Monday, 12 June 2017

पारिजात

 

सुन्न मनाने तिने फोन ठेवला. समोरच्या टेबलवर ठेवलेला चहा केव्हाच थंड झाला होता, त्याखालचा सकाळचा पेपर फडफडत होता पण तिला काही सुचत नव्हतं. हुंदकाही येत नव्हता. आतून थिजल्या सारखी ती गोठून गेली होती. अण्णा जाणार हे निश्चितच होतं. त्यांचं वयही झालं होतं. होणार हे माहीत असलं तरी प्रत्यक्षात झाल्यावर गोष्ट मनाला चटका लावून जाते. गायत्रीचही तसंच झालं. अण्णांच्या मागोमाग तिच्या मनात विचार आला माईचा. माई कशी असेल? सावरली असेल का? तिने चटकन माईला फोन लावला. पण कोणी फोन उचललाच नाही.

     माईशी बोलल्यालासुद्धा आता बरेच महिने होऊन गेले होते. दिवाळीत केला होता का शेवटचा फोन, आणि मध्ये एकदा अण्णांच्या तब्बेतीची चौकशी करायला केला होता ना? ती आठवू लागली. गेल्या दीड वर्षात तिच्या स्वतःच्याच आयुष्याची घडी इतकी विस्कटली होती की ती पुन्हा बसवताना या सार्या गोष्टी राहूनच गेल्या होत्या. त्यात माई, अण्णा हे हक्क गाजावणार्यान्पैकीही नव्हते की रुसवे फुगवे धरणार्यान्पैकी. आणि मुंबईला आईबाबांना फोन केला की त्यांची खुशाली कळतच होती की! आता मात्र नुसता फोन नाही तर माईला भेटायलाच जायचं असा तिने निश्चय केला.

     आज रात्रीच अमितशी बोलून तिकिटं बुक करूया असा विचार पक्का केला केला तव्हा कुठे गायत्रीला जरा बरं वाटलं. तिची नजर घडाळ्याकडे गेली. सौम्याला नर्सरीतून आणायची वेळ झाली होती. म्हणजे आजसुद्धा योगा राहीलाच की. काल रात्रीच अमित हसत हसत तिला म्हणाला होता, “योगाबिगा करत जा मॅडम, वजन वाढतंय तुमचं!” त्याच्या त्या हसत हसत मारलेल्या शेर्यामुळेसुद्धा ती दुखावली गेली होती. मुंबईत योगा इन्स्ट्रक्टर म्हणून तिचा बिझनेस नावारूपाला येत होता. रेग्युलर क्लासेस, ट्युशन्स, एखाद दोन सेलिब्रिटी क्लायन्ट्स असा तिचा जम बसू लागला होता. तिचे आईवडील जवळच रहात असल्यामुळे सौम्याचीही व्यवस्थित काळजी घेतली जात होती. पण दीड वर्षापूर्वी अचानक अमितला ही मोठी संधी चालून आली. त्याची कंपनी कार्नाटक मध्ये बिझनेस वाढवण्याचा प्रयत्न करत होती. तिथल्या ऑफिसमधे त्याने जावं आणि ते काम बघावं अशी त्याला वरून सूचना आली.

     “बँगलोर वगैरे ठीक होतं रे, पण हे नल्लूर अगदी कुठच्या कुठे आडगाव आहे!” गायत्री नाखुषीने म्हणाली, “सौम्याचं काय? तिची शाळा?”

“अगं आपल्याला काही तिकडे कायमचं नाही रहायचंय. दोन वर्षांचाच प्रश्न आहे. सौम्या तर लहानच आहे अजून.”

“ते खरय रे पण मला माझे क्लासेस बंद करावे लागतील”

“आय नो..... पण तू तिथेसुद्धा पुन्हा सुरु करू शकतेस ना? आणि बघ ना मी मिडल मॅनेजमेंटवरून हायर मॅनेजमेंटच्या ब्रॅकेटमधे जातोय. फक्त माझ्या करीअरच्याच नाही तर पैशांच्या दृष्टीनेसुद्धा आपल्याला किती चांगलं आहे!” अमितचं म्हणणं खरं होतं. पैशांच्या दृष्टीने चांगलं होतं यात काहीच वाद नव्हता.

“नाहीतर असं करायचं का? तू जा, मी आणि सौम्या दर महिन्याला येऊन तुला भेटत जाऊ किंवा तू अधून मधून येत जा इथे” तिने सुचवून पाहिलं. “चल्, तुला आणि सौम्याला सोडून नाही जाणार मी. जायचं तर एकत्र, नाहीतर मी नाही म्हणून कळवून टाकतो.” अमितच्या या म्हणण्यावर गायत्री वरवर वैतागली तरी मनातून खरतर ती सुखावली होती. नकार कळवणं शक्य असलं तरी प्रायव्हेट कंपन्यांमधे असे नकार पचवले जात नाहीत याची अमित आणि गायत्रीलासुद्धा पूर्ण कल्पना होती.

