
Madhuri
And then suddenly I realised that I was looking at women's day from the wrong angle. Rather than thinking what will I GET, I should have thought what can I GIVE. It is a day to remind myself of all those women who have influenced my life. Being grateful to them. Telling them that they have influenced my life in such a positive way, that they have done a fantastic job and I am so lucky to have them as a part of my life. May this be my mother, my Gurumata Nandai, my teachers, inspirational personalities such as Sudha Moorthy, Mother Teresa from whom I am learning so much.... and of course all of you lovely friends!!
So here I am telling you that YOU are very important to me. I may not say this often but I really love you, adore you. You are in my thoughts and prayers.... on this women's day and always.....
Your
Madhuri
Dr Madhuri Thakur
Monday, 6 March 2017
अंजलीची गोष्ट - थेरपी
दादरसारख्या बिझी ठिकाणी त्या क्लीनिकचा पत्ता शोधणं थोडं अवघडच होतं पण शेवटी ती तिथे पोहोचली.
"पण ते सायकियाट्रिस्ट आहेत की सायकॉलॉजिस्ट ?" अंजली नाना सबबी शोधत होती. "तुझ्या बाबांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे हीच त्यांची डिग्री समज" बाबांच्या या बोलण्यावर आता काही उत्तरच नव्हतं. "प्लासिबो इफेक्ट (मनाच्या समाधानासाठी केल्या जाणार्या, खरंतर औषध नसलेल्या, अश्या गोष्टी) मेडिसिनसुद्धा मान्य करतंच ना!" अशी अंजलीने स्वतःच्या मनाची समजूत घातली आणि हो ना करत ती डॉक्टर दीक्षितांना भेटायला तयार झाली.
आशिषला जाऊन वर्ष झालं होतं. अंजली आता तशी सावरली होती. खरं तर रिया असल्यामुळे तिला सावरण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. ती थकून जाईपर्यंत स्वतःला कामात बुडवून घेत असे पण कितीही थकली तरीही रात्री आडवं पडल्यावर तिला झोप येत नसे. खूपदा पहाटेच जाग येई. भूक लागत नसे. एक विचित्र एकटेपण, रिकामपण तिला खायला उठत असे. आपल्यात डिप्रेशनची लक्षणं दिसताहेत हे तिला कळत होतं आणि तिच्या आईवडलांच्या नजरेतूनही ते सुटलं नव्हतं. त्यामुळेच शेवटी त्यांच्या हट्टामुळे तिने डॉक्टर दीक्षितांना भेटायला हो म्हटलं. "पण मी एकटीच जाईन. एकटी असेन तर मला जास्त मोकळं वाटेल" असं तिने अगदी निग्रहाने सांगितलं. शेवटी हो ना करत आज अंजली त्या क्लिनिकपर्यंत आली.
नेहेमीप्रमाणे ती वेळेआधी दहा मिनिटं पोहोचली होती. रिसेप्शनिस्टकडे नाव देऊन ती वेटिंग रूममधे सोफ्यावर जाऊन बसली. नेहेमी वेटिंग रूमच्या 'त्या' बाजूला बसणार्या तिला आज 'या पेशंट्सच्या' बाजूला बसताना थोडं विचित्रच वाटत होतं. "माझ्या परिस्थितीतल्या कोणत्याही बाईला असंच वाटेल. त्यासाठी काउन्सेलिंगची काय गरज! बाबा म्हणजे.." तिच्या विचारांची तंद्री अचानक भंगली. तिने कान देऊन परत ऐकलं तर खरंच धीम्या आवाजात 'रामरक्षा' ऐकू येत होती.
