Monday 27 February 2017

अंजलीची गोष्ट - रिप्लाय


"फ्री आहेस का बोलायला?"..... मनस्वीने विचारलं.
"हो बोल. सगळं आटपलंय . रात्र झालीये इथे. तू घरी चाललीयेस का?" अंजली
"हो" मनस्वी म्हणाली. दोघीनाही घरी जाताना ऑन द वे एकमेकींना फोन करायची सवय होती.
"ब्लूटूथ वर बोलतेयस ना, ड्राईव्ह करताना हातात नको घेऊ हं फोन !" अंजली.
"हो ग. ब्लूटूथवरच बोलतेय. ऐक ना. स्वप्नीलचा मेसेज आलाय व्हॉट्स अँपवर." मनस्वीला पाल्हाळ लावायची सवयच नव्हती. डायरेक्ट मुद्द्यावर! "स्वप्नील आठवतो ना? माझ्याबरोबर इंजिनीरिंगला होता" तिने थोडं बिचकत विचारलं.

"हो आठवतो.... इतक्या वर्षांत कधी बोलणं नाही झालं त्याच्याबद्दल. कुठे असतो तो?आणि मेसेज का केला होता?" अंजलीने विचारलं.

" बँगलोरला असतो तो. आम्ही अजिबात टचमधे नव्हतो. दोनचार वर्षांपूर्वी कधीतरी त्याने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. तीसुद्धा मी डिक्लाईन केली होती. पण आजकाल सगळे रियुनियनचे वारे वाहातायत ना त्यामुळे इथून तिथून कॉन्टॅक्ट डीटेल्स मिळाले असतील." .....मनस्वी

"हं ....काय म्हणतोय तो?" अंजली.

"मोठ्ठा मेसेज आहे. त्याचंही लग्न वगैरे झालंय. मुलं आहेत. आणि तरी म्हणतोय की मी तुला आयुष्यभर कधी विसरू शकणार नाही. लाईफ पार्टनर होण्याचा आपला चान्स तर गेला. आता किमान गुड फ्रेंड्स म्हणून तरी राहूया. फोनवर टचमधे  राहूया असं म्हटलंय त्याने" मनस्वी.

"मग  तू काय करणार आहेस? आणि ऋषिकेशची काय रिएक्शन?" मनस्वीच्या बाबतीत ऋषीला सांगितलंस का हा प्रश्न व्हॅलिडच नव्हता हे अंजलीला चांगलच ठाऊक होतं.

"तो तर काय नावाप्रमाणे ऋषीच आहे. त्याला या सगळ्याचं काही वाटतं असं वाटतच नाही. My love should not tie you down. It should liberate you.... असं काय काय बडबडत होता" मनस्वीने थोडंसं वैतागून म्हटलं.

"तुला आनंद व्हायला पाहिजे तुझा नवरा टीपीकल ऑर्थोडॉक्स नाहीये म्हणून!" अंजलीने हसून म्हटलं.

"आनंद आहेच गं. आमच्या लग्नाला आता पंधरा वर्ष झाली. सुरुवातीची कितीतरी वर्ष माझा ऋषीवर विश्वासच नव्हता. अगदी लव्ह मॅरेज असूनसुद्धा. अधून मधून त्याचा खिसा चेक कर, फोन चेक कर, झालंच तर इमेलसुद्धा चेक कर, असं सगळं मी करत असे. बर्याच उशिरा मला कळलं की मी त्याला सारखं तपासतेय कारण 'त्याचं काही आहे' असं नाही तर मीच माझ्या मनात इन्सिक्युअर आहे. मग प्रयत्नपूर्वक सगळं बंद केलं आणि माझंच मला इतकं पीसफुल वाटायला लागलं!"... मनस्वी.

"मग स्वपनीलला सांगून टाक की ऋषीसारखा नवरा असताना आणखी वेगळ्या मित्रांची गरजच नाहीये मला म्हणून!" ...अंजली.

"अगदी खरं आहे. ऋषी लग्ना आधी माझा मित्र होता.  आणि  लग्नानंतरसुद्धा नवरा बायकोच्या नात्याबरोबर आमच्यात मैत्री आहेच. पण समजा ऋषीच्या जागी एखादा खडूस नवरा असता तरीही मी लगेच जुन्या मित्राकडे गेले असते का? जुन्या नात्यामध्ये तेवढं बळ असतं तर तेव्हाच ते नातं तुटलं नसतं ना? मग जे टिकू शकत नाही म्हणून तोडलं ते धरून ठेवण्याचा अट्टाहास कशाला? तुटलं... तुटलं.... आता सोडून दिलं पाहिजे ना?" ....मनस्वी.

"बरोबर आहे. मला वाटतं बायका बहुतेक वेळा त्यांच्या संसारात साखरेसारख्या विरघळून जातात. नवरा, मुलं, घर, संसार आणि सगळं सांभाळून झालंच तर स्वतःचं करिअर हेच त्यांच्यासाठी विश्व बनून जातं . त्यामुळे या असल्या जुन्या गोष्टी उगाळण्याची गरजच रहात नाही त्यांना. स्वप्नील सारखे पुरुष मात्र भरल्या संसारात असूनही नर्मदेतले गोटेच रहातात ..... मग आता तू नो थँक्यू चा रिप्लाय  करणार की रिप्लाय  करणारच नाही?" ....अंजली

 "तेच कन्फ्युज होतंय. खरं सांगू, जर कोणी मला आधी सांगितलं असतं की चाळीशी येऊ घातली असताना मला असा "तुला विसरू शकत नाही" वाला मेसेज येईल तर मला वाटलं असतं की मला छान थोडं फ्लॅटर्ड वाटेल, अजूनही आपले चाहते आहेत म्हणून! पण इथे तर उलट मला का कोण जाणे गिल्टीच वाटतंय." ....मनस्वी.

"मनू, तू तिथे लंडनला रहा, जीन्स घाल नि काहीही कर. मनातून तू तीच सरळ साधी मनस्वी आहेस. हे गिल्टबिल्ट सोडून दे. सीता काही रावणाला टेम्प्ट करायला गेली नव्हती तरीही सीताहरण झालंच ना? पुरुषांच्या ढिल्या कॅरॅक्टरसाठी स्वतःला गिल्टी का वाटून घ्यायचं आपण? नात्यांमध्ये ऑनेस्ट राहणं महत्वाचं आहे. ते तर तू आणि ऋषी आहेत ना! मग गिल्ट कशाला !" ...... अंजली

"बरोबर आहे तुझं ! थँक्स फॉर टॉकिंग! बरं वाटलं बोलून. चल मी घरी पोहोचतेय . आता मुलं येऊन चिकटतील. नंतर बोलूया?"... मनस्वी

"हो शुअर " अंजलीने फोन ठेवला.

मनस्वी घरी शिरली. ऋषी ऑफिस मधून येताना मुलांना घेऊनच आला होता. एकदा घरात शिरल्यावर स्वप्नीलच्या मेसेजची आठवणही तिच्या मनातून हद्दपार झाली.

बँगलोरच्या ऑफिसमध्ये ओव्हर टाइम करत बसलेल्या स्वप्नीलने निघण्यापूर्वी पुन्हा एकदा आपला मोबाईल चेक केला. आधीच्या शेकडो वेळांप्रमाणे आता सुद्धा रिप्लाय आला नव्हता.

