Friday 18 August 2017

चॅलेंज भाग ५ (अंतिम)



चॅलेंज भाग ५ (अंतिम)


एक विचित्र शांतता टेबलवर पसरली होती. इतक्यात नेमका मीराचा फोन वाजला. “हो हो, मी येतेच थोड्या वेळात” म्हणून तिने फोन ठेवला. सगळ्यांच्या चेहर्यावरची प्रश्नचिन्ह पाहून तिने म्हटलं, “रसिक, बुकस्टोअरवाला”


“तो कशाला तुला फोन करतो?” शौनकने तत्काळ प्रश्न केला.


“बुकस्टोअरवाला कशाला फोन करेल! पुस्तकांबद्दलच करेल ना!” दिगंतने परस्पर शौनकला उत्तर दिलं.


“नाहीतर काय! मी पुस्तकं मागवली होती. ती आली आहेत. ते थोड्या वेळाने दुकान बंद करतील. म्हणून लवकर येऊन घेऊन जायला सांगत होता. तुझं ते हार्पर लीचं पुस्तक सुद्धा मागवलं होतं, तेसुद्धा आलंय” मीराने शौनकला म्हटलं आणि पुढे “कशाला फोन करतो म्हणे!” म्हणून वैतागून मान हलवली. मग तिने मनगटावरच्या घड्याळात पाहिलं, ती अवनीला म्हणाली, “अवनी, तू तुझा अनुभव सांगायला सुरुवात करतेस, मला थोड्या वेळात निघावं लागेल.”


अवनीने वाचायला सुरुवात केली.


परवा रोहनशी सॉलिड वाजलं. आता हा मला सांगतो, उद्या काही प्लान नको करू. आपण घरच्यांबरोबर डिनरला जाऊ. मी तर माझ्या ग्रूपबरोबर टोटोस (क्लब) चा प्लान आधीच केला होता. मग वादावादी. दोघांचंही म्हणणं ‘तू मला आधी का नाही सांगितलस’ रोहनच्या आईवडलांची अॅनिव्हर्सरी आहे हे तो पूर्ण विसरला होता. मी नेहमीप्रमाणे आम्ही जाणारच असं धरून चालले होते. तर रोहनने मला विचारलं, “खरं सांग, तू तरी दर शनिवारी हे पब्स, पार्टीज एन्जॉय करतेस का?” एरवी मी ‘हो’च म्हटलं असतं. पण हे चॅलेंज आडवं आलं. मी म्हटलं, “Not exactly, कधी कधी कंटाळा येतो.” त्यावर तो लगेच म्हणाला, “आता मला कंटाळा आलाय”. मी म्हणाले, “मला कंटाळा आला तरी मी जाते” तर खदाखदा हसायला लागला आणि म्हणाला, “You are stupid ! पंचविशी आली तरी तू अजून टीनएजर सारखीच वागतेयस. तुला मोठं व्हायचच नाहीये. पण तू कितीही तशीच वागलीस तरीही तू मोठी होतेच आहेस.” असलं झोंबलं त्याचं बोलणं, खरं असलं तरीही ! शेवटी काल रात्री रोहनच्या फॅमिलीबरोबर डिनरला गेले. थोडं टेन्शन होतं. But they were cool. नशिबाने त्यांनी काही ऑकवर्ड प्रश्न विचारले नाहीत. नाहीतर भावी आयुष्याचा विचार करून चॅलेंज मोडलं असतं.

 

मी झाराच्या टॉपमधला माझा फोटो फेसबुकवर टाकला होता. खूप लाइक्स आले पण चैताली आणि पारुलने लाईक नाही केला. गेल्या आठवड्यात त्यांचे फोटोज मी लाईक नव्हते केले. Thanks to Digant’s challenge! म्हणूनच असणार. हे चॅलेंज असंच चालू राहिलं तर माझे अर्धेअधिक फ्रेंड्स तुटतील. रोहनला असं सांगितलं तर म्हणतो, “तुझे सगळे वरवरचे fake फ्रेंड्स तुटतील. ही चांगलीच गोष्ट आहे”


गेल्या सोमवारी पुन्हा उशीर झाला. ऑफिसमधला आमचा पारशी बावा तर थांबलेलाच असतो मला कारण विचारायला. या वेळी मी सरळ सांगून टाकलं, “शनिवारी जागरणं झालं, रविवारी उशिरा उठले, पुन्हा रात्री झोप लागत नव्हती आणि आज सकाळी जाग येत नव्हती” त्यावर खो खो हसून म्हणतो, “आज फर्स्ट टाईम तूनी खरं सांगितला, रोज ट्राफिक आनी पंक्चरच्या स्टोरीज बनवते. खरं सांगेल तर मी तुजी हेल्प करेल ना बाबा. प्रॉब्लेमचा रूट कॉज शोधेल तरच प्रॉब्लेम सुटेल ना.” जो उठतो तो माझ्या Saturday nights वरच घसरतोय! दिगंत तुझ्या या चॅलेंजपायी अर्धा तास लेक्चर खाल्लं मी !


काल एका नवीन क्लाएंट बरोबर आमची मीटिंग होती. एक छोटी फर्म आहे. त्यांना आमच्याकडून सॉफ्टवेअर डीव्हेलप करून हवंय. बॉसने मला बोलणी करायला जायला सांगितलं होतं. हल्ली बॉस मला अधिकाधिक जबाबदार्या देत आहे. ही चांगली, प्रमोशनची लक्षणं आहेत. मी गेले. जे टाईमस्केल त्यांनी सुचवलं होतं, ते पाळणं प्रॅक्टीकली शक्यच नव्हतं. बहुतेक वेळा असंच होतं. आधी सगळी बोलणी ही संदिग्ध अशी असतात. नंतर फायनल मीटिंगच्या वेळी जेव्हा टाईमस्केल वगैरे गोष्टी नक्की केल्या जातात तेव्हा आम्हांला contract खिशात टाकायची इतकी घाई झालेली असते की क्लाएंट म्हणतील त्या सगळ्याला हो म्हटलं जातं. मग शेवटी प्रोजेक्ट लाईव व्हायची वेळ आली की सगळ्यांची वाट लागते. सगळ्यांवर ताण येतो. हा विचार करून मी या मीटिंगमधे सांगितलं की “या बजेटमध्ये माझी सहा जणांची टीम या प्रोजेक्टवर काम करणार आहे. सहा जणांना हे काम तीन महिन्यांत पूर्ण करणं शक्यच नाही. तुम्हाला शब्द देऊन मग मागे फिरायला मला आवडणार नाही. त्यापेक्षा जे खरोखरी शक्य आहे तेच कबूल करणं मला आवडेल. एक तर टाईमस्केल तीनऐवजी चार महिने करावं किंवा बजेट वाढवावं म्हणजे जास्त लोकांना हाताशी घेऊन काम तीन महिन्यांत करता येईल.” क्लाएंटना विचित्र वाटलं असावं. ते दोन दिवसांत कळवतो म्हणून निघून गेले. नंतर बॉस माझ्यावर अस्सा उखडला. ‘असं कशाला सांगायचं, हो म्हणून टाकायचं ना...’ त्यावर मी म्हणाले “पण ते पूर्ण करणं आपल्याला शक्य झालंच नसतं.” “अरे लेकिन बोलने में क्या जाता है?” सत्याचं पालन करणं भारीच अवघड आहे. प्रमोशन तर गेलंच हे मला कळून चुकलं.