'रामरक्षाम् पठेत् प्राज्ञः पापघ्नीम सर्व कामदाम्
शिरो मे राघवः पातु भालम् दशरथात्मजः '
तिच्या नकळत रेकॉर्डबरोबर तीसुद्धा मनात ते श्लोक म्हणू लागली.... ही पूर्ण होईपर्यंत आपल्याला आत बोलावू नये असा विचार तिच्या मनात एकदा आला. "आत न जायला काहीही कारणं !!" तिचं दुसरं मन तिलाच हसलं. खरंच किती वर्ष झाली ना रामरक्षा ऐकल्याला, म्हटल्याला. लहानपणी बाबा म्हणत असत, माझ्याकडून सुद्धा पाठ करून घेतली होती. जुने फोटो बघताना जसा आनंद होतो तसा अनामिक आनंद अंजलीला झाला. रामरक्षा संपली आणि तेवढ्यातच तिला आतून बोलावणं आलं.
थोडी नर्वस होऊन ती आत गेली. "हे डॉक्टर तर फार वयस्कर दिसतायत! यांच्याशी मी कशी बरं मोकळेपणाने बोलणार? माझ्या मनाचे प्रॉब्लेम यांना कसे समजणार! अश्या विचारांत ती डॉक्टर दीक्षितांसमोर खुर्चीत बसली. सुरुवातीच्या औपचारिक बोलण्यानंतर अंजलीनेच मुद्द्याला हात घातला. "मला स्वतःला दिसतंय की मला डिप्रेशन आलय आणि त्यात काही विचित्र नाहीये ना! यातून बाहेर पडायला थोडा वेळ लागणारच ना ?" अंजलीने होकारच्या अपेक्षेने डॉक्टर दीक्षितांकडे पाहिलं. ते लक्षपूर्वक सगळं ऐकत होते. क्षणभर विचार करून ते म्हणाले, "तुला डिप्रेशन येतंय हे तुलाही माहितीये आणि मलाही. आणि तुला अँटिडिप्रेसंट्स् मी लगेच प्रिस्क्राईब करू शकतो. पण तुझ्या बाबतीत तसं करू नये असं मला वाटतं. तुला पुढचा एखाद तास वेळ असेल तर तू इथे थांब. तू काही केसेस बघाव्यास असं मला वाटतं. but I can understand if you have other commitments."
"ठीक आहे. थांबते मी." अंजलीने आपल्या सेक्रेटरीला फोन केला. दिवसाच्या वेळापत्रकात फेरफार केला आणि ती परत क्लिनिकमधे आली. डॉक्टर दीक्षितांच्या सेक्रेटरीने अंजलीकडून कॉन्फिडेन्शिअॅलीटी क्लॉजवर सही, पेशंट्सना डॉक्टरांबरोबर अजून एक ओब्जर्वर असणार आहे याची कल्पना देणां वगैरे सोपस्कार पूर्ण केले. दीक्षितांनी सांगितल्याप्रमाणे अंजलीला शांतपि्, काहीही न बोलता रूममधे राहून फक्त ओब्जर्व करायचं होतं. दीक्षितांनी तिला केसची पार्श्वभूमी सांगितली. अतिशय गरिबीत वाढलेला मनोहर, कसंबसं शिक्षण, साधीशी नोकरी, झोपडपट्टी ते चाळीची खोली या आयुष्याच्या प्रवासात कधीतरी मनोहर एका मित्राच्या घरी गेला. त्याचा एक करोडचा फ्लॅट बघून मनोहरच्या मनावर काय परिणाम झाला ते त्यालाच ठाऊक पण आपण अस्साच फ्लॅट घ्यायचा असा त्याने निश्चय केला. नोकरी करणारी बायको मिळाली तेव्हा आपल्या गाडीला डबल इंजिन आल्यासारखं त्याला वाटलं. पण त्याची मिळकत, खर्च आणि एक करोड ह्यांचं गणित काही मिळत नव्हतं. ह्याला पै न पै वाचवायची होती. बायकोला हौसमौज करायची होती. पाळणा हलला आणि गणित पारच बिनसलं. पैसे पुरेनात, शिल्लक दूरच राहिली. गावची जमीन विकू, तुझे दागिने विकू, लोन काढू आणि तो फ्लॅट घेऊ..... बायकोसकट सगळ्यांना मनोहर वेडा वाटायला लागला होता. आणि आपलं स्वप्न कोणालाच समजत नाही म्हणून मनोहर अधिकाधिक फ्रस्ट्रेट होऊन अजूनच विचित्र वागू लागला होता. कुटुंब दुभंगलं होतं.