डाॅ. माधुरी ठाकुर


Tuesday 21 February 2017

द विनर इज ..... (अनुभव)



स्पोर्ट्स डे म्हटलं की माझं मन भूतकाळात जातं. मला माझ्या पार्ल्याच्या शाळेतले स्पोर्ट्स डे आठवतात.... रनिंग रेस, चमचागोटी, रिले अशा शर्यती आणि त्यानंतर विजेत्यांना लाकडी पोडियमवर उभं राहून मेडल.... अजूनही सगळं माझ्या डोळ्यांसमोर उभं राहतं. 

माझा मुलगा जेव्हा पहिलीत गेला तेव्हा बर्याच वर्षांनी पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात स्पोर्ट्स डे आला. युकेमधल्या  अॅबरडीनमधे आम्ही रहातो. चकचकीत उन्हाचा उबदार दिवस म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच असते. तर असा छानसा दिवस होता. शाळेबाहेरच्या मोठ्या ग्राउंडवर उत्साहाने भरलेली, बागडणारी, फुलपाखरांसारखी मुलं आणि आपल्या पिल्लाना बघायला अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन आलेले बहुसंख्य पालक.... 

 भरपूर मोठी जागा असल्याने एकाच वेळी वेगवेगळ्या वर्गांच्या वेगवेगळ्या रेसेस चालू होत्या. माझ्या मुलाच्या वर्गाची रेस जिथे चालू होती तिथे इतर पालकांसोबत मी उभी होते. धावणं, डोक्यावर पुस्तक  घेऊन धावणं, सॅक रेस अशा वेगवेगळ्या शर्यती झाल्या पण गम्मत म्हणजे कुठेच विनर्सचं विशेष कौतुक नव्हतं. प्रत्येकालाच रेस पूर्ण झाली की टीचर शाबासकी देऊन स्टिकर देत होत्या. पहिलं, दुसरं आणि तिसरं येणार्याला अजून एक स्टिकर मिळत होता एवढंच! पालकही टाळ्या वाजवून मुलांना प्रोत्साहन देत होते पण ज्या चुरस, चढाओढीची मला अपेक्षा होती, तशी काही नव्हती. हार जीत काही नाहीच.... नुसता उत्साह आणि आनंद....   पेप्पा पिगच्या एपिसोडमधलं "व्हॉट'स इम्पॉर्टन्ट इज टेकिंग पार्ट" (हारजीत नाही, तर भाग घेणं , प्रयत्न करणं महत्वाचं आहे) हे, हे लोक खर्या अर्थाने आयुष्यात उतरवतात.

 मग एक गम्मत झाली. मोठ्या भावाला बघायला आलेला एक छोटासा तीनेक  वर्षांचा मुलगा प्रत्येक रेसमधे जाऊन पळायला बघत होता. तो अजून शाळेतही जात नव्हता पण आता सगळ्यांना बघून त्यालासुद्धा भाग घ्यायची फार हौस वाटत होती. त्याची आई त्याला "अजून तू लहान आहेस, ही शाळेतल्या मुलांची रेस आहे" वगैरे समजावत होती पण तो ते काही फारसं मनावर घेत नव्हता. तेव्हा टीचरने एका बाजूला त्या छोट्या मुलाला, त्याच्या भावाला आणि अजून दोनतीन मुलांना घेऊन एक इन्फॉर्मल रेस घेतली आणि अजून शाळेतही नसलेल्या या मुलाला त्या रेसमधे पळू दिलं. बरोबरीची ती दोनतीन मुलं फास्ट पळाली पण त्या छोट्याचा पाच वर्षांचा दादा मात्र मुद्दाम स्लो मोशन मधे पळत होता. कारण त्याला त्याच्या छोट्या भावाने शेवटी एकटं मागे रहायला नको होतं! रेसमधे भाग घेता आला , स्टिकरही मिळाला. ते पिल्लू एवढं खूष झालं की बघायला नको...

माझ्या मुलाच्या पहिलीच्या वर्गात एक मुलगी आहे. तिचे दोन्ही पाय गुढग्याखाली अधू आहेत. ती क्रचेस (कुबड्या) किंवा व्हीलचेअर वापरते. तिला वर्गात मदत करायला एक हेल्पर असते. अशा मुलांच्या मदतीसाठी गव्हर्नमेंट कडून शाळेला असे हेल्पर्स मिळतात. तर ही मुलगीसुद्धा क्रचेस घेऊन रेससाठी उभी होती. रेस सुरु झाली. तिची हेल्पर आधारासाठी तिच्यासोबत होती. बाकी मुली पुढे धावल्या. ही अजून अर्ध्यावरच पोहोचली होती. तिचा चेहरा पडला. उत्सफूर्तपणे आम्ही पालकांनी टाळ्या वाजवून "फ्लोरा.... फ्लोरा.... " असं जोरजोरात तिला चीअर करायला सुरुवात केली. तिच्या चेहर्यावर पुन्हा हसू पसरलं. ती नेटाने पुढे जात राहिली. टाळ्या आणि घोषणांनी सारं ग्राउंड दुमदुमलं. फ्लोराने अख्खी रेस पूर्ण केली. टीचरने तिला शाबासकी देऊन स्टिकर दिला. तिचा चेहरा आनंदाने फुलला. तिला तसं बघून तिच्या आईचे डोळे भरून आले. माझ्यासारख्या अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. स्पर्धेचा 'सोहळा' झाला होता. पोडियम नव्हतं , मेडल्स नव्हती तरीही आम्ही सगळेच जिंकलो होतो......


डॉ. माधुरी ठाकुर



Sunday 19 February 2017

सांगाती (अनुभव)



हे होणार हे मला माहीत होतं पण ती वेळ इतक्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं. तीन वर्षांपासून जिच्याशी माझी घट्ट मैत्री झाली अशी माझी सखी..... ती आता आमचं शहर सोडून जाणार होती. तिचा नवरा दुसर्या शहरी जॉब निमित्त गेला तेव्हा मागोमाग तीसुद्धा जाणार हे गृहीतच होतं. पण एवढ्या लवकर ती वेळ येईल असं वाटलं नव्हतं.

तीन वर्षांपूर्वी एका कॉमन मैत्रिणीच्या घरी आम्ही भेटलो. 'समानशीलेषु सख्यम' या नात्याने आमची वेव्हलेंग्थ लगेच जुळली. ती माझ्यासारख्याच मोकळ्या स्वभावाची, तशीच इमोशनल आणि तेवढीच इंपेशण्ट! तिच्यामध्ये मला, दहा वर्षांपूर्वीची मी वारंवार दिसे. पण माझ्याकडे दहा वर्षांपूर्वी नसलेली एक गोष्ट 'हि'च्यामध्ये या लहान वयातही आहे ती म्हणजे 'सद्गुरुभक्ती'. ती नानासाहेब धर्माधिकारी यांच्या बैठकीला जाणारी आणि मी बापूभक्त. रस्ता वेगवेगळा पण डेस्टिनेशन सेम, सद्गुरुचरण!

माझ्या धाकट्या मुलाला बरं नसताना रात्री तीनला मी तिला हक्काने बोलावून घेतलं होतं , हॉस्पिटलमध्ये माझ्या मुलाला नळ्या लावलेल्या बघताक्षणी तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं.

मैत्री नव्हे निव्वळ देणे
मैत्री म्हणजे वाटून घेणे
मला लागता तुझिया नयनी
आधी अश्रू येणे.....

तर अशी ही माझी सखी आता दूर जाणार होती. मला धाकटी बहीण असती तर ती सासरी जाताना मला जसं वाटलं असतं तसं मला वाटलं.