आज बॉसने मला केबिनमध्ये बोलावलं तेव्हा मला धडकीच भरली की आता फायर करतो की काय. पण झालं उलटंच. क्लाएंटचा फोन आला होता. त्यांनी प्रोजेक्ट आम्हांला द्यायचा निर्णय घेतला होता. तोही आमच्या चार महिन्यांच्या टाईमस्केलसकट. मला आनंदाने नाचावसं वाटलं. बॉस त्यापुढे म्हणाला की त्यांनी स्पेशली सांगितलय, तुमच्या कंपनीच्या त्या फीमेल टीमलीडरचा प्रामाणिकपणा आणि स्पष्टवक्तेपणा या दोन्ही गोष्टी आम्हांला अतिशय आवडल्या. अशी उत्तम principles (तत्वं) असलेल्या लोकांबरोबर काम करायला आम्हांला आवडेल. मी मनातल्या मनात त्याच क्षणी दिगंतचे आभार मानले. नेहमी हे असंच होणार नाही याची जाणीव मला आहे. पण सत्याची किंमत असलेले काही लोक तरी या जगात आहेत हे पाहून मला खूप बरं वाटलं.

अवनीचं वाचून झालं. “ओ हो हो.... म्हणजे प्रमोशन नक्की आहे तर !” दिगंतने हसून अवनीला विचारलं. “बहुतेक तरी आहे. बघूया” अवनीने उत्तर दिलं. ती पुढे म्हणाली, “यात लिहिलं नाहीये, कारण लिहायला वेळच नव्हता. पण मी हे चॅलेंज हरलेय.”


“हरलीयेस, का?” दिगंत आणि शौनक दोघांनीही एकदमच विचारलं. मीराचा चेहरा पडला होता.


“तुझ्यामुळे शौनक, तुझ्यामुळे” अवनीने उसळून म्हटलं.


“माझ्यामुळे?” शौनक पुरता चक्रावला होता. “माझा संबंध काय? आपण गेल्या महिन्यानंतर आज भेटतोय!”


“तूच! आत्ता मी घरातून निघतंच होते एवढ्यात मोबाईल वाजला. मीराच्या घरचा नंबर होता. मीराचाच असेल असं वाटून मी उचलला. पण फोन काकूंचा, मीराच्या आईचा होता. त्या मला सांगू लागल्या की कशी मीरा सगळ्या स्थळाना नाही म्हणतेय. आता हा एवढा चांगला अमेरिकेचा मुलगा सांगून आलाय. सगळं चांगलं आहे. दोघी बहिणी एकाच शहरात रहातील. पण ही भेटणं तर दूरच त्याच्याशी बोलतही नाहीये. आणि मग त्यांनी मला विचारलं, ‘तू तिची मैत्रीण आहेस, तुला सगळं माहीतच असणार. तिचं कोणाशी काही चाललंय का? अशी का वागतेय ती?’”


“मग तू काय म्हणालीस?” शौनकने विचारलं.


मीराचा चेहरा इतका पडला होता की ती आता कधीही रडेल असं वाटत होतं.


“काय सांगायला पाहिजे होतं मी?” अवनीने चिडून शौनाकलाच उलट विचारलं. “काही चालू नाहीये असंच सांगितलं. जरी मला डोळ्यासमोर दिसतंय, की तिला तू आवडतोस. तूही तिला सिग्नल देत असतोस, घ्यायला येऊ, सोडायला येऊ, हक्क गाजवत असतोस, पुस्तक आण, फोन कर, तो अमका तुला फोन कशाला करतो हेसुद्धा विचारतोस पण स्वतः मात्र कमिट करत नाहीस. दिसत नाही का तुला, ती तू विचारण्याची वाट पाहतेय ते!”


शौनकने ओशाळून मीराकडे पाहिलं. तिचे डोळे डबडबले होते.


टेबलवर पुढे सरकून त्याने समोर बसलेल्या तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, “मीरा मला तुझ्याबद्दल काय वाटतं हे तुलासुद्धा कळतंच ना? बोलूनच सगळं सांगायला हवं का? घरून इतकं प्रेशर येतंय तर मला सांगायचस ना. पुढच्या वर्षी माझी शेवटची परीक्षा आहे म्हणून मी त्या आधी काही बोलत नव्हतो. पण तुला घरून एवढं दडपण येत असेल तर घरी येऊन भेटलंच पाहिजे. माझ्या आईबाबांना सुद्धा सांगतो मी. Don’t worry! माझ्या मीराला अशी कशी सोडेन मी!” त्याच्या वाक्यावाक्यागणिक मीराचा चेहरा बदलत गेला. मळभ दूर होऊन लक्ख सूर्यप्रकाश यावा तसं तिला वाटलं. तिने फक्त हो म्हणून मान हलवली. लाजून तिने शौनकच्या हातातला आपला हात सोडवून घेतला आणि स्वतःच्या डोळ्यांच्या ओल्या कडा टिपल्या. मग तिने बाजूच्या खुर्चीवर बसलेल्या अवनीला “थँक्यू” म्हणून घट्ट मिठी मारली. अवनीनेही हसून तिला जवळ घेतलं. दिगंतने शौनकच्या खांद्यावर थाप मारून त्याला “वेल डन ! देर आए दुरुस्त आए!” म्हणून अभिनंदन केलं. आपला चेहरा ठीकठाक करायला मीरा वॉशरूमकडे गेली. हे तिघे टेबलपाशी बसले होते.


“तुझ्या या चक्करमधे मी चॅलेंज हरले.” अवनी हसत हसत शौनकला म्हणाली.


“तू चॅलेंजचं सांगतेयस,” दिगंतकडे वळून शौनक म्हणाला, “या शहाण्याच्या चॅलेंजमधे माझी तर आयुष्यभराची विकेट गेली.” रागावल्याचा आव आणून तो पुढे म्हणाला, “एंगेजमेंट आणि लग्नाच्या नादात मी जर परीक्षेत फेल झालो तर तू जबाबदार आहेस दिगंत, लक्षात ठेव”


दिगंत चिडवायची संधी थोडीच सोडणार. तो उलट म्हणाला, “अस्सं? जाऊदे. तू शांत चित्ताने तुझ्या परीक्षा दे. मी मीराशी लग्न करतो.”