मनोहर आत आला. चाळीशीचा असेल पण खांदे पडलेले, चेहरा उतरलेला त्यामुळे वयापेक्षा मोठा वाटत होता. डॉक्टर दीक्षितांसमोर त्याने तीच कहाणी उगाळली.
"मनोहर, वेगवेगळ्या स्टेजमधे कुटुंबाच्या वेगवेगळ्या गरजा असतात. तुमचं तुमच्या रहात्या घरात भागतंय. मुलगी वयाने लहान आहे. तिच्या शिक्षणासाठी वगैरे पैसे हवेत ना? शिवाय तुमच्या मिसेसना तुम्हाला पटवून देता येत नाहीये की हा फ्लॅट घेणं का आवश्यक आहे मग त्या तुम्हाला कॉऑपरेट कशा करणार "दीक्षितांनी मनोहरला प्रश्न केला.
"सगळं पटत असेल तर कोणीही कॉऑपरेट करेल. त्यासाठी बायकोच कशाला हवी! नवरा बायकोनी एकमेकांचं नाही पटलं तरीही कॉऑपरेट करायला हवं ना?"
"पण असा विचार तुम्ही तुमच्या मिसेस साठी करता का?"
"मीसुद्धा करेन ना. पण तिच्याकडे निश्चित असा काही प्लॅन नाहीये. आज हे हवं , उद्या ते हवं. माझं कसं, गेली आठ वर्षं नक्की आहे. तिथे फ्लॅट घ्यायचा मग मी पूर्ण आयुष्य आनंदात काढणार आहे."
मनोहरचं बोलणं ऐकून अंजली हतबुद्ध झाली. मनोहर गेल्यावर डॉक्टर दीक्षितांनी तिच्याकडे वळून विचारलं , "सो डॉक्टर, तो फ्लॅट जर कधी याने घेतलाच तर त्यानंतर हा आनंदी होईल असं वाटत का तुला?" "ऑफकोर्स नॉट !" अंजलीने क्षणभरही वेळ ना लावता उत्तर दिलं.
"बरोबर बोललीस. या फ्लॅटच्या वेडापायी त्याने आधीच कुटुंब गमावलंय . अमूक एका गोष्टीवर आपलं सुख अवलंबून आहे असा माणसांचा ठाम विश्वास असतो. असलं लॉलीपॉप दाखवून आपलं मन आपल्याला पळवत असतं. असा फ्लॅट घेतला की, अशी नोकरी मिळाली की, अशी छोकरी मिळाली की, फॉरेन ट्रिप केली की, मुलाला मुलगा झाला की.... न संपणारी लिस्ट आहे ही. डेस्टिनेशनचा हेका धरून प्रवासाचा सगळा आनंद नासवून टाकतो आपण. आणि हेच अंजली उलट, दुःखाच्या बाबतीतही लागू आहे. नोकरी नाही म्हणून दुःख आहे, आजार आहे म्हणून दुःख आहे, आशिष गेला म्हणून दुःख आहे.... नाही.... तू धरून ठेवलंयस म्हणून दुःख आहे! हे दुःखाचं गाठोडं तू तुझ्या इच्छेने तुझ्या डोक्यावर ठेवलंयस"
"मी माझ्या इच्छेने?" अंजलीने आश्चर्याने विचारलं. तिचे डोळे भरून आले.
"हो..." तितक्याच स्थिर आवाजात डॉक्टर दीक्षितांनी म्हटलं, "जाणारा गेला. तिथे तुझ्या इच्छेचा प्रश्नच नव्हता. पण आता ते दुःख धरून बसायचं की उठून पुढे चालू लागायचं हे तुझ्या इच्छेवर अवलंबून आहे."
"पण मी परत जगायला लागलेच आहे. हॉस्पिटलला जाते. क्लिनिक करते" अंजलीचा आवाज रडवेला झाला होता.