ग्लोबल व्हिलेजच्या नादात आपण किती सारं गमावतोय या विचाराने माझं मन सुन्न झालं. सारी नातीगोती भारतात ठेऊन मी इथे दूर आले आहे. इथे नवनवीन लोक भेटतात. कधी तारा जुळतात, मैत्र निर्माण होतं आणि होता होता एका लाटेने परत ओंडके दूर व्हावेत तसे सगळे इकडे तिकडे विखुरतात. माझ्या हृदयाचा एक एक तुकडा सोबत घेऊन जातात.

 मुलं रडत रडत नेहमी आईकडेच जातात तशीच सुन्न झाले की मीसुद्धा बापूंच्या फोटोपुढे जाते. मी रडत त्यांना म्हटलं, "तुम्ही असे कसे निष्ठुर होता? तुमच्या अश्या करण्यामुळे मला नवीन मैत्री करणं नको वाटतं. माझा जीव गुंतणार आणि तुम्ही ताटातूट करणार. काय अर्थ आहे याला!"

बापू फोटोतच हसून म्हणाले, "अजूनही तुला कळत नाहीये, दर वेळी रडत रडत माझ्याच कडे येतेस, प्रत्येक गोष्ट सांगायला, प्रत्येक गोष्ट मागायला..... आणि तरीही तुझा खरा सांगाती, खरा सोबती कोण आहे ते ओळखत नाहीस.....

सांगाती आहे मी तुमचा निश्चित
तीनही काळी , तीनही लोकांत
विसरलात जरी तुम्ही मज क्वचित
मी नाही विसरणार तुम्हांस निश्चित"

उन्हाचा ताप असह्य व्हावाआणि अचानक वार्याची थंडगार झुळूक अंगावर यावी, तसं मला वाटलं. सद्गुरू चरणांना आठवत छोट्या बाळासारखी मी झोपी गेले. झोपेतही तोच अनाहत नाद माझ्या हृदयात गुंजत होता "खरंच सांगतो बाळांनो मी तुम्हाला कधीच टाकणार नाही.... येस्स"

Tuesday 14 February 2017

दुसरी बाजू (कथा)



"मनस्वीचा फोन आला होता आज" आई अंजलीला  म्हणाली, "तिचे फोटो बघितले का विचारत होती. मलासुद्धा म्हणाली की काकू तू फेसबुक , इंस्टाग्राम जॉईन कर" 
"मग करायचा का अकाउंट ओपन?"अंजलीने सिरियसली विचारलं. "वेडी आहेस की काय! मला काय गरज? मला कोणाशी बोलायचं असलं, की मी सरळ जाऊन भेटते, किंवा फोन करते. इंटरनेट वगैरेची गरजच नाही लागली आमच्या पिढीला."
"पण तुझ्या अगदी लहानपणच्या शाळेतल्या मैत्रिणी भेटल्या फेसबुकवर तर छान नाही वाटणार तुला?" अंजलीने विचारलं.
"कुणास ठाऊक कसं वाटेल....... फुलपाखरं क्षणभर दिसतात नि उडून जातात म्हणून छान वाटतात. त्यांना तसं उडूनच जाऊ दिलं पाहिजे. पकडून काचेच्या डब्यात ठेऊन बघण्यात ती मजा नाही. माझ्या जुन्या मैत्रिणींच्या आठवणीसुद्धा तश्याच वाटतात मला. त्या नेहेमीच्या झाल्या तर त्या आता वाटतात तशा प्रेशस वाटणार नाहीत"
"मनस्वीने फोनमधून तुझ्या डोक्यावर हात ठेवला की काय!" अंजलीने डोळे मिचकावून विचारलं आणि मायलेकी हसू लागल्या.

मनस्वी अंजलीची चुलत बहीण पण हीही एकुलती एक आणि तीही. त्यात वयाचं अंतर कमी. त्यामुळे दोघी एकमेकींसाठी सख्ख्याच झाल्या होत्या. मनस्वी इंजिनीरिंग करून मल्टिनॅशनल कंपनीकडून लंडनला गेली होती. आणि तिथेच सेटल झाली होती. नवरा, एक मुलगा आणि एक मुलगी असं चौकोनी कुटुंब. मोकळ्या स्वभावाची मनस्वी, नावाप्रमाणे 'मनस्वी'च होती.

म्हटल्याप्रमाणे रात्री तिचा पुन्हा फोन आला. अंजलीने अजूनही फोटो पाहिले नव्हतेच.
"कसले फोटो टाकलेयस तू? सॉरी मी नाही पाहिले अजून" अंजलीला टेकनॉलॉजीची  विशेष आवड नव्हती."वाटलंच मला. अगं संडेला आम्ही लग्नाला गेलो होतो. तुम्ही नाही का लग्नाला गेलात की पैठणी नेसून, खांद्यावर हात ठेऊन ओळ करून फोटो काढता, तसं इथे आम्ही इवनिंग गाऊन घालून मिरवत होतो.".... मनस्वी.

 "कोणाचं लग्न  होतं?" अंजलीने विचारलं.
"अगं, स्वयमचा क्लासमेट आहे जेम्स , त्याची आई माझी मैत्रीण आहे. तिचं लग्नं होतं."....मनस्वी.
"सेकंड मॅरेज?"...अंजली
"नाही गं. ती आणि तिचा पार्टनर, म्हणजे जेम्सचा बाबा, गेली आठ एक वर्ष एकत्र आहेत पण या ना त्या कारणाने लग्न नव्हतं केलं. आता केलं! जेम्ससुद्धा त्याच्या आईवडिलांच्या लग्नाला आला होता" मनस्वी हसून म्हणाली.
"सोसायटी एक्सेप्ट करते का गं असं? कोणी काही म्हणत नाही?" अंजलीने प्रश्न केला.
"नाही....फारसं कोणी या सगळ्या गोष्टींची दखलच घेत नाही. ब्रिजेट जोन्स जनरेशन आहे हे. अर्ध्याहून अधिक लोकांचे पार्टनर्स असतात, नवरा बायको नाहीत! असली लग्न चर्चमध्ये करता येत नाहीत एवढच!"....मनस्वी.
"छान, तिथे ही तर्हा आणि इथे...." अंजली सांगू लागली, " आमच्या हॉस्पिटलमधे एकोणीस वर्षांची एक प्रेग्नन्ट मुलगी आहे जनरल वॉर्डला. अनमॅरिड! नर्स, बाकीचे पेशंट्स, त्यांचे नातेवाईक सगळे इतके वाईट वागतायत तिच्याशी. तुसडेपणाने बोलणं , टोमणे.... कायद्याप्रमाणे कोणी तिला बापाचं नाव सांगायला फोर्स करू शकत नाही. नाहीतर भांडावूनच  सोडलं असतं तिला."
"रेपची  वगैरे केस नाही ना" मनस्वीने प्रश्न केला.
"वाटत तर नाही. छोटी आहे गं. Some wrong decisions . पण मला सगळ्यात जास्त काय खटकलं माहितीये... त्याच वॉर्डमध्ये अजून एक पेशंट आहे. खूप दिवस अॅडमिट आहे. तशी मनमिळाऊ आहे. स्टाफ, बाकी पेशंट सगळ्यांशी गप्पा मारते. पण या बाईची मोठी मुलगी या प्रेग्नन्ट पेशंटबरोबर बोलत होती. हिने ते बघितलं मात्र, तरातरा जाऊन तिने मुलीला खेचून आणलं, एक धपाटा दिला आणि ओरडली की खबरदार परत कधी तिच्याशी बोलशील तर, 'असल्या' लोकांच्या नादी नाही लागायचं जरापण! आणि हा सगळा प्रकार माझ्या वॉर्ड राऊंडच्या वेळी. मग मी मधे पडले. त्या बाईला दम दिला आणि सांगितलं की पुन्हा त्या अनमॅरिड मुलीला  काही वेडंवाकडं बोललीस तर तुझाच बेड बाहेर कॉरिडॉरमधे टाकायला सांगेन. होपफुली तेवढी वोरनिंग थोडे दिवस पुरेल. पण खरं सांगू जर माझी रिया अशा एखाद्या मुलीच्या जास्त कॉन्टॅक्टमधे असेल तर मलासुद्धा काळजी वाटेल. मी त्या बाईसारखा सीन नाही करणार पण मनातून मात्र मलासुद्धा रियाने त्या दिशेने जाऊ नये असं वाटेलच. मग त्या बाईचं वागणं चूक ठरवणारी मी कोण? काय चूक आहे आणि काय बरोबर हेच मला कधीकधी कळेनासं होतं. " अंजलीने एक निश्वास टाकला.