“ए Ѕ Ѕ Ѕ” म्हणत शौनकने दिगंतवर बुक्का उगारला. “वहिनी आहे तुझी ती” दोघेही मोठमोठ्याने हसू लागले. अवनीने सुद्धा हलकसं स्मित केलं.


मीरा परत येऊन खुर्चीत बसणार इतक्यात बुक स्टोअरमधून पुन्हा फोन आला. “सॉरी, मला निघायला हवं.” तिने उठत या तिघांना म्हटलं. शौनकसुद्धा उभा राहिला आणि हसून म्हणाला, “खरं तर मी त्या बाजूला जात नाहीये. पण चल तुला सोडून पुढे जातो” घाईतच मीरा आणि शौनक निघाले.


“लवबर्डस उडाले. मीरा पुढच्या वेळचं चॅलेंज सांगायला विसरलीच की!” ते गेले त्या दिशेला बघंत दिगंत उद्गारला. तो आणि अवनीसुद्धा कॅफेच्या बाहेर आले. दिगंत आता निघणार इतक्यात अवनीने त्याला थांबवलं. ती म्हणाली, “दिगंत, आपण गमतीत, मस्करीतसुद्धा जे म्हणतो ना त्यात नेहमी एक टक्का सत्य असतंच. तू जे मी मीराबरोबर लग्न करतो म्हणालास त्यातही कुठेतरी थोडसं तसं आहे ना? नेहमी तिची काळजी घेतोस, तिची बाजू घेतोस, मैत्रीच्या पुढे, तुझ्या मनात तिच्याबद्दल प्रेम आहे ना?”


दिगंत काहीच न बोलता शांत राहिला.


“दिगंत....?” अवनीने पुन्हा विचारलं.


दिगंतने उत्तर दिलं, “सत्याचं चॅलेंज आता संपलय अवनी” आणि तो एकटाच त्याच्या दिशेने निघाला.


समाप्त

डॉ. माधुरी ठाकुर

https://drmadhurithakur.blogspot.co.uk/

Thursday 17 August 2017

चॅलेंज भाग ४


“आता तू वाचतेस का, मीरा?” दिगंतने मीराला विचारलं. नेमकं त्याच वेळी कॅफेचं दार कोणीतरी उघडलं आणि वार्याची एक झुळूक आत आली. त्या झुळकेने शौनकच्या डायरीचं पान उडालं, ते नेमकं दिगंतने पाहिलं.
“अरे तू अजून लिहिलयंस, मग हे का नाही वाचलंस?”


“जाऊदे रे, झालंय माझं” शौनकने ते लिहिलेलं पान हाताने झाकून म्हटलं.
“अरे असं कसं, पूर्ण सत्य नको का?” दिगंत पिच्छा सोडणार्यातला नव्हता. मीरा आणि अवनीलासुद्धा आता काय लिहिलं आहे, आणि झाकलं आहे याची उत्सुकता होती. किती विचित्र आहे ना मनुष्य स्वभाव. काही समोर ठेवा, वाचायला सांगा, कोणी ढुंकून बघणार नाही. पण तेच झाकून ठेवा, लपवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकाला ते काय आहे ते बघायला उत्साह असेल. शेवटी वैतागून शौनकने “घे तूच वाच” म्हणून डायरी दिगंतकडे ढकलली. दिगंत मोठ्याने वाचू लागला.


दोन आठवड्यांपूर्वी ती बाई नवर्याबरोबर क्लिनिकला आली. पस्तिशीची, साधारण सुखवस्तू कुटुंबातली. ते मूळचे नागपूरचे होते. नवर्याच्या नोकरीनिमित्त गेली दहा वर्ष मुंबईत. तिला पित्ताशयाचा त्रास होता. लक्षणांवरून खडे झाले असावेत असं वाटत होतं. मीच तिला तपासलं. आणखी काही टेस्ट्स करून लिहून दिल्या. एका आठवड्याने जेव्हा ते आले तेव्हा शाळेला सुट्टी होती म्हणून त्यांची मुलंसुद्धा सोबत आली होती. सात आठ वर्षांची असावीत दोघंही. रिपोर्टमधे अपेक्षेप्रमाणेच पित्ताशयात खडे आहेत असं दिसत होतं. पिताशय काढून टाकणं हाच खात्रीलायक उपाय असतो. एक नॉर्मल ऑपरेशन असतं. आम्ही अगदी नेहमी करतो. मी त्यांना ऑपरेशन करून घ्यावं लागेल असं सांगितलं.


“उद्या संध्याकाळी अॅडमिट झालात तर परवा, बुधवारी सकाळी करून टाकू. गुरुवारी घरी जाता येईल.” मी सांगितलं. पण नेमका बुधवारी तिच्या मुलाचा स्कॉलरशिपचा क्लास होता, गुरुवारी मुलीची पेरंट मीटिंग होती. शेवटी बुधवार ऐवजी शुक्रवारच्या लिस्टला तिला घ्यायचं ठरलं.
गुरुवारी संध्याकाळी ती अॅडमिट झाली. शुक्रवारी दुपारी शेवटची केस, तिचं ऑपरेशन सुरु झालं. डॉ. धिंग्रा ऑपरेटिंग सर्जन होते. मी असिस्ट करत होतो. डॉ. धिंग्रा हे एक नामवंत सर्जन आहेत. त्यांनी हे ऑपरेशन आधी पन्नासेक वेळा केलेलं मीच पाहिलं आहे. सगळं सुरळीत चालू होतं आणि अगदी अचानक, ऑपरेशन टेबलवर ती बाई शॉकमधे गेली. शॉक म्हणजे शरीराच्या सिस्टीम्स अचानक बंद पडणं. हृदय काम करायचं थांबलं. पल्स ड्रॉप झाला. रक्तातलं इलेक्ट्रोलाईट्सचं प्रमाण बिघडलं. केसची पार्श्वभूमी पाहता असं होण्याचं काहीच कारण नव्हतं. डॉ. धिंग्रानी ताबडतोब पेशंटला रिसासिटेट करायला घेतलं. अनास्थेटिस्टने त्यांच्या बाजूने सारे प्रयत्न केले. पण सगळं व्यर्थ! कोणाचीही काहीही चूक नव्हती. सगळं बिनचूक असताना, काहीही कारणाशिवाय एक आयुष्य माझ्या डोळ्यासमोर संपून गेलं होतं ! मुलाचा क्लास बुडू नये, मुलीची पेरंट मीटिंग बुडू नये म्हणून हॉस्पिटललाही न जाणारी ती, अचानक सगळा खेळ उधळून निघून गेली होती. ऑपरेशन टेबलवर कधीतरी अचानक पेशंट असा शॉकमधे जाऊ शकतो हे मी पुस्तकात वाचलं होतं पण ते अनुभवताना त्याचं इतकं दुःख होईल हे पुस्तकात लिहिलं नव्हतं! डॉ. धिंग्राही नक्कीच अपसेट झाले होते. मला पेशंटला क्लोज करायला सांगून ते निघून गेले. ते बहुतेक डॉक्टर्स रूम मधे जाऊन एकटेच बसले असावेत. कोणीच कोणाशी काही बोलत नव्हतं. मी त्या बॉडीचं अॅबडोमेन (पोट) पुन्हा शिवलं. अंगावरचा हिरवा सर्जिकल गाऊन काढून बिनमधे टाकला आणि ऑपरेशन थीएटरचं दार उघडून बाहेर आलो.