"जगते आहेस की ढकलते आहेस? त्याला जाऊन एक वर्ष झालं. आता तू थोडी सावरलीस. दहा वर्षांनी पूर्ण सावरशील. पण मग ही दहा वर्ष अशीच वाया का घालवायची? तुझी, तुझ्या मुलीची, आईवडलांची प्रत्येकाची दहा वर्ष! जे दुःख दहा वर्षांनी हळूहळू फिकं होणारच आहे ते आताच टाकून दे. आठवणी टाकायला नाही म्हणत मी. त्या ठेव पण त्यांना दुःखाचं निमित्त नको करुस. तुझ्या मनाचा रथ तुझ्या विचारांच्या ताब्यात घे अंजली. त्याला भरकटू नको देऊस . स्वतःच्या मनाला शक्ती दे मग त्या शक्तीला राम म्हण , सद्गुरू म्हण किंवा काही निर्गुण निराकार शक्ती म्हण . मेडिटेट करतेस का? That will help you . तुला कशात आनंद मिळतो ते स्वतःच्या आत शोध. मुलीबरोबर, आईवडलांबरोबर वेळ घालव. गाणी ऐक, पुस्तकं वाच. लोकांना भेट. ज्या ज्या गोष्टीनी तुला बरं वाटतं ते कर. क्लिनिक नि पेशंट्सचं कारण अजिबात देऊ नकोस. आता भरपूर काम करूनसुद्धा खुश नाहीयेस ना तू? मग स्वतःसाठी वेळ देताना थोडं कमी काम केलंस तरी काही आभाळ कोसळणार नाही. आणि लक्षात ठेव जगात डॉक्टर खूप आहेत पण तुझ्या मुलीला एकच आई आहे.... त्या आईला आनंदात ठेवण्याची जबाबदारी तुझ्यावर आहे. अंजली, तुला गोळ्याबिळ्या प्रिस्क्राइब करत नाहीये मी. एकच बिहेविअरल थेरपी सांगतो, दिवसभरात अधून मधून डाव्या हाताची चाफेकळी उजव्या हाताच्या बोटांमधे पकडायची , लहान मुलं आईचं बोट पकडतात तशी , आणि मनात म्हणायचं - आजचा दिवस किती छान आहे !" अंजलीने होकारार्थी मान डोलावली .
रिसेप्शनिस्टला थँक्यू म्हणून अंजली बाहेर पडत होती. तिने पुन्हा ऐकलं . आताही बारीक आवाजात रेकॉर्ड चालू होती.
'आनंदाचे कोटी । साठविल्या आम्हा पोटी ।
आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदचि अंग, आनंदाचे ।।
आधी रामरक्षा आणि आता तुकोबांचे अभंग ! हे क्लिनिक आहे की मंदिर या विचाराने तिच्या चेहऱ्यावर छोटंसं हसू उमटलं आणि सहजच तिच्या मनात विचार आला "आजचा दिवस खरंच छान आहे'.
डॉ. माधुरी ठाकुर
Monday, 27 February 2017
अंजलीची गोष्ट - रिप्लाय
"हो बोल. सगळं आटपलंय . रात्र झालीये इथे. तू घरी चाललीयेस का?" अंजली
"हो" मनस्वी म्हणाली. दोघीनाही घरी जाताना ऑन द वे एकमेकींना फोन करायची सवय होती.
"ब्लूटूथ वर बोलतेयस ना, ड्राईव्ह करताना हातात नको घेऊ हं फोन !" अंजली.
"हो ग. ब्लूटूथवरच बोलतेय. ऐक ना. स्वप्नीलचा मेसेज आलाय व्हॉट्स अँपवर." मनस्वीला पाल्हाळ लावायची सवयच नव्हती. डायरेक्ट मुद्द्यावर! "स्वप्नील आठवतो ना? माझ्याबरोबर इंजिनीरिंगला होता" तिने थोडं बिचकत विचारलं.
"हो आठवतो.... इतक्या वर्षांत कधी बोलणं नाही झालं त्याच्याबद्दल. कुठे असतो तो?आणि मेसेज का केला होता?" अंजलीने विचारलं.