      हो ना करत तिघे या नवीन गावी आले. गायत्रीला वाटलं होतं त्यापेक्षा सौम्या नल्लूरला फारच चटकन रुळली. अमितसुद्धा कामामुळे बिझी झाला. राहिली गायत्री. घर शोधा, शाळा शोधा, बाजारहाट, दुकानं शोधा यात सुरुवातीचे काही महिने पटकन गेले. त्यांच्या या नव्या घराच्या आसपास रहाणारे सगळे लोक कन्नडच होते. स्थानिक भाषा समजावी, बोलता यावी म्हणून गायत्रीने पुस्तकं आणून कन्नड भाषा शिकायला सुरुवात केली. कामापुरते शब्द यायला लागले असले तरी संवाद करण्याएवढी कन्नड भाषा तिला अजून बोलता येत नव्हती. सौम्या मात्र मित्र मैत्रिणींबरोबर कन्नडात सहज बोलत होती. लहान मुलांना ‘माझं चुकलं तर’ अशी धास्ती फारशी नसते त्यामुळे बर्याच गोष्टी लहान मुलं मोठ्यांपेक्षा पटकन शिकतात. सौम्याचही काहीसं तसच होतं. चटचट तयारी करून गायत्री सौम्याच्या नर्सरीत गेली. मायलेकी चालत चालत घरी पोहचल्या. गायत्रीचं हे घर अगदी ऐसपैस, प्रशस्त होतं. समोर मोठ्ठा व्हरांडा, अंगण. अंगणात गायत्रीने हौसेने दरवाज्याजवळ लावलेला फुलांचा ताटवा छानच बहरला होता. एका बाजूला तिने भाज्यांचा छोटासा वाफाही केला होता. त्यात कढीपत्ता, कोथिंबीर, मेथी असे तिचे प्रयोग चालत.    

      “आई, मृणालिनीने आज वर्गात एक गाणं म्हणून दाखवलं. ती म्युझिक क्लासला जाते तिथे शिकवलं. चारुकेशी सुद्धा जाते. मलासुद्धा त्या क्लासला जायचय” सौम्या सांगत होती. “अगं, त्या कर्नाटकी म्युझिक शिकतात. आपण काही इथे कायम रहाणार नाही. मग तू पुढे कसं कंटिन्यू करणार? काय उपयोग त्याचा?” आईचं म्हणणं सौम्याला काही फारसं पटलं नाही. “पण आत्ता तर आपण इथे आहोत ना! मला जायच्चचे” तिने हट्टाने म्हटलं. “बरं बघू. बाबाशी बोलूया मग ठरवू.” तिने तेवढ्यापुरता विषय टाळला पण ते विचार तिच्या मनात रेंगाळत राहिले. सौम्यासारखं आपल्यालाही सगळे बदल पटपट स्वीकारता आले असते तर किती बरं झालं असतं. आपणही मुंबई सारखा योगा क्लास इथे सुरु करायचा का.... पण भाषेची केवढी अडचण आहे...... इतके चांगले क्लासेस चालू होते आपले.... कशाला आपण अमितला हो म्हटलं इथे यायला. त्याचं ठीक आहे पण माझी ही दोन वर्षं वायाच आहेत ना! नाही म्हणायला इतक्या वर्षानी थोडी उसंत मिळाली. थोडी पुस्तकं वाचली, थोडं पेंटिंग केलं, हा बगीचा फुलवला ....... मग मी नक्की मिस काय करतेय? माझा योगा क्लास? पैसे? स्वतःची ओळख? ...... नुसते प्रश्न, अनुत्तरित प्रश्न ...... मनातल्या या द्वंद्वामुळे गायत्री कोमेजत चालली होती. अमितच्या नजरेतून हे सुटलं नव्हतं. पण त्याचाही नाईलाज होता.

      समोरच्या आय्यन्गारांची गाडी येताना दिसली म्हणजे सहा वाजले असणार. गायत्री घाईघाईने स्वयपाकाला लागली. त्या रात्री तिने अमितला अण्णा, तिचे आजोबा गेल्याचं सांगितलं, आणि माईला भेटण्याची तिची इच्छासुद्धा. कधी नव्हे ती अमितलाही सुट्टी मिळाली आणि दोन दिवसांतच ते तिघेही निघाले, आधी मुंबई आणि मग ते थेट कसालला तिच्या माहेरच्या गावी, माईला भेटायला गेले.   

     कसालचं ते कौलारू घर अजून अगदी तसंच होतं. अंगणात तुळशी वृन्दावन, ओसरी, गप्पा मारत, गोष्टी ऐकत बसायला अंथरलेली ओसरीतली चटई, मोठी पडवी, पडवीतला लाकडी झोपाळा. आतलं माजघर, तिथले दिवे ठेवण्यासाठी भिंतींत असलेले कोनाडे, माजघराच्या वरचं ते काचेचं कौल आणि त्यातून थेट आत येणारा सूर्यप्रकाश. माजघराच्या एका बाजूला असलेली मोठी देवाची खोली. त्या खोलीतला तो उदाबत्तीचा मंद सुगंध, समईचा मिणमिणता प्रकाश आणि शारंगधराच्या मूर्तीपुढे शांतपणे डोळे मिटून समाधीसारखी बसलेली माई......

     बाकी सगळे बाहेरच थांबले आणि गायत्री एकटीच देवघरात माईजवळ गेली. माईच्या खांद्याला तिने हलकासा स्पर्श केला. माईने डोळे उघडून पाहिलं. गायत्रीने तिने वाकून नमस्कार केला आणि मग घट्ट मिठी मारली. तीही काही म्हणाली नाही आणि हिनेही सांत्वन केलं नाही. अश्रूंच्या संवादात शब्द मुके झाले.