 "अगं चूक आणि बरोबर असं काही नाहीच आहे खरंतर. अगदी रिलेटिव्ह टर्म्स असतात या. ज्याचा त्याचा चॉईस असतो कशाला चूक आणि कशाला बरोबर म्हणायचं हा. एकाला जे पूर्ण चूक वाटतं तेच दुसर्याला पूर्ण बरोबर. इथे आमच्याकडे प्रेग्नन्सीमधे  बाळ मुलगा आहे की मुलगी हे सोनोग्राफी करून बघण्यात कायद्याने काही गैर नाही . तेच तिकडे गुन्हा आहे. धर्माचंही तसंच. आपल्याकडे धार्मिक कार्य असताना दारू पूर्ण निषिद्ध, आणि इथे लास्ट सपरमधे  सुद्धा वाईन आहे. मग बरोबर कोण आणि चूक कोण?".....मनस्वी.

"असं कसं म्हणतेस? त्या मुलीबद्दल, तिच्या सिचुएशनबद्दल माझ्याही मनात सहानुभूती आहे. पण शेवटी लग्नाआधी मूल हे चूकच आहे ना!" अंजलीमधली रियाची आई बोलत होती.

"मग सुश्मिता सेन......तिची मुलं?" मनस्वीही मुद्दा सोडत नव्हती.

"अगं पण ती अडॉप्टेड आहेत"....अंजली

"ब्रॅड पिट अँजेलिना जोली .... त्यांचा तर लग्नाआधीसुद्धा मोठा कबिला होता. त्यात  अडॉप्टेड बरोबर त्यांची  स्वतःची मुलं सुद्धा. किंवा लिव्ह इन रिलेशनशिपमधले हजारो सेलेब्रिटी..... खरं तर जगासाठी एखादी गोष्ट 'चूक आहे की नाही ' यापेक्षा 'ती गोष्ट कोणी केलीये' हे जास्त मॅटर करतं. शाळेतसुद्धा क्लास चालू असताना एखादा ढब्बू मुलगा बोलत असेल तर टीचर एक पट्टी द्यायच्या पण तेच जर बडबडणारा क्लासचा टॉपर असेल तर मात्र हलकीशी वॉर्निंग. तुझी ही प्रेग्नन्ट पेशंट नक्कीच गरीब किंवा मिडलक्लास असणार नाहीतर एकटीने मूल वाढवण्याचा धाडसी निर्णय घेतल्याबद्दल तिच्यावर स्तुतिसुमनं उधळली असती." मनस्वी उपहासाने म्हणाली.

"तू म्हणत्येस ते थोडंफार पटतं मला. पण तूसुद्धा एका मुलीची आई आहेस. आपल्या मुलीनी असं केलं तर चालणार आहे का आपल्याला?" अंजलीचा प्रश्नही वाजवी होता.

"आपण कोंबडं झाकलं म्हणून काही सूर्य उगवायचा राहाणार नाहीये. त्यांचा मूळचा स्वभाव हे बीज, ज्या समाजात त्या वाढतायत तो समाज म्हणजे जमीन आणि आपण कळत नकळत त्यांच्यावर करत असलेले संस्कार म्हणजे खतपाणी, या तिन्हीच्या कॉम्बिनेशनमधून जे उगवायचं ते उगवणार. आणि त्यांनी काहीही केलं तरी आपण त्यांना टाकणार आहोत का कधी? पण आपल्या मुलांसाठी आपल्या मनात जेवढी क्षमा असते, तशी ती इतरांसाठी वाटत नाही. इतरांच्या केसमधे आपण झटकन डोळ्यांवर पट्टी बांधून हातात तराजू घेतो. जजमेंटल होणं जर आपण कमी केलं तर आपले आणि लोकांचे केवढे त्रास कमी होतील ना? तू रियाची आई म्हणून विचार करत्येस, ती एकोणीस वर्षांची मुलगीसुद्धा तिच्या आईची 'रिया'च आहे ना? त्या आईचा विचार कर बरं..... तिलासुद्धा माहितीये तिच्या मुलीकडून झाली चूक, तरीही लोकांनी तिच्याशी जसं वागावं असं तिला वाटत असेल ना तशी तू वाग, म्हणजे मग असं कन्फ्युजन होणार नाही तुला आणि रात्री शांत झोप लागेल." ....मनस्वी कळकळीने सांगत होती.

"बरोबर बोलत्येस तू, मोकळं वाटलं तुझ्याशी बोलून" मग बाकीच्या नेहेमीच्या गप्पा मारून दोघीनी फोन ठेवला.

दुसर्या दिवशी मनस्वीच्या फेसबुक वर फोटोखाली कमेंट होता "Looking gorgeous in the purple dress but what I love the most about you is your beautiful heart "



Friday 10 February 2017

फोटो (छोटीशी कथा)

American Sitcom: Everybody loves Raymond. Family Portrait 

सकाळीच  फोन वाजला . "परवाच्या पार्टीचे फोटो पाहिलेस का ?" भारतातून ताईने मोठ्या उत्सुकतेने विचारलं . "हो, काल रात्री निवांतपणे वाचत होते"
"अमेरिकेत फोटो वाचतात वाटतं?" ताईने हसून म्हटलं.
"नाही ग ताई, बहुतेक लोक फोटो नुसते पाहतात. पण साड्यांचे रंग, कपड्यांचे ब्रॅण्ड यापेक्षा अधिक लक्ष लोकांच्या बॉडी लँग्वेज कडे दिलं ना की फोटो वाचता येतात.

बघ ना, लोकं हनीमूनचे फोटो फेसबुकवर टाकतात. नुकतंच लायसन्स मिळाल्यावर बेफाम गाडी चालवणाऱ्या तरुणाईसारखं, धबधब्यासारखं उसळणारं प्रेम त्या फोटोंमध्ये सुद्धा ओसंडत असतं.

आता  तुमचाच पार्टीचा हा अल्बम घे ना. फोटो बघताक्षणीच मला जाणवलं की नलूमावशी अजूनही काकांच्या दुःखातून सावरली नाहीये. फोटोपुरती हसली तरी ते बळेबळे आहे हे समजतंय.

तेच निम्मीमावशी आणि तिच्या सुनेचं चांगलं चाललंय हे त्यांच्या फोटोतून कळतंय. फोटोमध्ये त्या दोघी जशा एकमेकींकडे सरकल्या आहेत, ते दाखवतं की त्यांची मनंसुद्धा एकमेकींच्या जवळ येत आहेत.