" बँगलोरला असतो तो. आम्ही अजिबात टचमधे नव्हतो. दोनचार वर्षांपूर्वी कधीतरी त्याने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. तीसुद्धा मी डिक्लाईन केली होती. पण आजकाल सगळे रियुनियनचे वारे वाहातायत ना त्यामुळे इथून तिथून कॉन्टॅक्ट डीटेल्स मिळाले असतील." .....मनस्वी
"हं ....काय म्हणतोय तो?" अंजली.
"मोठ्ठा मेसेज आहे. त्याचंही लग्न वगैरे झालंय. मुलं आहेत. आणि तरी म्हणतोय की मी तुला आयुष्यभर कधी विसरू शकणार नाही. लाईफ पार्टनर होण्याचा आपला चान्स तर गेला. आता किमान गुड फ्रेंड्स म्हणून तरी राहूया. फोनवर टचमधे राहूया असं म्हटलंय त्याने" मनस्वी.
"मग तू काय करणार आहेस? आणि ऋषिकेशची काय रिएक्शन?" मनस्वीच्या बाबतीत ऋषीला सांगितलंस का हा प्रश्न व्हॅलिडच नव्हता हे अंजलीला चांगलच ठाऊक होतं.
"तो तर काय नावाप्रमाणे ऋषीच आहे. त्याला या सगळ्याचं काही वाटतं असं वाटतच नाही. My love should not tie you down. It should liberate you.... असं काय काय बडबडत होता" मनस्वीने थोडंसं वैतागून म्हटलं.
"तुला आनंद व्हायला पाहिजे तुझा नवरा टीपीकल ऑर्थोडॉक्स नाहीये म्हणून!" अंजलीने हसून म्हटलं.
"आनंद आहेच गं. आमच्या लग्नाला आता पंधरा वर्ष झाली. सुरुवातीची कितीतरी वर्ष माझा ऋषीवर विश्वासच नव्हता. अगदी लव्ह मॅरेज असूनसुद्धा. अधून मधून त्याचा खिसा चेक कर, फोन चेक कर, झालंच तर इमेलसुद्धा चेक कर, असं सगळं मी करत असे. बर्याच उशिरा मला कळलं की मी त्याला सारखं तपासतेय कारण 'त्याचं काही आहे' असं नाही तर मीच माझ्या मनात इन्सिक्युअर आहे. मग प्रयत्नपूर्वक सगळं बंद केलं आणि माझंच मला इतकं पीसफुल वाटायला लागलं!"... मनस्वी.
"मग स्वपनीलला सांगून टाक की ऋषीसारखा नवरा असताना आणखी वेगळ्या मित्रांची गरजच नाहीये मला म्हणून!" ...अंजली.
"अगदी खरं आहे. ऋषी लग्ना आधी माझा मित्र होता. आणि लग्नानंतरसुद्धा नवरा बायकोच्या नात्याबरोबर आमच्यात मैत्री आहेच. पण समजा ऋषीच्या जागी एखादा खडूस नवरा असता तरीही मी लगेच जुन्या मित्राकडे गेले असते का? जुन्या नात्यामध्ये तेवढं बळ असतं तर तेव्हाच ते नातं तुटलं नसतं ना? मग जे टिकू शकत नाही म्हणून तोडलं ते धरून ठेवण्याचा अट्टाहास कशाला? तुटलं... तुटलं.... आता सोडून दिलं पाहिजे ना?" ....मनस्वी.