समोरच तिची वाट पाहणारे ते तिघे मला दिसले. नवरा आणि दोन मुलं. तिचा नवरा मुलीला पुस्तकातून काहीतरी वाचून दाखवत होता. मुलगा मोबाईलवर खेळत होता. हे असं काही होईल याची त्यांना सुतराम कल्पना नव्हती. मला बघताच तो चटकन उठून माझ्याकडे आला. “झालं ऑपरेशन डॉक्टर? कधी बाहेर आणणार?” त्याने अधीर होऊन मला विचारलं. माझे शब्द थिजले होते. मी हॉस्पिटलमधे मृत्यू बघितले आहेत. पण हे असं अचानक बेसावध क्षणी मृत्यूने गाठलं की आपण हरलो असं वाटतं. त्याच्या प्रश्नाला मी काय उत्तर देणार होतो! हॉस्पिटलच्या प्रोटोकॉल प्रमाणे ऑपरेशन करणारा मेन सर्जन अश्या वाईट बातम्या पेशंट्सच्या नातेवाईकांना देतो. “डॉ. धिंग्रा तुमच्याशी येऊन बोलतील. तुम्ही मदतीसाठी कोणा नातेवाईकांना बोलावून घ्या” असं सांगून मी निघालो.


शौनकचा अनुभव संपला होता. ते सगळं पुन्हा आठवून त्याचा चेहरा दुःखाने पिळवटला होता. काही क्षण सगळे शांतच राहिले. शेवटी “सगळं किती uncertain आहे ना” असं म्हणून अवनीने शांततेचा भंग केला. दिगंत आणि मीराने मान हलवून तिच्या म्हणण्याला मूक अनुमोदन दिलं.


“मीरा तुला सांगायचाय का तुझा अनुभव?” दिगंतने मीराला विचारलं.


“मी वाचते पण माझी गोष्ट तुमच्या सारखी intense नाही. माझं आयुष्य एकदम साधं सरळ आहे. मी कधी थापाही मारत नव्हते त्यामुळे मला काही विशेष फरक पडला नाही. मीराने आधीच सांगून टाकलं.


“वाच तू. आपण आपले अनुभव शेअर करतोय. ही काही स्पर्धा नाहीये. आपल्या दैनंदिन आयुष्यात, लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत सत्याचं स्थान काय आहे हेच बघायचंय आपल्याला” दिगंतने तिला समजावलं.


अबोली फुलांची वही उघडून मीरा बोलू लागली.


“आज ताई आणि आमचं छोटूसं बाळ ताईच्या सासरी परत गेले. दोन आठवडे तिथे आणि मग अमेरिकेला ताईच्या घरी. गेले काही महिने ताईच्या आणि बाळाच्या घरी असण्याची इतकी सवय झालीये. आता घर खायला उठेल. आज दुपारीच प्रशांतजीजू अमेरिकेहून आले. संध्याकाळी ते घरी येणार म्हणून ताई किती खूष होती. नटून थटून तयार झाली होती. इतक्यात बाळ रडू लागलं म्हणून तिने त्याला पदराखाली घेतलं. नटून तयार झालेल्या तिने मला विचारलं, “कशी दिसतेय मी?”. “कळायच्याही आत मी उत्तर दिलं “खूप खूप गोड!” बाळंतपणाआधी ताई चवळीच्या शेंगेसारखी होती. आता तिचं वजन थोडं वाढलंय. बाळंतपणामुळे ती थकली आहे, चेहरा उतरला आहे, बाळामुळे जागरणं करून तिचे डोळे थकले आहेत. पण ती जेव्हा बाळाला जवळ घेते, त्याला आंजारते, गोंजारते, त्याचे लाड करते, तेव्हा ती पिकासोच्या चित्रासारखी मला वाटते. Flawless, परिपूर्ण! सौंदर्याची नेमकी व्याख्या काय? जे डोळ्याला आनंद देतं ते की जे मनाला आनंद देतं ते?


आम्हांला दोघींनाही तयार झाल्यावर एकमेकींना “कशी दिसतेय मी?” म्हणून विचारायची सवय आहे. समोर आरसा असताना, त्यात आपल्याला दिसत असतानाही समोरच्याला विचारण्याचा हा वेडेपणा कसला! आपल्याला माहीत असलेली गोष्टसुद्धा समोरच्याच्या तोंडून ऐकणं किती सुखाचं असतं ना!”


एवढं म्हणून मीराने शौनककडे एक चोरटा कटाक्ष टाकला, दिगंत आणि अवनीच्याही नजरेतून ते सुटलं नाही. मीरा पुढे वाचू लागली.
“काल शाळेच्या स्टाफ रूम मधे बसले होते. मिसेस गुप्ते आठवीचा गणिताचा तास घेऊन आल्या होत्या. त्या वर्गात एक मुलगा गणितात कच्चा आहे. त्या सारख्या अश्या मठ्ठ मुलांना शिकवून काय उपयोग असं म्हणत होत्या. मी थोडा वेळ ऐकून घेतलं. शेवटी त्यांनी मलाच विचारलं, “अश्या मठ्ठ मुलांना शिकवण्यात आपला वेळ घालवायचा म्हणजे आपला वेळ वायाच की नाही?” आधीच मला त्यांच्या सारखं त्या मुलाला मठ्ठ म्हणण्याचा राग येत होता. त्यात आपलं चॅलेंज. मग मी त्यांना म्हटलं, “मिसेस गुप्ते मला तुमचं म्हणणं बरोबर नाही वाटत. एखाद्याला गणितात गती नसेल म्हणून त्याला सरसकट मठ्ठ असं लेबल लावणं मला चुकीचं वाटतं. आणि अश्यांना शिकवण्यातच तर शिक्षकांचा कस लागतो ना. बाकीचे तर काय, एरवीही शिकणारच आहेत.” मिसेस गुप्तेंचं तोंड इतकं उतरलं. मग मलाच वाईट वाटलं. मी त्याना म्हणाले की तुम्हांलासुद्धा इतक्या वेळात इतका पोर्शन करून घ्यावा लागतो हे समजतं मला. तुम्ही प्रिन्सिपल मॅडमशी याबद्दल बोलत का नाही? त्या आणि इतर अश्या मुलांसाठी काही वेगळी पद्धत किंवा वेगळा काही वेळ काढणं शक्य आहे का ते एकदा प्रिन्सिपल मॅडमशबरोबर बोलून पहा. एव्हाना बाकी शिक्षकही आमच्या संभाषणात सहभागी झाले होते. काहींनी नाकं मुरडली पण काहींना मात्र पटलेलं दिसलं.”