आपल्या कुटुंबातल्या नव्या पिढीचा दिलदार मोकळेपणा त्यांच्या सेल्फीतून सुद्धा थिरकतोय आणि पुरुषांचा थोडासा अलिप्तपणा त्यांच्या फोटोत डोकावतोय.

एखाद्याच्या दिशेने झुकलेली मान, खांद्यावरचा हात, एखादा हसरा कटाक्ष, शंभर वाक्य नाही सांगणार इतकं बोलून जातात. फोटो बघून ते नातं तसं आहे असं खात्रीलायक नाही सांगता येणार पण त्या मोमेन्टला तरी माणसाची मनःस्थिती कशी होती ते बहुतेक वेळा दिसून येतंच."

"भारीच विचार करतेस बाई तू! जाऊदे, तुमचा दोघान्चा एक छानसा फोटो काढून पाठवून दे. मी या पार्टीच्या अल्बममध्ये अॅड करते."

"अगं ताई, आमचा एकत्र फोटो हवा असेल तर दोन वेगवेगळे फोटो घेऊन एकत्र करावे लागतील. म्हटलं ना तुला, फोटो बोलतात आणि आम्हाला दोघांना एका फ्रेममध्ये फार जाच होतो गं"

डाॅ. माधुरी ठाकुर

Tuesday 7 February 2017

अंजलीची गोष्ट - तिघी (कथा)

"आई, मोहना आणि शालिनी बरेच दिवस म्हणतायत भेटूया म्हणून. या शनिवारी जाऊन येऊ? तू रियाला बघशील?" अंजलीने आईला विचारलं. आई होच म्हणणार आहे हे माहीत असलं तरीही रियाची जबाबदारी आजीवर टाकण्याआधी अंजली नेहेमी आजीची परवानगी घेत असे. आजीची आणि रियाचीसुद्धा!
    शनिवारी लंचला त्या तिघींच्या ठरलेल्या सीफेस रेस्टाॅरंटमधे भेटायचा प्लॅन ठरला. हे रेस्टाॅरंट तसं थोडं लांबच पडायचं पण शांत, निवांत माहौल आणि खिडकीतून दिसणारा समुद्र ..... त्यामुळे तिघीनांही तिथे भेटायला आवडायचं. ड्राईव्ह करताना अंजली  आठवू लागली. मेडिकल कॉलेज मधे सुरु झालेल्या या मैत्रीला आता तब्बल पंधरा वर्ष झाली होती. दर वर्ष, सहा महिन्यांत तिघी भेटायच्या. शिवाय अधून मधून फोनकॉल्स , मेसेजेस असायचे. आशिषच्या दुःखातून सावरायला या दोघींनी तिला खूप मदत केली होती. 

 मोहना अगदी गरीब घरची आणि गरीब स्वभावाची आणि तशी अबोल. आईवडील दोघेही शिक्षक, त्यामुळे घरात शिस्तीचं वातावरण. कोकणस्थांचा शिक्का मारल्यासारखा गोरा रंग, घारे डोळे आणि रेखीव चेहरा. कॉलेजमध्ये कितीतरी मुलं तिच्यावर फिदा होती पण बाजी मारली ती त्यांचाच बॅचमेट श्रीकांत कर्णिकने.
मोहनाच्या उलट शालिनी, हुशार, तरतरीत, बडबडी, रंगाने सावळी अशी ही डार्क ब्युटी खानदेशातून एकटीच शिकायला मुंबईत आली होती. रंग सावळा आणि त्यात तिचा तो खानदेशी अॅकसेन्ट! त्यामुळे तिच्याकडे कोणाचं लक्ष जातच नसे. गेल्या पंधरा वर्षांत मात्र तिचा तो अॅकसेन्ट पूर्ण गेला होता. शिवाय आत्मविश्वासाचं , हुशारीचं वेगळं तेज शालिनीच्या चेहर्यावर आलं होतं. एमबीबीएस नंतर शालिनीच्या लग्नाचे प्रयत्न तिच्या आईवडिलांनी केले होते पण चार पाच नकारांनंतर शालिनीने तो नाद सोडून कऱीअरवरच लक्ष केंद्रित केलं. आणि मग लग्नाचं राहिलं ते राहिलंच. 

 तिघीही ऑलमोस्ट एकाच वेळी पोहोचल्या. डोअरमॅनने अदबीने दार उघडलं. रेस्टाॅरंटच्या काचेच्या दरवाज्याला एक मोठा तडा गेला होता. शालिनीने नेहेमीच्या बोलक्या स्वभावानुसार डोअरमॅनला विचारलं "ये कैसे हुआ? "
"क्या मालूम मॅडम ! कल रात ठीक था. आज सुबह देखा तो बडासा क्रॅक आया था. पता नहीं किसीने  तोडा या धूप की बजेसे ...."
"रात में धूप!!" शालिनीने आश्चर्याने म्हटलं. "अगं बाई चल ना. तू समुद्र बघ. तो क्रॅक नको बघू." म्हणत अंजलीने शालिनीला आत ढकललं आणि तिघी हसत हसत जाऊन टेबलपाशी बसल्या.
     
 गप्पा सुरु झाल्या. प्रॅक्टिस , कॉन्फरन्स, सेमिनार, बाकीचे कॉमन फ्रेंड्स .... होता होता विषय घरच्यांकडे वळला. एव्हाना मेन कोर्स सर्व्ह झाला होता. वेटर्सचं टेबलकडे येणंही कमी झालं होतं. एकदा  आजूबाजूला बघून दबक्या आवाजात मोहना म्हणाली, "मला तुम्हाला दोघींना एक सांगायचंय...." ती चाचरत पुढे म्हणाली "श्रीकांतचं काहीतरी चाललंय". अंजली आणि शालिनी दोघींच्या हातातले घास तसेच राहिले. "काय चाललंय?" शालिनीने न राहवून विचारलं, "अफेअर, तो कोणाच्या तरी प्रेमात पडलाय बहुतेक" खाली मान घालून मोहनाने म्हटलं. "तुला.... तुला सोडून तो इतर कोणाकडे बघतोय?" अंजलीने अजूनही अविश्वासाने म्हटलं. मोहना फक्त सुंदर होती एवढंच नव्हतं , मोहना आणि श्रीकांत कॉलेजमधले स्टार कपल होते. "हो नक्कीच तो कोणाच्यातरी प्रेमात पडलाय. प्रेमात तो कसा असतो ते मी चांगलं बघितलंय. आताही तेच चालू आहे. लग्नाआधी चार वर्ष आम्ही एकमेकांच्या प्रेमात होतो. लग्नालासुद्धा आता दहा वर्ष झाली. त्याने नुसतं हं म्हटलं तरी मला समजतं त्याला काय म्हणायचंय. मग त्याचं मन उडालेलं मला नाही का कळणार!" मोहनाला हुंदका आला तरी ती बोलतच राहिली. "आठवतं ना, तो  कॉलेजमधे कसा होता, लेटर्स काय, रोझेस काय, रोमँटिक डेट्स काय.... सगळं काही अमर्याद करण्याचा स्वभाव आहे त्याचा. माझ्यावर प्रेमसुद्धा असाच अमर्याद करायचा. इतकं की मूल वगैरे काही हवं असं त्याला काही वाटायचच नाही. मला मात्र मूल हवं होतं आणि आम्हाला होत नव्हतं. मग IVF वगैरे तर तुम्हाला माहीतच आहे. आणि मग दोन वर्षांपूर्वी ट्विन्स! शार्विल आणि शनाया , तोपर्यंतसुद्धा आम्ही घट्ट एकमेकांबरोबर होतो. पण हळू हळू काय झालं कळलं नाही. तो बॉयफ्रेंडच राहिला मी मात्र पूर्ण 'आई' होऊन गेले गं. ते सळसळतं प्रेम, धुंदी हरवून गेली माझ्याकडून. श्रीचं सगळं आयुष्यच अशा हाय वर चालतं. त्याला किक हवी असते. ती त्याने बाहेर शोधलीये कुठेतरी. त्याचं बाहेर जास्त राहणं , मधेच गिल्टी वाटून घेऊन आम्हा तिघांशी एक्सट्रा प्रेमाने वागणं, टीनएजर सारखं सतत मोबाईल घेऊन बसणं.... त्याला वाटतंय मला कळत  नाहीये पण मी आतून तुटतेय गं..... मोडून पडतेय मी." तिघींच्याही डोळ्यातून आता पाणी येत होतं. 