"बरोबर आहे. मला वाटतं बायका बहुतेक वेळा त्यांच्या संसारात साखरेसारख्या विरघळून जातात. नवरा, मुलं, घर, संसार आणि सगळं सांभाळून झालंच तर स्वतःचं करिअर हेच त्यांच्यासाठी विश्व बनून जातं . त्यामुळे या असल्या जुन्या गोष्टी उगाळण्याची गरजच रहात नाही त्यांना. स्वप्नील सारखे पुरुष मात्र भरल्या संसारात असूनही नर्मदेतले गोटेच रहातात ..... मग आता तू नो थँक्यू चा रिप्लाय करणार की रिप्लाय करणारच नाही?" ....अंजली
"तेच कन्फ्युज होतंय. खरं सांगू, जर कोणी मला आधी सांगितलं असतं की चाळीशी येऊ घातली असताना मला असा "तुला विसरू शकत नाही" वाला मेसेज येईल तर मला वाटलं असतं की मला छान थोडं फ्लॅटर्ड वाटेल, अजूनही आपले चाहते आहेत म्हणून! पण इथे तर उलट मला का कोण जाणे गिल्टीच वाटतंय." ....मनस्वी.
"मनू, तू तिथे लंडनला रहा, जीन्स घाल नि काहीही कर. मनातून तू तीच सरळ साधी मनस्वी आहेस. हे गिल्टबिल्ट सोडून दे. सीता काही रावणाला टेम्प्ट करायला गेली नव्हती तरीही सीताहरण झालंच ना? पुरुषांच्या ढिल्या कॅरॅक्टरसाठी स्वतःला गिल्टी का वाटून घ्यायचं आपण? नात्यांमध्ये ऑनेस्ट राहणं महत्वाचं आहे. ते तर तू आणि ऋषी आहेत ना! मग गिल्ट कशाला !" ...... अंजली
"बरोबर आहे तुझं ! थँक्स फॉर टॉकिंग! बरं वाटलं बोलून. चल मी घरी पोहोचतेय . आता मुलं येऊन चिकटतील. नंतर बोलूया?"... मनस्वी
"हो शुअर " अंजलीने फोन ठेवला.
मनस्वी घरी शिरली. ऋषी ऑफिस मधून येताना मुलांना घेऊनच आला होता. एकदा घरात शिरल्यावर स्वप्नीलच्या मेसेजची आठवणही तिच्या मनातून हद्दपार झाली.
बँगलोरच्या ऑफिसमध्ये ओव्हर टाइम करत बसलेल्या स्वप्नीलने निघण्यापूर्वी पुन्हा एकदा आपला मोबाईल चेक केला. आधीच्या शेकडो वेळांप्रमाणे आता सुद्धा रिप्लाय आला नव्हता.
डाॅ. माधुरी ठाकुर
Tuesday, 21 February 2017
द विनर इज ..... (अनुभव)
स्पोर्ट्स डे म्हटलं की माझं मन भूतकाळात जातं. मला माझ्या पार्ल्याच्या शाळेतले स्पोर्ट्स डे आठवतात.... रनिंग रेस, चमचागोटी, रिले अशा शर्यती आणि त्यानंतर विजेत्यांना लाकडी पोडियमवर उभं राहून मेडल.... अजूनही सगळं माझ्या डोळ्यांसमोर उभं राहतं.
माझा मुलगा जेव्हा पहिलीत गेला तेव्हा बर्याच वर्षांनी पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात स्पोर्ट्स डे आला. युकेमधल्या अॅबरडीनमधे आम्ही रहातो. चकचकीत उन्हाचा उबदार दिवस म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच असते. तर असा छानसा दिवस होता. शाळेबाहेरच्या मोठ्या ग्राउंडवर उत्साहाने भरलेली, बागडणारी, फुलपाखरांसारखी मुलं आणि आपल्या पिल्लाना बघायला अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन आलेले बहुसंख्य पालक....