     चार दिवस माई बरोबर काढून आता परत जायची वेळ आली. आजची कासालची शेवटची रात्र. उद्या मुंबई आणि दोन दिवसांत पुन्हा नल्लूर. अमित बाहेर पडवीत झोपला होता. सौम्या आणि गायत्री आत खोलीत. रात्री सगळी निरवानिरव झाल्यावर माई गायत्रीच्या खोलीत आली. “ये, आज तुझ्या डोक्याला तेल लाऊन देते.” तिने प्रेमाने म्हटलं. “अगं माई आता काही माझे केस लांब नाहीयेत पूर्वीसारखे.” गायत्रीने म्हटलं. “नसूदे गं, डोक्याला थंड वाटतं” म्हणत माईने बोटानी गायत्रीच्या डोक्यावर तेल चोळायला सुरुवात केली. ते ऊनऊन खोबरेल तेल आणि माईचा तो प्रेमळ स्पर्श, आजीच्या कुशीत गायत्री पुन्हा लहान होऊन गेली. “कसं चाललंय तुझे नव्या जागी? क्लासेस कसे चाल्लेयेत तुझे?” माईने विचारलं. काही बोलायच्या ऐवजी गायत्री हुंदकेच देऊ लागली. “अगं काय झालं? जावईबापू नीट वागतात ना?” माईने काळजीने विचारलं. “हो गं, अमितचं काही नाही. मलाच काही करता येत नाहीये. मुंबईत व्यवस्थित क्लासेस होते माझे पण नल्लूरला काही नाही. तिथे सगळे कानडी, मी कशी बोलणार, कशी शिकवणार आणि अशा गावी शिकायला येणार तरी कोण! काही न करावं तर इतकं गिल्टी वाटतं की काय करत्येय मी आणि तिथे न जावं तर अमितच्या करीअरचं नुकसान होतं. अगदी कात्रीत सापडल्यासारखं वाटतं. असं वाटतं शेवटी माझी ओळख तरी काय आहे?” गायत्रीने एका दमात मनातलं सगळं सांगितलं. माईने प्रेमाने तिच्या डोक्यावर थोपटलं. ती म्हणाली “अगं, संसार म्हटला की थोडंफार इकडे तिकडे होणारच. थोड्या वर्षानी मागे वळून पहाशील तेव्हा तुला स्वतःलाच समाधान वाटेल की तू काही करायचं ठेवलं नाहीस. आणि हे सगळं काही कायम असंच रहाणार नाही. ती गोष्ट आठवते तुला गायत्री, चार आंधळे हातांनी हत्तीला चाचपून बघतात. सोंड धरणारा म्हणतो ही नळी आहे, कानवाला म्हणतो हे सूप आहे, पाय धरणारा म्हणतो हा खांब आहे, आणि शेपूट धरणारा म्हणतो ही तर दोरी आहे. माणसाच्या आयुष्याचंही तेच आहे ग. तू कोणाची मुलगी आहेस, कोणाची बायको, कोणाची आई, एक योगाभ्यास शिकवणारी शिक्षिकाही आहेस. पण ही सारी तुझी अंग आहेत. तू, तू अशी जी आहेस ती या सर्वांच्या पलीकडेसुद्धा आहेसच. खरी गोष्ट अशी आहे की हत्तीला स्वतःला खात्री हवी की तो हत्ती आहे. आंधळे म्हणतात म्हणून जर हत्ती स्वतःला नळी, खांब, सूप, दोरी असं काही समजू लागला तर काय होईल सांग! तू कोण आहेस ते लोकांच्या पारड्यात तोलू नकोस बाळा.... तुझं तू शोध. स्वान्तः सुखाय, स्वतःसाठी शोध. आणि असा शोध घेशील ना, तेव्हा खरच सांगते, तुला तुझी ओळख नक्की सापडेल, अगदी १०८ टक्के.” माईच्या शब्दांनी गायत्रीचं मन शांत झालं. लहान मुलीसारखं माईच्या मांडीत डोकं ठेऊन तिने माईचा हात पुन्हा आपल्या डोक्यावर ठेवला, तिने थोपटावं म्हणून. माई हसून तिला थोपटू लागली. नकळत सवयीने माईने भग्वद्गीतेतले श्लोक पुटपुटायला सुरुवात केली.

“निर्मान मोहा जितसङग दोषा, अध्यात्म नित्या विनिवृत्त कामाः

द्वंद्वैर्विमुक्ताः सुखदुःख सज्ञैर्गच्छन्त मूढाः पदम् अव्ययम् तत्”

झोप आणि जागृतीच्या सीमारेषेवर असलेल्या गायत्रीला अण्णाच आपल्या धीरगंभीर आवाजात श्लोकाचा अर्थ सांगतायत असं वाटू लागलं, “निराभिमानी, निर्मोही, कुसंगातीपासून मुक्त असा जो, ते शाश्वत तत्त्व जाणतो, जो इच्छांचा त्याग करतो, आपपर द्वैताच्या, सुखदुःखाच्या पार आणि मोहरहित असा जो असतो, तोच ते शाश्वत स्थान प्राप्त करतो”

       दुसर्या दिवशी सकाळीच मंडळी मुंबईला परत निघणार होती. सामान गाडीत ठेवणं वगैरे चालू होतं. अंगणात पारिजातकाचा सडा पडला होता. अंगणातल्या काळ्या मातीवर केशरी देठाची ती नाजुक पांढरी फुलं, जणू चान्दण्यांचा सडा. “आई, किती छान आहेत ना!” ती फुलं दाखवून सौम्याने गायत्रीला म्हटलं. “हो गं, आपल्या नल्लूरच्या घरीसुद्धा आहे पारिजात. अजून लहान आहे, मोठा झाला की त्याचासुद्धा असा सडा पडेल” गायत्रीने हसून म्हटलं. “पण आपण असणार का तिथे? आपण तर तिथून परत जाणार ना?” सौम्याने क्लासची गोष्ट आठवून म्हटलं. “तुला आवडत असेल तर राहू की” गायत्रीने असं म्हटल्याबरोबर गाडीत बॅग ठेवणार्या अमितने वळून तिच्याकडे पाहिलं. तिचा शांत, समाधानी चेहरासुद्धा त्या बहरलेल्या पारिजातासारखाच त्याला वाटला.  