"नको रडू मोहना. तुला खात्री आहे का? की तुझी स्पेक्युलेशन्स आहेत ही सगळी? तू बघितलंयस का त्याला कोणाबरोबर? कोणाकडून ऐकलंयस का काही?" अंजलीला विश्वास ठेवणं कठीण जात होतं. "नाही ग. पण पक्की खात्री आहे मला. आमचा जुना फ्लॅट आहे ना अंधेरीला. गेल्या शुक्रवारी श्री त्या फ्लॅटची चावी घरातून हळूच घेऊन गेला, पुण्याला केस आहे सांगून ! त्याला वाटलं मला कळणार नाही आणि मलासुद्धा वाटतं की त्याच्यावर लक्ष ठेऊच नये. कशाला उगाच डोक्याला त्रास. पण मला जमतच नाहीये! आमच्या..... आमच्या फ्लॅटवर तो कोणाला तरी घेऊन गेला!" मोहना हुंदके देत रडत होती. गोरंमोरं होऊन त्यांनी आजूबाजूला पाहिलं पण कोणाचंच या तिघींकडे लक्ष नव्हतं. "शालिनी तू श्री बरोबर थिएटर (ऑपरेशन थिएटर) करतेस ना कधीकधी .... कोणा नर्स बरोबर वगैरे चाललंय का त्याचं काही?" अंजलीने शालिनीला विचारलं . "मला नाही लक्षात आलं ग कधी" कसनुश्या चेहर्याने शालिनीने उत्तर दिलं. आशिष गेला, मोहनाचं हे असं आणि शालिनी तर कायमच एकटी. विचार करून अंजलीचं डोकं सुन्न झालं. तिने आणि शालिनीने मोहनाला परोपरीने समजावायचा प्रयत्न केला की यात तिची काही चूक नाही, तिने गिल्टी वाटून घेता कामा नये, उलट श्रीला थोडा दम दिला पाहिजे. त्यांनी श्रीशी बोलावं का असंही अंजलीने विचारलं पण मोहना नको म्हणाली. ती खिडकी बाहेर शून्यात बघत होती. अंजलीची नजर बाहेर गेली. ओहोटीने समुद्राला खूप मागे खेचलं होतं. किनारा लाटांच्या खुणा उरावर घेऊन भरतीची वाट पहात स्तब्ध होता. शेवटी त्यांनी आवरतं घेतलं . सवयीप्रमाणे तिघींनी बिल डिव्हाइड केलं .

 शालिनीने क्रेडिट कार्डने पैसे भरले आणि दोघीनी तिला कॅश दिली. आशिष नेहेमी त्यांच्या या सवयीला हसायचा. "जिवाभावाच्या मैत्रिणी पण एकमेकींचं बिल नाही भरत !!" "अरे त्यामुळे कितीही वेळा मोकळेपणाने भेटता येतं, कोणावरही प्रेशर राहात नाही" अंजली म्हणायची.

शालिनीला एक तासात क्लिनिक होतं म्हणून तिने दोघींचा निरोप घेतला आणि ती निघाली. त्या भेटीने तिचंसुद्धा डोकं भणभणत होतं. बाहेर पार्किंगमधे  तिचा ड्राइवर गाडीच्या काचा खाली करून गाडीतच बसला होता. एवढ्यात तिचा मोबाईल वाजला . फोनची स्क्रीन बघून तिने हातानेच ड्रायव्हरला 'तू जा'  अशी खूण केली. तो गेल्यावर तिने मोबाईल उचलला. धारदार आवाजात ती बोलू लागली, "मोहनाशी बोलून आलेय मी. ढसाढसा रडत होती ती . तू तुझी बायको सोडशीलही कदाचित पण मी माझी मैत्री तोडणार नाही. डोकं फिरलं होतं माझं म्हणून तुझ्या मोहात अडकले. पण आता माझी अक्कल जागेवर आली आहे. तुझ्या अंधेरीच्या फ्लॅटची चावी उद्या ड्रायव्हरकडे पाठवून देते." पलीकडचा शब्दही न ऐकता तिने फोन कट केला आणि मान वळवली. तिचं विसरलेलं क्रेडिट कार्ड हातात घेऊन अंजली जस्ट तिथे आली होती आणि शालिनीचं फक्त शेवटचं वाक्य - फ्लॅटच्या चावीबद्दलचं तिच्या कानावर पडलं होतं. संताप, फसवणूक, घृणा सगळे भाव अंजलीच्या चेहर्यावर एकाच वेळी दाटले होते. " यू आर डिसगास्टिंग शालिनी , लाज नाही वाटली तुला!" अंजली कडाडली. शालिनीचं कार्ड तिच्यासमोर भिरकावून देऊन अंजली मागे वळली आणि रेस्टाॅरंटच्या आत मोहनाकडे गेली. शरमेने , दुःखाने शालिनीचा चेहरा झाकोळून गेला. अंजली गेली होती त्या दिशेला तिने बघितलं . खरंच त्या समोरच्या काचेला खूप मोठा तडा गेला होता.

सुखाची किल्ली (कविता)

 

 

इतक्या दिवसांनी आज पुन्हा आले घरी
संसाराने हैराण झाले
माहेरीच मी बरी

सोन्यासारखा नवरा तुझा, मुलं मोत्यासारखी
ऐकते तेव्हा कधी कधी मीच होते परकी

आपल्याच पसंतीचा नवरा
आणि मुलंसुद्धा आपली
भरला संसार असताना
ही तळमळ तरी कसली

संसार काही थांबत नाही
आणि तळमळ काही संपत नाही

शेवटी म्हटलं देवा आता तूच सोक्षमोक्ष कर
लेक तुझी व्याकुळ इथे
तू बरा बसलायस वर

ह्याची बायको, त्याची आई
याच्याशिवाय मला माझं
वेगळं अस्तित्व आहे की नाही !!

मुलगा मुलगी समान असतात,
शाळेत सांगितलं जायचं
पण हेच करायचंय तर मुलींना डोकं कशाला द्यायचं !!