भरपूर मोठी जागा असल्याने एकाच वेळी वेगवेगळ्या वर्गांच्या वेगवेगळ्या रेसेस चालू होत्या. माझ्या मुलाच्या वर्गाची रेस जिथे चालू होती तिथे इतर पालकांसोबत मी उभी होते. धावणं, डोक्यावर पुस्तक घेऊन धावणं, सॅक रेस अशा वेगवेगळ्या शर्यती झाल्या पण गम्मत म्हणजे कुठेच विनर्सचं विशेष कौतुक नव्हतं. प्रत्येकालाच रेस पूर्ण झाली की टीचर शाबासकी देऊन स्टिकर देत होत्या. पहिलं, दुसरं आणि तिसरं येणार्याला अजून एक स्टिकर मिळत होता एवढंच! पालकही टाळ्या वाजवून मुलांना प्रोत्साहन देत होते पण ज्या चुरस, चढाओढीची मला अपेक्षा होती, तशी काही नव्हती. हार जीत काही नाहीच.... नुसता उत्साह आणि आनंद.... पेप्पा पिगच्या एपिसोडमधलं "व्हॉट'स इम्पॉर्टन्ट इज टेकिंग पार्ट" (हारजीत नाही, तर भाग घेणं , प्रयत्न करणं महत्वाचं आहे) हे, हे लोक खर्या अर्थाने आयुष्यात उतरवतात.मग एक गम्मत झाली. मोठ्या भावाला बघायला आलेला एक छोटासा तीनेक वर्षांचा मुलगा प्रत्येक रेसमधे जाऊन पळायला बघत होता. तो अजून शाळेतही जात नव्हता पण आता सगळ्यांना बघून त्यालासुद्धा भाग घ्यायची फार हौस वाटत होती. त्याची आई त्याला "अजून तू लहान आहेस, ही शाळेतल्या मुलांची रेस आहे" वगैरे समजावत होती पण तो ते काही फारसं मनावर घेत नव्हता. तेव्हा टीचरने एका बाजूला त्या छोट्या मुलाला, त्याच्या भावाला आणि अजून दोनतीन मुलांना घेऊन एक इन्फॉर्मल रेस घेतली आणि अजून शाळेतही नसलेल्या या मुलाला त्या रेसमधे पळू दिलं. बरोबरीची ती दोनतीन मुलं फास्ट पळाली पण त्या छोट्याचा पाच वर्षांचा दादा मात्र मुद्दाम स्लो मोशन मधे पळत होता. कारण त्याला त्याच्या छोट्या भावाने शेवटी एकटं मागे रहायला नको होतं! रेसमधे भाग घेता आला , स्टिकरही मिळाला. ते पिल्लू एवढं खूष झालं की बघायला नको...
माझ्या मुलाच्या पहिलीच्या वर्गात एक मुलगी आहे. तिचे दोन्ही पाय गुढग्याखाली अधू आहेत. ती क्रचेस (कुबड्या) किंवा व्हीलचेअर वापरते. तिला वर्गात मदत करायला एक हेल्पर असते. अशा मुलांच्या मदतीसाठी गव्हर्नमेंट कडून शाळेला असे हेल्पर्स मिळतात. तर ही मुलगीसुद्धा क्रचेस घेऊन रेससाठी उभी होती. रेस सुरु झाली. तिची हेल्पर आधारासाठी तिच्यासोबत होती. बाकी मुली पुढे धावल्या. ही अजून अर्ध्यावरच पोहोचली होती. तिचा चेहरा पडला. उत्सफूर्तपणे आम्ही पालकांनी टाळ्या वाजवून "फ्लोरा.... फ्लोरा.... " असं जोरजोरात तिला चीअर करायला सुरुवात केली. तिच्या चेहर्यावर पुन्हा हसू पसरलं. ती नेटाने पुढे जात राहिली. टाळ्या आणि घोषणांनी सारं ग्राउंड दुमदुमलं. फ्लोराने अख्खी रेस पूर्ण केली. टीचरने तिला शाबासकी देऊन स्टिकर दिला. तिचा चेहरा आनंदाने फुलला. तिला तसं बघून तिच्या आईचे डोळे भरून आले. माझ्यासारख्या अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. स्पर्धेचा 'सोहळा' झाला होता. पोडियम नव्हतं , मेडल्स नव्हती तरीही आम्ही सगळेच जिंकलो होतो......