“मीरा, Don’t mind पण हे उदाहरण सत्य असत्य पेक्षा assertiveness, आपलं म्हणणं ठामपणे मांडण्याबद्दल आहे, नाही का?” शौनकने शंका काढली.
“असेलही” गोंधळलेल्या मीराने उत्तर दिलं.
“नाही शौनक, आपलं मत समोरच्याच्या विरुद्ध असताना, हो ला हो न करता, आपलं मत मांडणं हेसुद्धा ‘आपल्या’ सत्याशी प्रामाणिक रहाणंच आहे” दिगंतने मीराची बाजू उचलून धरली.
“Totally!! And on that note, शौनक, आपल्या मनात वेगळं फीलिंग असताना, गरज पडल्यावरसुद्धा त्याचा उच्चार न करणं म्हणजे असत्य वागणं आहे.” अवनीने शौनकला सुनावलं.
“ओके, ओके. point taken. सॉरी मीरा. सगळे तुझीच बाजू घेणारे आहेत इथे! वाच तू पुढे” 

 

ताई गेल्यापासून आई बाबांनी पुन्हा माझ्यावर लक्ष फोकस केलं आहे. घरात माझ्या लग्नावरून पुन्हा वाद चालू झालेयत. मालती मावशीने तिच्या नात्यातला कुणीतरी अमेरिकेचा मुलगा पाहिलाय. ताईच्या घराच्या जवळच रहातो तो. त्याचा नंबरही तिने आईला दिलाय. आई माझ्या मागे लागलीये त्याच्याशी बोलायला. माझ्या मोबाईलवर दोन तीनदा त्याचा फोन येऊन गेला. मी उचललाच नाही. मावशीने ते आईला सांगितलं असावं. मी नाहीच म्हणत्येय म्हणून शेवटी चिडून आईने मला विचारलं, “तुला काय प्रेमबीम झालंय का कोणाशी? सगळ्यांनाच नाही म्हणत्येस ती!” मी काय सांगणार! मौनम् सर्वार्थ साधनम्. पुढचे तीन तास मी दाराला कडी लावून माझ्या खोलीतच बसून राहिले.”


आता तरी शौनक काही बोलेल या अपेक्षेने अवनी आणि दिगंतने त्याच्याकडे पाहिलं. नजरा नजर टाळण्यासाठी शौनक खाली मान घालून राहिला होता. एक विचित्र शांतता टेबलवर पसरली होती. इतक्यात नेमका मीराचा फोन वाजला. 

  