 

डॉ. माधुरी ठाकुर

 

 
 
 
 
 
   
 

Tuesday, 16 May 2017

अंजलीची गोष्ट – पुन्हा तिघी


ऑपरेशन थिएटरची लिस्ट संपवून अंजली बाहेर आली. दुपारचे तीन वाजत आले होते. ऑपरेशन्स झालेल्या पेशंट्सना रिकव्हरी रूममध्ये हलवलं जात होतं. त्यांना दोन तासांनंतर बघून मगच घरी जावं की रजिस्ट्रारला कळवायला सांगावं, अशा विचारांत अंजली तिच्या केबीनकडे वळली. नर्सने चहा मागवून ठेवला होता. चहाचा घोट घेत तिने पर्समधून मोबाईल काढला. मोहना आणि शालिनी दोघींचेही मिस्ड कॉल्स दिसत होते. शालिनीचा कॉल आधी आलेला असला तरीही ती मोहनालाच आधी फोन करणार होती. त्यांच्या मैत्रीला तडा जाऊन आता एक वर्ष होत आलं होतं. त्यांच्या मागच्या भेटीनंतर, शालिनीचं, श्रीकांत, मोहन्याच्या नवर्याबरोबरचं अफेअर संपलं होतं पण मैत्री तुटली ती तुटलीच. शालिनीने अंजलीला दोन-तीनदा फोन करून बोलण्याचा प्रयत्न केला. पण अंजलीच्या मनातून ती इतकी उतरली होती की अंजली एकदाही शालिनीशी धड बोलली नाही. आणि बरोबरच होतं म्हणा. असेल पंधरा वर्षांची मैत्री पण दोघीनाही सख्ख्या बहिणीसारखी असणारी तिसरी मैत्रीण मोहना, तिच्याच नवर्याबरोबर म्हणजे.... डिसगास्टिंग !         शालिनीचा विचार झटकून तिने मोहनाला फोन करायला घेतला. “हाय, तू फोन केला होतास? सॉरी माझं ओटी (ऑपरेशन थिएटर) जरा लांबलं.” “हो, श्रुतीचे वडील गेले” मोहनाने एक सुस्कारा सोडून म्हटलं. “किती पटकन गेले! गेल्या महिन्यातच त्यांच्या आजाराचं कळलं होतं,” अंजली आश्चर्याने उद्गारली. “श्रुतीला कळवलं का? ती येतेय? कधी नेणारेत माहितीये?” अंजलीने एकामागे एक प्रश्न विचारले. “तिच्या भावाशी बोलणं झालं माझं. तो म्हणाला श्रुती आधीच निघालीये अमेरिकेहून. रात्री पोहोचेल. तोपर्यंत थांबतील.” मोहनाने उत्तर दिलं. “ओके. मी रियाला आईकडे सोडते आणि पोहोचते. चल भेटू.” “अंजू.....” मोहना अडखळत म्हणाली, “श्रुतीसाठी जायला हवं पण मला नको वाटतंय ग, तिथे शालिनी सुद्धा असणार.” “साहाजिक आहे मोहना पण आता जास्त महत्वाचं काय आहे सांग? शिवाय श्रीकांत तर नाहीच आहे ना मुंबईत!” अंजलीने मोहनाची समजूत काढली. शालिनीने संबंध तोडून टाकल्यावर श्रीकांत आता दुसर्या कोणाबरोबर तरी फिरतो असं अंजलीच्या कानावर आलं होतं आणि शालिनी पुन्हा पूर्वीसारखी एकटीच असते असंही.
        कर्टसी म्हणून अंजलीने शालिनीलासुद्धा कॉल केला. “अंजू..... कशी आहेस?..... कित्ती दिवसांनी.......” अंजलीने फोन केला याचा आनंद शालिनीच्या आवाजात लपत नव्हता. “श्रुतीच्या वडलांचं सांगायला फोन केला होतास का?” अंजलीने तुटकपणे विचारलं. “हो, मी निघतेच आहे. तू आणि मोहनासुद्धा याल ना? श्रुतीला सपोर्ट वाटेल. तसंही त्यांना फार नातेवाईकसुद्धा नाहीत.” शालिनीने म्हटलं. “हो, आम्ही दोघी येतोय. तू असणार म्हणून मोहनाला नको वाटत होतं पण मी सामाजावलय तिला” अंजलीने रुक्षपणे सांगितलं. “अंजू, मी चुकले गं.... किती वेळा सांगू मी चुकले, तू तुझ्या दुःखात होतीस, मोहना तिच्या संसारात बिझी, आई तिकडे गावी. मी खूप एकटी पडले, किती पोकळ वाटतं माहितीये.... तुमची मुलं तरी आहेत. मला तेही सुख नाही. त्या एकटेपणाच्या दुःखाच्या भरात चूक झाली माझ्याकडून. मला माझ्या चुकीचं खरच खूप वाईट वाटतं ग. तू मोहनाला सांग ना अंजू. ती माझ्याशी बोलतच नाही.” शालिनीचा रडवेला आवाज ऐकून क्षणभर अन्जलीचं मन कळवळलं. पण तरीही शालिनीच्या वागण्याला क्षमा होती का? शेवटी चूक ते चूकच ना! आपण तिला माफ केलं तर मोहनाला कसं वाटेल असाही विचार अंजलीच्या मनात येऊन गेला. “तुझा एकटेपणा मला समजतो. दुर्दैवाने आपल्या तिघीन्च्याही आयुष्यात हा एकटेपणा आहे शालिनी. पण मैत्रिणीच्या नवर्याबरोबर अफेअर करणं मला तरीही पटत नाही. जाऊदे, ही वेळ नाहीये हे सगळं बोलण्याची. चल घाईत आहे. ठेवते मी.” असं म्हणून अंजलीने फोन कट करून टाकला.
      घरी पोहोचल्यावर तिने आईला श्रुतीच्या वडलांची बातमी सांगितली. “आज शालिनीशीसुद्धा बोलले पाच मिनिटं” अंजली म्हणाली, “खूप सॉरी म्हणत होती.” तिने पुढे म्हटलं. “मग तू काय म्हणालीस?” आईने विचारलं. “मी काय म्हणणार! मी काही ठीक आहे, जाऊदे, असं नाही म्हटलं पण मला वाईट वाटलं खरं” अंजलीने खाली बघत म्हटलं. “अंजू, तुमची इतक्या वर्षांची मैत्री! अगदीच तोडून का टाकता एवढ्यासाठी?”
“एवढ्यासाठी म्हणजे? तूच म्हणत्येस ना एवढ्या वर्षांची मैत्री म्हणून मग अशा मैत्रिणीच्या नवर्याबरोबर असं?” अंजलीने चिडून विचारलं.
“अंजू, अगं चुका होतात कधीकधी, पण तिला पश्चात्ताप झालाय. इतके वेळा सॉरी म्हणतेय, बरं ती काही नेहेमी अशीच वागणार्यातली आहे असंही नाही. होतं गं एखाद वेळेस काही. आणि आपण कोण परफेक्ट आहोत सांग! आशिषच्या वेळी सावरायला तुला तिने किती मदत केली. आपल्या माणसाच्या दहा चांगल्या गोष्टी बघून, एखादी चूक, त्यातही पश्चात्ताप असेल तर माफ केली पाहिजे”