डॉ. माधुरी ठाकुर
Sunday, 19 February 2017
सांगाती (अनुभव)
हे होणार हे मला माहीत होतं पण ती वेळ इतक्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं. तीन वर्षांपासून जिच्याशी माझी घट्ट मैत्री झाली अशी माझी सखी..... ती आता आमचं शहर सोडून जाणार होती. तिचा नवरा दुसर्या शहरी जॉब निमित्त गेला तेव्हा मागोमाग तीसुद्धा जाणार हे गृहीतच होतं. पण एवढ्या लवकर ती वेळ येईल असं वाटलं नव्हतं.
तीन वर्षांपूर्वी एका कॉमन मैत्रिणीच्या घरी आम्ही भेटलो. 'समानशीलेषु सख्यम' या नात्याने आमची वेव्हलेंग्थ लगेच जुळली. ती माझ्यासारख्याच मोकळ्या स्वभावाची, तशीच इमोशनल आणि तेवढीच इंपेशण्ट! तिच्यामध्ये मला, दहा वर्षांपूर्वीची मी वारंवार दिसे. पण माझ्याकडे दहा वर्षांपूर्वी नसलेली एक गोष्ट 'हि'च्यामध्ये या लहान वयातही आहे ती म्हणजे 'सद्गुरुभक्ती'. ती नानासाहेब धर्माधिकारी यांच्या बैठकीला जाणारी आणि मी बापूभक्त. रस्ता वेगवेगळा पण डेस्टिनेशन सेम, सद्गुरुचरण!
माझ्या धाकट्या मुलाला बरं नसताना रात्री तीनला मी तिला हक्काने बोलावून घेतलं होतं , हॉस्पिटलमध्ये माझ्या मुलाला नळ्या लावलेल्या बघताक्षणी तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं.
मैत्री नव्हे निव्वळ देणे
मैत्री म्हणजे वाटून घेणे
मला लागता तुझिया नयनी
आधी अश्रू येणे.....
तर अशी ही माझी सखी आता दूर जाणार होती. मला धाकटी बहीण असती तर ती सासरी जाताना मला जसं वाटलं असतं तसं मला वाटलं.
ग्लोबल व्हिलेजच्या नादात आपण किती सारं गमावतोय या विचाराने माझं मन सुन्न झालं. सारी नातीगोती भारतात ठेऊन मी इथे दूर आले आहे. इथे नवनवीन लोक भेटतात. कधी तारा जुळतात, मैत्र निर्माण होतं आणि होता होता एका लाटेने परत ओंडके दूर व्हावेत तसे सगळे इकडे तिकडे विखुरतात. माझ्या हृदयाचा एक एक तुकडा सोबत घेऊन जातात.
मुलं रडत रडत नेहमी आईकडेच जातात तशीच सुन्न झाले की मीसुद्धा बापूंच्या फोटोपुढे जाते. मी रडत त्यांना म्हटलं, "तुम्ही असे कसे निष्ठुर होता? तुमच्या अश्या करण्यामुळे मला नवीन मैत्री करणं नको वाटतं. माझा जीव गुंतणार आणि तुम्ही ताटातूट करणार. काय अर्थ आहे याला!"
बापू फोटोतच हसून म्हणाले, "अजूनही तुला कळत नाहीये, दर वेळी रडत रडत माझ्याच कडे येतेस, प्रत्येक गोष्ट सांगायला, प्रत्येक गोष्ट मागायला..... आणि तरीही तुझा खरा सांगाती, खरा सोबती कोण आहे ते ओळखत नाहीस.....
सांगाती आहे मी तुमचा निश्चित
तीनही काळी , तीनही लोकांत
विसरलात जरी तुम्ही मज क्वचित
मी नाही विसरणार तुम्हांस निश्चित"
उन्हाचा ताप असह्य व्हावाआणि अचानक वार्याची थंडगार झुळूक अंगावर यावी, तसं मला वाटलं. सद्गुरू चरणांना आठवत छोट्या बाळासारखी मी झोपी गेले. झोपेतही तोच अनाहत नाद माझ्या हृदयात गुंजत होता "खरंच सांगतो बाळांनो मी तुम्हाला कधीच टाकणार नाही.... येस्स"
Subscribe to:
Posts (Atom)