क्रमशः


डॉ. माधुरी ठाकुर


https://drmadhurithakur.blogspot.co.uk/

Monday 7 August 2017

चॅलेंज भाग ३

दिगंत म्हणाला, “who’s next?”. शौनकने मीरा आणि अवनीकडे बघितलं. त्यांपैकी कोणीच पुढे होत नाहीये असं पाहिल्यावर तो म्हणाला, “ठीक आहे, मी वाचतो,” आणि त्याने वाचायला सुरुवात केली.
“लिहिणंबिहिणं मला कठीणच आहे. दिगंत, तुम्हा फिलॉसॉफर लोकांना बरं जमतं असं लिहिणं. आम्ही डॉक्टर म्हणजे three times a day लासुद्धा TDS लिहिणारे.... बघूया कसं जमतंय.
बुधावारचं ओ. टी. (ऑपरेशन थीएटर) चालू होतं. हर्नियाची mesh लावताना मधेच श्रीखंडे सरांनी मला विचारलं, “काय मग, या महिन्यात काय?”. मी या महिन्यातल्या केसेसची लिस्ट सांगायला सुरुवात केली. तर म्हणाले, “ते नाही रे, तुमचं चॅलेंज काय या महिन्याचं?” मी उडालोच! म्हटलं यांना कुठून कळलं! गेल्या महिन्यात मी सारखा स्टेप्स किती झाल्या म्हणून मोबाईल बघत होतो. त्यामुळे दोघा चौघांना आपल्या चॅलेंजबद्दल कळलं. मग नर्सेसच्या एका ग्रूपनेसुद्धा ते सुरू केलं. अशी त्याची थोडी पब्लिसिटी झाली. सरांच्यांही कानावर गेलं. सत्याच्या चॅलेंजमुळे आता थाप मारायचीही सोय नाही!! मग सांगून टाकलं, ‘महिनाभर सतत खरं बोलण्याचं चॅलेंज आहे’. “मग..... any difficulties so far?” सरांनी पुढचा गुगली टाकला. घ्या !! म्हणजे मला खरं बोलताना काय प्रॉब्लेम येतोय हे मी सर, अनास्थेटिस्ट, मेडिकल स्टूडंट्स, नर्सेस, वॉर्डबॉय्ज अश्या सगळ्यांसमोर सांगू!! त्यापेक्षा मी खरंच नाही का बोलणार ! नशीब पेशंटला G A (जनरल अनास्थेशिया – पूर्ण भूल) दिला होता. तो शुद्धीत असता तर ‘हा डॉक्टर नेहेमी खोटं बोलतो की काय’ म्हणून टेन्शन आलं असतं बिचार्याला... सरांच्या प्रश्नाला उत्तर द्यावंच लागणार होतं म्हणून मी नाईलाजाने म्हटलं “हो, येतात थोडेफार प्रॉब्लेम्स.” मेडिकल स्टूडंट्सना समोरच्या ऑपरेशनपेक्षा जास्त इंटरेस्ट माझ्या खरं बोलताना येणार्या प्रॉब्लेम्समधे होता हे त्यांच्या चेहर्यावर मला स्पष्ट दिसत होतं.  
“प्रत्येक ऑपरेशनच्या आधी पेशंट आणि त्यांचे नातेवाईक कन्सेंट फॉर्मवर सही तर करतात पण विचारतात की काही धोका नाहीये ना? adverse effect होणार नाही ना? आता काय सांगायचं त्यांना! adverse effect कशाचा नाहीये सर! डोकं दुखतं म्हणून अॅस्प्रीन घेतली तरी रक्तस्रावाचा धोका आहे. पण होण्याची शक्यता किती... पण प्रत्येक पेशंटला मी एवढं सगळं समजावत बसलो तर पेशंट्सची एवढी मोठी रांग पूर्ण कशी होणार?” एपिडर्मिस (त्वचेचा आतला layer) शिवत शिवत मी म्हटलं. मला वाटलं आता तरी विषय संपेल, पण नाही... सरांनी मला पुढे विचारलं, “मग तुला काय वाटतं शौनक, काय करायला पाहिजे?”
“काय माहीत” म्हणून मी खांदे उडवले, मग म्हटलं, “May be, गव्हर्नमेंटने काहीतरी केलं पाहिजे. जास्त डॉक्टर्स असले पाहिजेत. पेशंट्स सुशिक्षित असले पाहिजेत”
“ते तर झालंच, पण आता हा आपला पेशंट सतीश कुमार, याच्या बद्दल आपलं उद्दिष्ट काय आहे सांग?”
“याचा इन्ग्वाइनल हर्निया आपल्याला फिक्स करायचाय.” मी लगेच उत्तर दिलं.
“नो....नो.... शौनक, आपलं उद्दिष्ट आहे की या सतीश कुमारने परत ठणठणीत व्हावं, या हर्नियासाठी किंवा यातून उद्भवलेल्या अजून कशासाठी परत हॉस्पिटलला यायची वेळ याच्यावर येऊ नये. आपण सगळे ‘रोगा’चा इलाज करत असतो. आपल्याला ‘रोग्या’चा इलाज करायचाय. शरीराचा इलाज आपण करतोच. पण त्याच्या मनाचा इलाज करण्यासाठी, मनाला ताकद द्यायला हवी. मनाला ताकद कशी येईल, जर डॉक्टरने जुजबी का होईना पण तेव्हढी खरीखुरी माहिती त्याला दिली, त्याला समजावलं आणि ट्रीटमेंटचा फायदा पटवून दिला तर त्याच ट्रीटमेंटला पेशंटचं शरीर जास्त चांगलं रिस्पॉंन्ड करतं असं रिसर्च दाखवतो.”
“अगदी बरोबर आहे, म्हटलंच आहे, प्रज्ञापराधात् रोगः मग जर रोग नेहमी सुरू मनाच्या, प्रज्ञेच्या अपराधाने होतो तर इलाजामध्येसुद्धा मनाचा विचार करायलाच हवा ना.” आमच्या अनास्थेटिस्ट पंडित मॅडमसुद्धा आता आमच्या संभाषणात सहभागी झाल्या. नंतर त्या आणि श्रीखंडे सर Hollistic approach of health (आरोग्याचा समग्र दृष्टीकोन) वगैरे काय काय बोलू लागले. मी झाली तेव्हढी शाळा पुरे म्हणून दिगंतचा मौनमवाला पवित्रा घेतला आणि चुपचाप समोरच्या पेशंटवर फोकस केलं. सांगायची गोष्ट ही की सध्या पेशंट्सना ऑपरेशनच्या आधी थोडी जास्त माहिती देणं सुरू केलाय. बघूया फरक पडतोय का.
मी नेहेमीप्रमाणे हॉस्टेलवरून घरी फोन केला. आईने विचारलं “या रविवारी तू मोकळा आहेस का?” असा प्रश्न आला की मी सावध होतो. आणि नेहमी बघून सांगतो, असं उत्तर देतो किंवा सरळ आधीच ऑन कॉल आहे म्हणून ठोकून देतो. पण आता ते शक्य नव्हतं. मी दबकत “हो आहे” म्हटलं. “अरे चारूच्या मुलीचं, प्रीतीचं लग्नं आहे. तिने खूप आग्रहाने आपल्याला सगळ्यांना बोलावलंय. तू ओळखतोस सुद्धा प्रीतीला.” “आई मला खूप कंटाळा येतो या असल्या फॉरमॅलिटीजचा. दोन दिवस तर मी येतो घरी. मला नको ना जबरदस्ती करू तिकडे यायची”. आईला बहुतेक वाईट वाटलं असावं, पण ती लगेच म्हणाली, “बरं राहूदे. मी आणि बाबा जाऊन येऊ.” दुसर्या दिवशी मला बाबांचा फोन, “तुम्ही फार मोठे झाला आहात आता”
“काय झालं बाबा?” मी विचारलं.
“जेव्हा जेव्हा आम्हांला तुला कुठे घेऊन जायचं असतं, तेव्हा तू ऑन कॉल असतोस (!) मग आम्ही काही म्हणूच शकत नाही. पण आता तर मोकळा आहेस तरीही तू यायला बघत नाहीस. कारण काय तर कंटाळा येतो. तुझी आई, तुला वाढवताना तिला कंटाळा नसेल आला कधी? पण काही कमी केलं तिने कधी? तुझा अभ्यास चालायचा तेव्हा पाण्यापासून सगळं हातात आणून द्यायची, अजूनही देते. तू वाचत जागणार आणि ती तुला चहा करून द्यायला जागणार. तू तिकडे परीक्षा देणार आणि ही इकडे अथर्वशीर्षाची आवर्तनं करत बसणार. बरं करते तेही सगळं शांतपणे. कधी त्याची टिमकी वाजवून तुला सांगणार नाही. पण तुला समजायला नको आता? तिच्या आनंदासाठी एक लहानशी गोष्ट नाही करू शकत! बरं वाटेल तिला तिचा मुलगा तिच्याबरोबर लग्नाला आला तर. कंटाळा म्हणे....” माझी बोलती बंद. आपण सत्य बोलतो तेव्हा ते रिबाउंड येऊन आपल्याला स्वतःला सुद्धा लागू शकतं हे माहीत नव्हतं. बाबांच्या बोलण्यात पॉइंट होता. त्यामुळे मी शनिवारी घरी गेलो. आणि रविवारी लग्नालासुद्धा गेलो. दोन तासांचीच तर गोष्ट होती. आईला खूप बरं वाटलं आणि म्हणून मलासुद्धा !