“मी माफ करेनही. पण मोहना? तिला काय वाटेल?”“मोहना खूप समजुतदार आहे. तिलासुद्धा नक्कीच कळेल.”        घरचं आटपून अंजली श्रुतीच्या घरी निघाली. आईचं बोलणं तिच्या मनात रेंगाळत होतं. नकळत तिचं मन भूतकाळात गेलं. या तिघी मेडीकलच्या पहिल्या वर्षाला होत्या, श्रुती त्यांना दोन वर्ष सीनिअर. शालिनीची होस्टेलवरची रूममेट म्हणून आधी शालिनीशी तिची मैत्री झाली आणि मग अंजली आणि मोहनाशीसुद्धा. श्रुतीचे वडील सरकारी ऑफिसमध्ये मोठ्या हुद्द्यावर होते. श्रुती त्यांची अगदी लाडकी होती. घरी सगळे तिला चिऊ म्हणायचे. तिला एक मोठा भाऊ होता, शार्दूल. तो त्यावेळी इंजिनीअरिंगला होता. त्यांच्या घरचं वातावरण फार कडक शिस्तीचं होतं. श्रुती नेहेमी बाबांना हे चालत नाही, ते चालत नाही, असं सांगत असे. पण ती फायनल इअरला असताना सर्जरीच्या एका लेक्चररबरोबर तिचं नाव जोडलं जाऊ लागलं. आधी उडत उडत कानावर येत होतं. पण मग श्रुती उघड उघड डॉक्टर भूषण शर्माबरोबर फिरू लागली. आणि फायनल इअरची परीक्षा झाल्यावर तर ती होस्टेल वरून बॅग पॅक करून त्याच्याबरोबर पळून गेली. लग्न झाल्यावर घरचे ऐकतीलच या विचाराने दोघे लग्न करून आले पण श्रुतीच्या वडलांनी तिचं तोंड बघायलासुद्धा नकार दिला. दहा वर्षानी मोठा, युपीचा भैया आणि स्वतःचा शिक्षक अशा माणसा बरोबर लग्न करून त्यांच्या मुलीने त्यांचं नाक कापलं होतं. त्यांनी जे तिचं नाव टाकलं ते टाकलंच. ते तिला भेटले नाहीतच पण त्यांनी पुढच्या पंधरा वर्षांत तिला कधी त्या घरी पाऊलही टाकू दिलं नाही. काही वर्षानी श्रुती भूषणबरोबर अमेरिकेला गेली. त्यांना मुलं झाली पण श्रुतीचं माहेर तुटलं ते कायमचंच.... भावाशी आणि आईशी तिचं बोलणं होत असे पण वडलांच्या नजरेआड. भारतात आली की ती बाहेर कुठेतरी त्यांना भेटत असे. रडून आता तिचे अश्रूही सुकले होते.
       पंधरा वर्षांनी श्रुती आज पुन्हा तिच्या माहेरी आली होती. मोजकेच नातेवाईक होते. इतक्या वर्षांनी वडलांना पाहिलं ते असं! तिच्या अश्रूंचा बांध फुटला. मोहना खरं तर श्रुतीहून लहान पण जात्याच प्रेमळ स्वभावाच्या मोहनाने श्रुतीला सावरलं, मायेने तिने तिला थोपटलं. श्रुतीला रडताना बघून शालिनी सुद्धा मैत्रिणीला सावरायला पुढे झाली. ती श्रुतीजवळ आल्याबरोबर मात्र मोहना तिथून दूर सरकली आणि नकळत अंजलीही. घरी करण्याचे विधी आटपून पुरुष मंडळी बॉडी घेऊन गेली. आता खोलीत श्रुती आणि या तिघीच उरल्या. निघता निघता श्रुतीच्या दादाने तिच्या हातात एक मोबाईल ठेवला. “चिऊ, बाबांनी जायच्या आधी दोन दिवस मला जवळ बोलावलं आणि म्हणाले, की इतकी वर्ष मी चिऊला येऊ दिलं नाही. पण आता तिला बोलावून घे. ती नक्की येईल. भेट होईल असं वाटत नाही पण तिला माझा निरोप दे. तुझा फोन लागला नाही म्हणून त्यांना तुला सांगायचं होतं ते यात रेकॉर्ड केलं आहे. चिऊला लगेच ऐकव तोपर्यंत मला मुक्ती नाही म्हणाले होते.” रेकॉर्डिंग सुरु करून तो निघून गेला. श्रुतीला अवघडल्यासारखं व्हायला नको म्हणून तिघी जायला उठल्या पण श्रुतीने शालिनीचा हात धरून तिला थांबवलं. हो ना करत तिघीही थांबल्या.
        रेकॉर्डिंग सुरु झालं. श्रुतीच्या वडलांचा तोच परिचित धीरगंभीर आवाज. “चिऊ, काय सांगू आणि कुठून सुरु करू. काय तोंडाने सांगू! किती दुखः दिलं मी तुला. तुझ्या एका चुकीसाठी केव्हढी शिक्षा दिली मी. तुला, तुझ्या आईला, शार्दूलला, भूषणला आणि मला स्वतःलासुद्धा. तू माझी इतकी लाडकी मग इतका कठोर कसा झालो मी! फार आशा लावली होती मी तुझ्यावर. तुझ्या पळून जाण्याने, लग्नाने, झालेल्या अपेक्षाभंगाचं, अपमानाचं दुःख पचवलच नाही मी. सतत राग केला की रागाचं सोंग केलं.” एवढ्या बोलाण्यानेसुद्धा त्यांना धाप लागली होती. पण अजून उशीर करून चालण्यासारखं नव्हतं. ते नेटाने बोलत राहिले. “तू लहान होतीस पण मी तर मोठा होतो ना, मग मी मोठ्यांसारखा का नाही वागलो! लहान वयात आमचे आबा गेल्यावर कुटुंबात मोठा, भावंडांत मोठा म्हणून जबाबदारीची झूल लवकर अंगावर घेतली. हळूहळू यशही मिळत गेलं. तसतसा माझा अहंकार वाढतच गेला. मग मला हे चालत नाही, ते आवडत नाही असं स्वतः भोवती तारांचं कुंपणच तयार करून घेतलं. आणि तुम्हालाही बळजबरीने त्या कुंपणात डाम्बून ठेवलं. स्वतःला नेहेमी इतरांपेक्षा वरचढ मानत गेलो. माझ्या भोवतीच्या प्रत्येकाची प्रत्येक चूक मी दाखवली. चुकीला क्षमा असते हे माझ्या पुस्तकात कुठे नव्हतंच. तुझी बाजू घेऊन भांडताना तुझी आई म्हणाली होती, “तुम्ही क्षमा कराल तरच परमेश्वराची क्षमा तुमच्यापर्यंत येईल” तेव्हा मी ते धुकावूनच लावलं. पण आता मला कळतंय की एकदा तुला बघायला, एकदा तुला भेटायला, तुला सांगायला की तुझ्या आठवणी शिवाय एक दिवस नाही गेला, मी काहीही करेन. पण आता ते शक्यच नाहीये. मी खूप वेळ लावला चिऊ, मी खूप वेळ लावला. तुझी आई नेहेमी म्हणते चिऊसुद्धा तुमच्या सारखीच हट्टी आहे. थोडा हट्ट ठीक आहे पण माझ्यासारखे grudge मनात नको ठेऊ. आपलं आयुष्य जे विस्कटलं, त्याला कारण तुझी चूक नाही तर माझं हे सल, आकस धरून रहाणं होतं. रोग गेला तरी जसे देवीचे व्रण रहातात, चेहरा विद्रूप करून टाकतात, तसे हे सल आपलं आयुष्य कुस्करून गेले. मी कायम राग धरून ठेवला त्यामुळे मला मागायचा काही हक्क नाही तरीही हा बाबा तुझ्याकडे माफी मागतो आहे. चिऊ, या गेल्या पंधरा वर्षांबद्दल गिल्ट तर अजिबात वाटून घेऊ नकोस, मोकळ्या मनाने मला निरोप दे आणि जमलं तर आपल्या बाबाला क्षमा कर, करशील ना?”
      रेकॉर्डिंग संपलं होतं. श्रुती हुंदके देऊन रडत होती. शालिनीने तिला मिठी मारली. मोहना आणि अंजलीही तिला येऊन मिळाल्या. अंजलीने मोहनाकडे पाहिलं. श्रुतीबरोबर तिने शालिनीलासुद्धा कवेत घेतलं होतं. डोळ्यातल्या पाण्याने मनातले सारे सल धुऊन टाकले होते.
 डॉ. माधुरी ठाकुर  