देव हसला आणि म्हणाला
तुला नेमकं काय हवय
स्वतःची वेगळी ओळख हवीये
की तुला समाधान हवय

स्वतःची वेगळी ओळख असणारा
प्रत्येक जण काही सुखी नसतो
माझ्या लाडक्या बाळा तुला
सुखाची किल्ली मी आज देतो

ज्या लक्ष्मीला पुजता तुम्ही, ती विष्णूचे पाय चेपते
सीतासुद्धा रामाबरोबर आनंदाने वनवास घेते

'मिळवण्यातच' सुख आहे, हा तर एक भ्रम आहे
सुखाचा खरा ठेवा तर, फक्त 'समर्पण' आहे

फुलबाजीसारखी तडतडू नको
ज्योतीसारखी तेवत रहा
चंदनासारखी झिजशील तेव्हा
सुगंधाला दिशा दहा

आपली कर्म चोख कर
प्रेमाने कर, आनंदाने कर
तुला सुख समाधानाचा
मनःशांतीचा मी देईन वर

संसाराचा जेव्हा वाटेल भार
तेव्हा वृद्धाश्रमात फेरी मार

इतरांची दुःख जेव्हा बघशील
तुझ्या ठेव्याची किंमत जाणशील

लोकांना जेव्हा आनंद देशील
तेव्हा मीही वरून हसत असेन
माझ्या हातांनी तुझ्यावर
आशीर्वाद बरसत असेन

तू हिशोब ठेऊ नकोस
तू फक्त विश्वास ठेव
'कर्म' आणि 'समर्पणालाच'
सुख, समाधान देतो देव

 

डॉ. माधुरी ठाकुर
 

Monday 6 February 2017

उत्तर (कथा)


"आता निघालं पाहिजे म्हणजे थोडा वेळ फ्रेश होऊन नाईटसाठी येता येईल" मनगटावरच्या घड्याळाकडे पाहून तिच्या मनात विचार आला. नेहेमीप्रमाणे वॉर्डमधल्या नर्सला सगळ्या सूचना देऊन ती निघाली. गाडी तिने ए ऐवजी बी विंगकडे वळवली. आशिषचं असं झाल्यानंतर अंजलीचे आईवडील तिच्याच सोसायटीमध्ये राहायला आले होते. अंजलीच्या मुलीची, रियाची सगळी काळजी ते घेत होते. रियालाही आजी आजोबांबरोबर राहायला आवडत होतं. सगळं सोयीचं असलं तरीही मुलीकडे आपण पुरेसं लक्ष देत नाही आहोत या विचाराने अंजलीला फार अपराधी वाटत असे. आशिषचं दुःख विसरण्यासाठी तिने स्वतःला कामात झोकून दिलं होतं. आणि तिचा पेशाही तसाच होता. डॉक्टरच्या व्यक्तिगत आयुष्याची ओढाताण ही ठरलेलीच! त्यात अंजलीच्या संसाराची गाडी तर एकाच चाकावर चालली होती.

अंजली घरी आली तेव्हा आजोबा रियाला सोसायटीच्या कंपाउन्डमधे खेळायला घेऊन गेले होते. आईने अंजलीच्या हातात चहाचा कप आणि उपमा ठेवला. मायलेकींच्या गप्पा सुरु झाल्या. "अगं हो, सकाळी रियाच्या टीचरशी मीटिंग कशी झाली?" आजीने उत्सुकतेने विचारलं. "काही विशेष नाही गं, नेहेमीचंच , सगळं छान छान आहे. मी म्हटलं त्यांना की ह्यांना जास्त अभ्यास का नाही देत! मला रियाच्या वयाचं असताना केवढ्या अभ्यासाची सवय होती. रिया तर अर्धा तासही धड बसत नाही", अंजलीने काळजीने म्हटलं. "अगं ते दिवस वेगळे होते,आता नवीन पद्धती वेगळ्या आहेत"
"हो गं, पण शेवटी तिला जर प्रोफेशनल करिअर करायचं असेल तर मेहेनतीची सवय नको का आतापासून?" अंजलीने नाराजीच्या सुरात म्हटलं. "राहूदे आता. त्या पाच वर्षाच्या मुलीच्या अभ्यासाची उगीच चिंता करू नकोस, तुला निघायचंय ना लगेच, मग थोडा आराम कर" अंजलीचं मन भरून आलं. आशिष अकाली गेला असला तरी तिच्या आईवडलांचा तिला केवढातरी आधार होता.

    आज रात्री अंजली हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डला होती. नेहेमीप्रमाणे एक दोन रोड ऍक्सिडंट केसेस, एखादं सिव्हिअर इन्फेकशन, लहान सहान दुखणं खुपणं , तापाने फणफणलेलं एक लहान मूल ..... घड्याळाचे काटे सरकत होते. बाहेर थोडा गलका झाला. हॉस्पिटल जवळच एक झोपडपट्टी होती. तिथले बरेच पेशंट्स या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमधेच येत असत. आताही तिथून एक बाई आली होती. सोबत तिथली अजून लोकंसुद्धा होती. बाईचं अर्ध्याहून अधिक शरीर भाजलं होतं. ती दुःखानं विव्हळत होती. तिची अवस्था बघवत नव्हती. अंजलीने बर्न्स वॉर्डच्या डॉक्टरना कळवायला सांगून लगेच ट्रीटमेंट सुरु केली. नेहेमीप्रमाणे सासरच्या लोकांचं म्हणणं होतं की स्टोव्हचा भडका उडाला होता. बहुतेक स्टोव्हबर्नच्या  केसेस प्रमाणे याही केसमध्ये लग्नाला चार वर्ष होऊन घरात पाळणा हलला नव्हता. पेशंटला बर्न वॉर्डमध्ये ट्रान्स्फर करायला अंजली स्वतः गेली. ट्रान्सफर प्रोसिजर तिने पूर्ण केली. पण डॉक्टर प्रधानांचा चेहरा बघूनच पेशंटच्या जगण्याची फारशी आशा नाहीये हे तिला कळून चुकलं . अंजली खरंतर अशी हळवी नव्हती पण आशिष अचानक गेल्यापासून मृत्यूला असं अचानक समोर पाहून तिला हतबल, हताश वाटायचं .

पोलीस  आले. एफआयआर लॉज झाला. रात्री तीन वाजता कोण चहा पिणार होतं आणि स्टोव्ह का पेटवला ह्या प्रश्नांना काहीतरी थातुरमातुर उत्तरं मिळणार आहेत हे आता अनुभवातून अंजलीला चांगलंच माहीत होतं. गेल्या एक दोन वेळी हॉस्पिटलच्या चीफ मेडिकल ऑफिसर (CMO) बरोबर तिची याबद्दल मीटिंग झाली होती. CMO सुद्धा अतिशय चांगले गृहस्थ होते पण सगळ्या फॉर्मालिटीज मुळे त्यांना फार काही करता येणार नव्हतं.
     रात्र कशीबशी संपली होती. उद्विग्न , हताश मनाने अंजली गाडीत येऊन बसली. गाडीबरोबर तिच्या मनाची चाकंसुद्धा गरागरा फिरू लागली. "काय करतोय आपण? मी इथे असले काय आणि नसले काय..... त्या भाजलेल्या पेशंटसारख्या कितीजणी मरायच्या त्या मरतातच. आणि मी काहीच करू शकत नाही. आणि या कामांमध्ये पोटच्या गोळ्याकडेसुद्धा दुर्लक्ष होतंय. आशिष नाही म्हटल्यावर खरंतर आपण रियाला दुप्पट वेळ द्यायला हवा. ते तर राहिलंच, बाकीच्या ऑफिसला जाणार्या बायकांएवढाही वेळ मी तिला देऊ शकत नाही. आणि आई, बाबा, ते म्हणत नाहीत पण त्यांचं वय झालय. या वयात मी त्यांना सांभाळायचं तर उलट माझ्या मुलीला सांभाळायचं काम मी त्यांना लावून दिलंय ! आयुष्यभर मी किती चांगली स्टुडन्ट होते. मग अशी कशी अवस्था झाली माझ्या आयुष्याची....... आशिष तू कसा रे गेलास !!!"
      लिफ्टच्या आरशात बघून तिने चेहरा ठीकठाक केला. तिला रडताना बघून रिया बावरली असती. घरात शिरली तर रिया होमवर्क करत बसली होती. "रिया स्कूलबॅग भर. मी मम्माला चहा घेऊन येते" म्हणून आजी आत गेली. अंजली हायपाय धुऊन रियाच्या बाजूला येऊन बसली. रियाला तिने मांडीवर घेतलं. एका हाताने रियाला धरून दुसर्या हाताने तिने तिची होमवर्कची वही घेतली. रियाचा होमवर्क ऑलमोस्ट पूर्ण झाला होता पण त्यात बर्याच चुका होत्या. ते पाहून तिला थोडं टेन्शन आलं. तिचं स्वतःचं सगळं काम बिनचूक असायचं. पण तिला रियाला दुखवायचंही नव्हतं. रियाला जवळ घेऊन ती म्हणाली, "अगं सोनू तुझ्या होमवर्क मधे खूप चुका आहेत अजून, टीचर ओरडणार नाही का?" रियाने हसून तिचे हात मम्माच्या गळ्यात घातले आणि म्हणाली "मम्मा टीचरने सांगितलंय Don't worry, Just give your best shot" आपल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या चिमण्या पिल्लाच्या एका वाक्यात आहेत असं अंजलीला वाटलं. तिने एक मोकळा श्वास घेतला आणि रियाला जवळ घेऊन हसून म्हणाली "बरोबर सांगितलंय टीचरने" 