शनिवारी मी घरी गेलो तेव्हा अजून एक झोल झाला. मी Game of Thrones चे भाग download करून ठेवले होते. दुपारी जेवणं झाल्यावर मी माझ्या खोलीत कॉम्पुटरवर ते बघत बसलो होतो. नेमका एक ऑकवर्ड शॉट लागायला आणि बाबा खोलीत यायला एकच गाठ. घाईत ती स्क्रीन मिनीमाईझही होईना.
“काय हे दिवसा ढवळ्या..... आई घरात आहे एव्हढी तरी लाज बाळगा जरा....” बाबांनी माझा पार उद्धारच केला.
“बाबा, असं काही नाहीये, स्टोरीलाइनसुद्धा खूप चांगली आहे त्याची.” माझा सफाई देण्याचा असफल प्रयत्न.
“स्टोरीलाईन ‘सुद्धा’ !!! हे केस आहेत ना माझे” बाबांनी त्यांचे डोक्यावरचे पांढरे केस चिमटीत धरून मला दाखवले, आणि म्हणाले, “हे उन्हात पांढरे नाही झालेयत. स्टोरीलाईन सांगतायत”
बाबा तणतणत खोलीतून निघून गेले. ते मला अहो जाहो करू लागले म्हणजे त्यांचा फ्यूज उडलाय समजायचं. स्टोरीलाइनसुद्धा चांगली आहे हे अर्धसत्य झालं का?”
शौनकच्या या प्रश्नाला मीराने “हद्द आहे” म्हणून बायकांच्या ठेवणीतल्या eyeroll ने उत्तर दिलं. अवनी हसू लागली. दिगंत म्हणाला, “बॅट्समनला बेनिफिट ऑफ डाउट दिलं जातं तसं शौनकलासुद्धा देऊया. पुढे वाच”
शौनक पुढे वाचू लागला.
“ही झाली दुपारची गोष्ट. संध्याकाळी आई खोलीत आली. मी पुस्तक वाचत बसलो होतो. तिने विचारलं, “शौनक मी पार्लेश्वरला जातेय, येतोस?” आईला बाईकवर यायचं नसतं. जाते तर रिक्षानेच. मग मी कशाला पाहिजे!”
“गाढवा, काकूना तुझ्याबरोबर वेळ घालवायचा असतो. तू घरी जातोस दोन दिवस, त्यात अर्धा वेळ तुझ्या खोलीत, काय करणार त्या!” दिगंतने शौनकला खडसावलं.
“ओके ओके, chill... मी गेलोच शेवटी. मी कां कू करणार इतक्यात बाबा म्हणतात कसे, “त्याला कशाला विचारतेस सुधा. तो बिझी आहे. त्याची सीरिअल बघायची असेल”
“कोणती रे?” आईने कुतूहलाने विचारलं.
“काही नाही गं, चल जाऊन येऊ आपण” म्हणून मी उठलो आणि आईबरोबर गेलो. पार्लेश्वरच्या मंदिरात पोहोचलो. दर्शन घेतलं. नमस्कार करताना मी आईकडे पाहिलं. एखाद्या जवळच्या कुणाला भेटल्यावर हळवं व्हावं तशी ती त्या मूर्तीकडे पहात होती. खरं तर माझ्यासाठी ती ‘गणपतीची मूर्ती’ होती. तिच्यासाठी तो ‘गणपती’ होता. मला आठवलं मेडीकलच्या पहिल्या वर्षी दाभोळकर सर सांगायचे, डिसेक्शनच्या आधी वाचून या, The eyes do not see what mind doesn’t know. भक्तीमधेही तोच प्रकार असावा.
त्यानंतर आम्ही बाजूला शंकराच्या मंदिरात गेलो. तिथे थोडे बसलो. मग पुन्हा गणपती मंदिरात आलो तर इथे कुणा जोशीबुवांचं कीर्तन चालू झालं होतं. “बसूया रे पाच मिनिटं” म्हणून आई जाऊन बसली. मला ऑप्शनच नव्हता. मग मीसुद्धा बसलो. ‘सत्य, प्रेम आणि आनंद हेच परमेश्वराचे मूळ नियम आहेत अश्या अर्थाचं काहीतरी बुवा सांगत होते. ‘अगदी आजच्या काळातसुद्धा लहान गोष्टींपासून ते मोठ्या घडामोडींपर्यंत मानवाला खर्या प्रगतीसाठी सत्याचाच आधार असतो. असत्य निरीक्षणांवर आधारलेले शोध कधी मानवाचा खरा विकास करू शकतील का?’ इथपर्यंत मला समजलं. पुढे ते सांगू लागले, ‘सत्य म्हणजेच ईश्वर, प्रेम म्हणजेच ईश्वर, आनंद म्हणजेच ईश्वर’ आता मला सगळं बंपर जायला लागलं. मग मी आईला “चल ना जाऊया” म्हणून कुजबुजत सांगितलं. “चल, चल, बराच वेळ झाला, तुला उशीर झाला का रे?” बाहेर येता येता आईने मला विचारलं. “उशीर नाही गं, पण मला काही समजत नव्हतं” मी खरं तेच सांगितलं. आई खळखळून हसली. माझ्या बोलण्याने ती अशी हसते तेव्हा छान वाटतं.” शौनकची ही बाजू सहसा समोर येतच नसे. तो वाचताना मीरा एकटक त्याच्या चेहऱ्याकडे पहात होती. दिगंत आणि अवनी शौनकचं वाचन ऐकत होतेच पण मीराची काय प्रतिक्रिया आहे ते बघायला ते अधून मधून तिचा चेहराही न्याहाळत होते.
“नाही नाही म्हणत बरंच लिहिलयस की रे” दिगंत शौनकला म्हणाला.
“आता शेवटचा भाग आहे” शौनक म्हणाला “हा काही व्यक्तिशः माझा अनुभव नाही पण सत्याच्या विषयाला धरून आहे म्हणून.... आमच्या वॉर्डला काही कॅन्सर पेशंट्सही असतात. Oncologist (कॅन्सरतज्ञ) त्यांची ट्रीटमेंट करत असतात. त्यांत हा पन्नाशीचा माणूस आहे. आतड्यांचा कॅन्सर आहे. शरीरभर पसरलेला आहे. तो खूप विव्हळत असतो. त्याची बायको दिवसभर त्याच्या सोबत असते. त्याला धीर देत असते, की “डॉक्टर म्हणालेयत आता बरं वाटेल. दुखणं कमी होईल” कसं होईल दुखणं कमी!! मेटामॉर्फिन पर्यंत सगळं देऊन झालंय. He is beyond that. ती कसल्या कसल्या पोथ्या वाचत असते. त्याला दिलासा देत असते. काहीतरी चमत्कार होईल अशी आशा तिला वाटते की सगळं माहीत असूनही ती हे करते आहे? माझ्याकडे कुठलंच उत्तर नाही. इतकी वर्षं इतके रोग, इतके रोगी, आणि इतके मृत्यू पाहून माझं मन आता बधीर झालंय. पण नव्यानेच वॉर्डला यायला लागलेले एकोणीस, वीस वर्षांचे मेडिकल स्टूडंट्स मृत्यूला असं आजूबाजूला रेंगाळताना बघून दडपून जातात. राऊंड्स घेताना अश्याच एका मुलीने मला विचारलं, “अजून किती दिवस सर...... कित्ती कळवळतोय तो.” मी म्हटलं, “The truth is, I don’t know!” त्यावर अगदी अनायास दुसर्या एका स्टूडंटच्या तोंडून आलं, “They say, Life is a beautiful lie but death is the painful truth”
शौनकचं वाचून संपलं. “तुझी ही सिरीयस बाजू बघितली नव्हती शौनक” अवनी म्हणाली. “तेच, तूसुद्धा फिलॉसॉफर झालास की रे” दिगंतने हसून म्हटलं. अभिप्रायाच्या अपेक्षेने शौनकने मीराकडे पाहिलं पण ती तिच्या कॉफीच्या कपच्या आतच पहात होती. मध्येच नजर उचलून तिने फक्त शौनककडे पाहिलं पण बोलली काहीच नाही. ‘हिचं काहीतरी बिनसलंय नक्कीच’ शौनक आणि दिगंत दोघांच्याही मनात एकाच वेळेस एकच विचार आला.  
“आता तू वाचतेस का, मीरा?” दिगंतने मीराला विचारलं.