Tuesday, 2 May 2017

तोड पिंजरा, उड पाखरा


गेला एक तास या आडरस्त्यावर त्यांची गाडी चालली होती. "साहेब पत्ता बरोबर आहे ना ?" ड्रायव्हर हरिहरने विचारलं. "हो रे, हाच रस्ता सांगितलाय." आदित्य म्हणाला खरा पण मनातून त्यालाही खात्री नव्हती. आपल्या अक्ख्या आयुष्याचाच रस्ता चुकलाय असं त्याला वाटून गेलं आणि तेवढ्यातच समोर सायोची स्कूटी रस्त्याच्या कडेला त्याला दिसली.

 आता पुढे रस्ता संपलाच होता. फक्त पायवाट होती. आदित्य आणि हरिहर पायवाटेवरून चालू लागले. पाच दहा मिनीटांत ते एका मोठ्ठया बैठ्या घरासमोर आले. ते ओसरीपर्यंत पोहोचतात तोच आतून एक  वयस्कर गृहस्थ बाहेर आले. "आम्ही सायो मॅडमना भेटायला आलोय" आदित्यने सांगितलं. "कोण सायो?" त्या माणसाने उलट विचारलं. "इथे सायो नाही का आलीये? मुंबईहून?" आदित्यने चक्रावून  विचारलं. आता त्याला आपण चुकलोच आहोत असं वाटू लागलं. पण मग तिथे सायोची स्कूटी दिसली ती! "ओह... संयुक्ताताई.... अच्छा अच्छा... या ना, या बसा," त्या गृहस्थांनी आदित्यला एक ऑफिससारख्या खोलीत नेलं "मी बोलावून आणतो त्यांना" म्हणून ते निघून गेले.