Friday 3 February 2017

झेप (कविता)



पक्ष्यांनी तर उंच उडावे 
क्षिती नसावी पडण्याची
अन भीती नसावी आभाळाची
डोळ्यांमधल्या स्वप्नांसाठी
पक्ष्यांनी तर उंच उडावे

पिंजरे सगळे तॊडून टाकून
दाणे पेरू मागे सोडून
नजर लावूनी निळ्या नभांवरी 
पक्ष्यांनी तर उंच उडावे

कुणी क्वचित मेघांत हरवतील 
इंद्रधनूच्या पारही जातील,
ना जावे तर कसे कळावे
पक्ष्यांनी तर उंच उडावे

शोध नव्हे हा आभाळाचा
शोध पंखांतील बळाचा
गंगनभरारी घेताना पक्ष्याने स्वतःला तोलावे
पक्ष्यांनी तर उंच उडावे

डॉ. माधुरी ठाकुर


Wednesday 1 February 2017

तृप्ती (लेख)

"ज्याला सगळं भरभरून मिळालय त्याला gratefullness च्या गोष्टी करणं सोपं आहे. माझ्यासारखं वर्षानुवर्ष त्रास काढल्यावर या सगळ्या नुसत्या बोलायच्या गोष्टी वाटतात." सामोरच्या व्यक्तीचं ते बोलणं त्या क्षणाला मला रास्तच वाटलं . पण नंतर बोलण्याच्या ओघात जेव्हा त्यांच्या आयुष्यातल्या इतर गोष्टींबद्दल बोललो तेव्हा मला जाणवलं की बाकी बर्याच front वर त्याच व्यक्तीचं उत्तम चालू होतं. मात्र अजाणता का होईना त्या व्यक्तीने स्वतःच्या आयुष्याच्या कॅनव्हसवरच्या  त्या एका dark spot कडे स्वतःचं सगळं लक्ष केंद्रित केलं होतं. त्यामुळे त्यांना अक्खा कॅनव्हासच काळा वाटत होता.

       एखादं मोठं चित्र नीट पाहायचं असेल तर थोडं मागे जाऊन पूर्ण चित्र एका नजरेत पाहावं लागतं . म्हणजे सगळ्या अंगांनी ते दिसतं, आणि लक्षात येतं की एखादा कोपरा जरी थोडा बिघडला असला तरी ओव्हरऑल चित्र काही अगदी टाकाऊ नाही आहे. आपल्यापैकी बहुतेकांच्या आयुष्याचंही काहीसं असच नसतं का? एखादी गोष्ट, एखादं नातं, कधी पैसा, कधी शिक्षण, कधी करिअर , कधी मुलं, एखाद्या ठिकाणी आपण थोडे कमी असलो तरी बाकी बर्याच front वर आपण बरे असतो की! मग आपण सदैव कुरकुर कसली करत असतो?

      काही लोक बघावं तेव्हा हसत असतात, खुश असतात. ज्यांना हे जमत नाही ते बर्याच वेळा अशा दिलखुष लोकांना shallow (उथळ) समजतात. उलट काही लोक सदानकदा त्रस्त असतात. त्यांच्याकडे त्रासलेलं असायला काही कारणंही असतात. पण हीच कारणं सो कॉल्ड shallow किंवा दिलखुष लोकांकडे नसतात असं नाही. माझ्या ओळखीच्या एक बाई आहेत. पन्नाशीच्या आहेत. नवरा लवकर गेला. त्यांना अठरा वर्षांचा ऑटिस्टिक मुलगा आहे. त्याचे दात घासण्यापासून , ते आंघोळीपर्यंत सगळं काही या बाईंनाच करावं लागतं आणि आयुष्यभर करावंच लागणार. शिवाय पोटापाण्यासाठी नोकरी. परदेशात काही विशेष मदतीशिवाय या बाई समर्थपणे हे करतायत. आणि त्या मला सांगत होत्या ,"ही एवढी गोष्ट आहे पण बाकी काही (!!) त्रास नाही. 'त्या'ने मला सगळं दिलय. अडचणी येतातच, नाही असं नाही but finally everything falls into place.... !!! आणि 'तो' आहे ना, 'त्या'ने आतापर्यंत सगळी काळजी घेतलीच ना , पुढेही 'तो' घेणारच! त्यामुळे मला भीती वाटत नाही उलट तृप्त वाटतं." मी अवाक !! विश्वासातून आलेली कृतज्ञता की कृतज्ञतेतून आलेला विश्वास! काय माहीत पण या दोन्हीच्या बळावर या बाई आपली कर्तव्य व्यवस्थित पार पाडून इतक्या कठीण परिस्थितीतही 'तृप्त'ता आनुभवतायत....

      मग आमचंच घोडं कुठे पेंड खातं ? आम्हाला हा peace , ही तृप्ती का अनुभवता येत नाही? माझ्या एका अतिशय प्रिय व्यक्तीने मला सांगितलंय की 'अधून मधून आयुष्याकडे मागे वळून पहा. तुझ्या आयुष्यातले सारे चांगले आणि वाईट  प्रसंग आठव. मग तुला जाणवेल की खरंतर आपल्या आयुष्यात खूपशा चांगल्या गोष्टी घडल्यायत. आणि ज्या थोड्या वाईट गोष्टी घडल्या त्यातूनही तू तरली आहेस आणि आज उभी आहेस. मग आतापर्यंत उभी आहेस तशी पुढेही तऱशीलच. मार्ग काढशीलच. हा विचार तुला झुंजायला बळ देईल. तसच त्यामुळे तुझी आयुष्याबद्दलची कृतज्ञता वाढेल' . मी अधून मधून अशी वळून बघते and it works खरंच कृतज्ञतेने माझं मन भरून येतं . थोड्या वेळापुरतं का होईना मला 'तृप्त', content वाटतं. तृप्तीचा हा सुखद अनुभव जो अधून मधून येतो तोच आपली constant state of mind झाला तर  ... किती सुंदर होईल ना आयुष्य ?

डाॅ. माधुरी ठाकुर