 आदित्य अवघडून बसून राहिला. सायोला आपण आलेलं मुळीच आवडणार नाहीये याची त्याला खात्रीच होती. पण आता सायो या आडजागी कशाला आली असेल ही त्याची उत्सुकताही चाळवली गेली होती. एका एस्कॉर्टला शहरापासून एवढ्या लांब या खेड्यात काय काम असेल! एस्कॉर्ट म्हणजे तरी काय, सायो ज्या एजन्सीमधून आली होती ती एस्कॉर्ट एजन्सी म्हणजे पॉश नावाखाली मुली पुरवण्याचा धंदाच होता आणि आदित्य सायोचा रेग्युलर कस्टमर झाला होता.

 'बावीस तारखेला पॅरिसचं शूट संपवून परत येईन सांगितलं होतं हिला तरी ही इकडे कुठे येऊन बसली' वैतागून त्याच्या मनात विचार आला. क्षणात स्वतःच्या विचाराचं त्यालाच हसू आलं. तो येणार म्हणून वाट बघत बसायला ती त्याची लग्नाची बायको थोडीच होती! आणि लग्नाची बायको जिला करणार होतो ती तरी कुठे थांबली! अचानक निघून गेली. झर्रकन साक्षीबरोबरचा त्याचा भूतकाळ त्याच्या डोळ्यासमोर येऊन गेला. दोन वर्षांपूर्वीची त्यांची पहिली भेट, हळुवार फुलणारं प्रेम, तिचं त्याच्याबरोबर त्याच्या फ्लॅटमध्ये येऊन रहाणं, पंख लावून उडालेले दिवस आणि रातराणीसारख्या बहरलेल्या रात्री आणि मग अचानक पंख्याला लटकलेली साक्षी! ते दृश्य आठवूनही त्याच्या अंगाला कंप सुटला. त्याने खिशातून सिगारेट काढून पेटवली आणि एक झुरका घेतला. साक्षी मनोरुग्ण होती, तिला स्किझोफ्रेनिया होता. अश्या रोग्याला म्हणे वेगवेगळे आवाज ऐकू येत राहातात. अस्तित्वात नसलेले लोक त्यांच्याशी काही बोलतायत, काही सांगतायत असे भास होत रहातात. मग सहा महिन्यांत आपल्याला कळलं कसं नाही! नाही म्हणायला ती कधी कधी लोक तिच्याबद्दलच बोलतायत, कुजबुजतायत असं सांगायची पण माझ्यासारख्या प्रसिद्ध मॉडेलची गर्लफ्रेंड म्हटल्यावर अशी थोडी इन्सिक्युरिटी असणारच असं वाटून आपण ते कधी गंभीरपणे घेतलंच नाही.... साक्षीच्या मृत्यूला आपला हलगर्जीपणा जबाबदार आहे का हा प्रश्न त्याच्या मनात राहून राहून उठत असे. त्या धक्क्यातून, त्या दुःखातून सावरण्यासाठी आदित्यने काय नाही केलं. ड्रिंक्स, ड्रग्स आणि ड्रीमगर्ल. शेवटी ड्रीमगर्ल एस्कॉर्ट सर्व्हिसेसकडून सायो आली आणि तिच्या बरोबर आदित्यला थोडं बरं वाटू लागलं.

 "आदि ....." सायोच्या हाकेने आदित्यची तंद्री भंगली, "तू इथे!" तिच्या सुरात तिची नाराजी स्पष्ट होती. "इथे का आलास? मी सुट्टी घेऊन आलेय."

"हो, मी फक्त तुला भेटायला आलोय, सायो. दोन दिवसांनी पुन्हा महिनाभर बाहेर जातोय शूटसाठी." आदित्य ओशाळलेल्या सुरात म्हणाला. "बरं चल" म्हणत सायो आदित्यबरोबर बाहेर पडली. हरिहरला थांबण्याचा इशारा करून ते दोघे पायीच निघाले. ते आदिवासी लोकांचं छोटंसं खेडं होतं. चालत चालत ते दोघे वस्तीपासून थोडे लांब एका डोंगराजवळ आले. समोर एक छोटासा ओढा वहात होता. एका मोठ्या खडकावर सायो बसली. आदित्य तिच्या बाजूला जाऊन बसला. तिचा हात हातात घेत त्याने विचारलं, "तुझं नाव संयुक्ता आहे? आज मी सायो विचारलं तर त्यांना कळलंच नाही".
सायोने मान हलवली. "हो, माझं नाव संयुक्ताच आहे ... होतं" शून्यात बघत तिने उत्तर दिलं.

"इथे नेहेमी येतेस? हे तुझं गाव आहे?"

 "अंहं, नाही.... इथे अनाथालय आहे. या भागात बरीच बाळं, जास्त करून मुली टाकून दिल्या जातात. या अनाथालयात त्यांना सांभाळतात. त्यांना आपल्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न करतात."

 "तू काय करतेस इथे येऊन?" आदित्य चकित झाला होता. सायोसारखी मुलगी असं काही करत असेल असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं.
"मी त्यांना होईल ती मदत करते. शहरातून मी त्यांच्यासाठी पुस्तकं, कॉम्प्युटर , कपडे मला जे परवडेल ते घेऊन येते. त्यांना इंग्लिश शिकवते. कॉम्प्युटर  वापरायला शिकवते, त्यांच्याबरोबर गप्पा मारते. काय जमेल ते करते. इथे मी त्यांच्यासाठी येत नाही. इथे मला सायो सोडून संयुक्ता होता येतं. म्हणून मी येते"

 "तू करत्येस हे सगळं चांगलंच आहे पण तरीही शेवटी आपलं स्वतःचं दुःख आपल्यापाशी रहातंच ना?" आदित्यने अगतिक होऊन विचारलं.

 "आदि, माझं पूर्ण नाव संयुक्ता पुंडलिक पाध्ये आहे. पुजार्याची मुलगी. घरच्यांबरोबर शहर बघायला आले, हात सुटला आणि मी चुकले. भलत्या लोकांच्या हातात सापडले आणि संयुक्ताची सायो झाले. माझे वडील मंदिरात कीर्तन करायचे. तेव्हा अर्थ कळत नव्हता, फक्त शब्द लक्षात राहिले. ते सांगायचे घटाकाश आणि मठाकाश, घड्यातलं आकाश म्हणजे पोकळी आणि मठातलं आकाश म्हणजे बाहेरचं अवकाश, आपल्याला वाटतं हे वेगळं आणि ते वेगळं, पण दोन्ही पोकळीच, दोन्ही एकच. दोन्ही एकमेकांशी जुळलेलंच आहे. मीसुद्धा या मुलांशी त्यांच्या सुखदुःखांशी जुळलेलीच आहे. ह्यांच्यासाठी काही करताना मी माझ्याच जखमेवर फुंकर घालत्येय असं वाटतं."

 "इतक्या कठीण परिस्थितीतही तू तुझा मार्ग शोधलास. मला मात्र अजूनही ते जमत नाहीये. पैसा प्रसिद्धी सगळं असूनही या निराशेच्या, दुःखाच्या पिंजर्यात अडकून गेलोय मी." आदित्य हताश होऊन उद्गारला.

 "तूसुद्धा तुझा मार्ग शोध ना आदि..... तुला स्वतःची ओळख आहे. ब्रँड इमेज आहे, पैसा आहे. एक साक्षी मनाच्या रोगाने गेली पण अश्या कित्ती साक्षी अजून जिवंत आहेत. त्यांच्यासाठी काही कर ना" सायोने  त्याचा हात घट्ट धरून सांगितलं.
अंधार पडू लागला तसे ते दोघे परत उठून अनाथालयाकडे आले. "गाडी आणि हरिहरला तुझ्यासाठी ठेऊन जाऊ?" आदित्यने विचारलं. "तू स्कूटी वरून गेलास तर उद्या पेपरमध्ये न्यूज येईल, मी येईन आपली आपण." सायोने हसत सांगितलं.

दुसर्या दिवशी ठरल्याप्रमाणे आदित्य शूटसाठी निघून गेला. पण जेव्हा महिन्याभराने तो सायोला परत भेटला तोपर्यंत त्याने बरंच काही केलं होतं. त्याच्या हातात एक एन्व्हलप होतं. ते त्यांने संयुक्ताला दिलं. तिने उघडून बघितलं तर आत एक बँकेचं कार्ड, पासबुक, पासपोर्ट अश्या गोष्टी आणि काही पैसे होते. 
"तुझ्या एजन्सीशी बोललोय मी. त्यांचा अकाउंट सेटल झालाय. तू हवं तिथे जाऊ शकतेस. हवं ते करू शकतेस. यू आर फ्री. या बँक अकाउंटमधे तुला वर्ष दोन वर्ष सहज पुरतील इतके पैसे आहेत"
संयुक्ता थक्क झाली. तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या, "हे सगळं मी कसं घेऊ? मी परतफेड कशी करणार?" तिने हुंदके देत विचारलं.
आदि हळुवारपणे म्हणाला, "फुकट नाहीये हे, पहिल्यांदी कोणी मला दिशा दाखवली आहे, फक्त सांगून नाही, कृतीतून! गुरुदक्षिणा आहे ही".
"तुला मी तुझ्याकडे राहायला हवंय?" संयुक्ताने विचारलं. तिच्या सध्याच्या आयुष्यापेक्षा तेही बरंच होतं पण शेवटी ती एक प्रकारची लाचारी , गुलामगिरी झालीच असती.

 "मला खूप आवडेल तू माझ्याबरोबर राहिलीस तर. पण मला माहितीये तुझा आनंद त्यात नाहीये. इथे राहिलीस तर 'सायो'च होऊन अडकशील. तू संयुक्ता आहेस, तुझ्या आकाशात भरारी घे. अगदी मोकळेपणाने. मागे वळूनसुद्धा पाहू नकोस आणि थांबू तर जराही नकोस कारण थांबलीस तर मी तुला धरूनच ठेवीन आणि कधीच जाऊ देणार नाही....." आपल्या हातांनी संयुक्ताने त्याचे डोळे पुसले आणि त्याचा निरोप घेऊन ती निघाली.

 सहा महिने झाले होते. संयुक्ताने आता स्वतःला त्या अनाथालयासाठी, तिथल्या मुलांसाठी वाहून घेतलं होतं. एक दिवस ती मुलांना जेवण वाढत होती तेवढ्यात तिथे काम करणारी मालती धावत तिला सांगायला आली. "ताई तुमचे ते शहरातले पाहुणे टीव्ही वर आहेत." संयुक्ता धावत टीव्ही असलेल्या खोलीत आली. ती जनहितार्थ पद्धतीची जाहिरात होती. संयुक्ता पोहोचेपर्यंत अर्धी जाहिरात आधीच झाली होती. आता आदित्यचा तोच देखणा चेहरा स्क्रीनवर होता. तो सांगत होता, "शरीरासारखंच मनही कधी आजारी पडतं. मनाचे रोग ओळखा , त्यांच्याबद्दल मोकळेपणाने बोला, उपचार घ्या. मनोविकारांबद्दलच्या मार्गदर्शनासाठी या नंबरवर विनामूल्य संपर्क करा - संयुक्ता फौंडेशन" डबडबलेल्या डोळ्यांनी संयुक्ता पहातच राहिली. दोघांनीही पिंजरे तोडले होते. पाखरांनी भरारी घेतली होती.

डॉ. माधुरी ठाकुर

https://drmadhurithakur.blogspot.co.uk/