क्रमशः
डॉ. माधुरी ठाकुर
https://drmadhurithakur.blogspot.co.uk/                                                                                  
   

Wednesday 2 August 2017

चॅलेंज भाग २



पुन्हा महिन्याचा शेवटचा शनिवार. सहाला अजून पाच मिनिटं होती. पण शौनक आणि दिगंत वेळेआधीच पोहोचले होते. “कधी वेळेवर येणार रे या मुली?” शौनकने म्हटलं. “अजून सहा वाजायचे आहेत. त्या बघ त्या दोघी रिक्षातून उतरतायत.” दिगंतने कॅफेच्या मोठ्या काचेच्या खिडकीकडे हात करत शौनकला दाखवलं. अवनी आणि मीरा रस्त्याच्या दुसर्या बाजूला रिक्षातून उतरत होत्या. बोलत बोलत रस्ता ओलांडून दोघी कॅफेच्या दिशेने चालत होत्या. त्यांचे चेहरे बघून त्या काहीतरी महत्त्वाचं बोलतायत असं वाटत होतं. मीराचा चेहरा तर फारच ओढलेला दिसत होता. त्या दोघी कॅफेच्या आत शिरल्या. हे दोघे गेली दोन मिनिटं त्यांना बघत होते ह्याचा त्यांना पत्ताच नव्हता. टेबलपाशी पोहोचेपर्यंत दोघींचे चेहरे पुन्हा नॉर्मल दिसत होते.

“मीरा, अवनी, all ok?” त्या बसायाच्याही आधी दिगंतने  विचारलं. “का, काय झालं?” अवनीने उलट त्यालाच विचारलं. “नाही.... तुम्ही दोघी जरा स्ट्रेस्ड दिसताय” दिगंत म्हणाला. “च् जाऊदेना. तुम्ही ऑर्डर नाही केली अजून?” असं म्हणून मीराने विषय बदलला. दिगंत आणि शौनक दोघांनाही ते जाणवलं. बसून स्थिर स्थावर झाल्यावर मीराने दिगंतला विचारलं, “दिगंत, आजोबांना जाऊन किती दिवस झाले? घरी सगळे ठीक आहेत ना?” “पंधरा दिवस झाले. हो, ठीक आहेत सगळे. वाईट वाटतंच पण त्यांचं वय झालंच होतं.” त्याचं बोलणं होईपर्यंत चौघांचे कप टेबलवर आले.

कॉफीचा घोट घेत दिगंतने त्याची डायरी बाहेर काढली. मी दिलेलं चॅलेंज ‘ऋतम् वच्मि, सत्यम् वच्मि’

“झालं सुरू” शौनकने निषेधाने मान हलवत म्हटलं.

“अरे म्हणजे मी खरं तेच बोलतो, तर सत्य बोलण्याचं चॅलेंज. माझा अनुभव मी वाचून दाखवतो.” नकळत उरलेले तिघे टेबलवर पुढे सरकले आणि लक्षपूर्वक ऐकू लागले. “ज्या दिवशी खर्या खोट्याचं द्वंद्व व्हायचे प्रसंग झाले त्याच दिवसांच्या नोंदी केल्या आहेत.”

“हो रे, वाच ना आता” शौनकला जराही धीर म्हणून नव्हता.

दिवसाची सुरुवात बेकार झाली. मी आजोबांकडे हॉस्पिटलमधे चाललो होतो. तर वाटेत माझा जुना बडोद्याचा मित्र, शशी भेटला. भेटला कसला, आडवा आला म्हणायला पाहिजे. आम्ही सगळे त्याला टाळतो. एक नम्बरचा बोलबच्चन आहे. सगळ्यांना टोप्या लावत फिरतो. दर वेळी मला भेटला की दोन चार हजारांचा चुना लावतो. काही ना काही कारणं सांगून पैसे घेतो ते कधीच परत देत नाही. शाळेत चांगला होता. स्वभावानेही तसा बरा आहे पण दर वेळी काय थापा मारायच्या आणि पैसे मागायचे. तर हा भेटला आणि मला विचारलं कुठे निघालायस? मी युनिव्हर्सिटी सांगितलं असतं तर सटकता आलं असतं पण सत्यवचन म्हणून मी म्हटलं ‘हॉस्पिटल’. तर हा पण माझ्याबरोबर आला. एक तास बसला. आजोबांशीसुद्धा गप्पा मारल्या. त्याही काही ओळख पाळख नसताना! मग चहा प्यायला खाली गेलो तशी आली गाडी रुळावर. यावेळी तर कहरच. डायरेक्ट पंचवीस हजार! मी म्हटलं ‘अरे कशाला’ तर म्हणे कोणीतरी दूरची मावशी आत्ता फार अडचणीत आहे. माझ्यासाठी मागितले नसते (!!) पण तिच्यासाठी मागतोय. दहा दिवसांत परत देईन. हद्द म्हणजे वर सांगतो, आपल्या बाकी कोणा मित्रांकडे याबद्दल जरापण वाच्यता करू नकोस, फार खाजगी गोष्ट आहे. मी असेही एवढे पैसे दिले नसतेच. पण एरवी मी काहीतरी सबब सांगितली असती. या वेळी मात्र मी सरळ खरं तेच सांगितलं की “शशी, कोणाला बोलू नको काय, तू हे असे पैसे मागत टोप्या लावतोस हे आम्हांला सर्वांना चांगलं माहितीये आता. आज काय हे, उद्या काय ते.... दहा दिवसांत असं कुठलं झाड हलवून पैसे पाडणार आहेस आणि मला परत आणून देणार आहेस! आत्तापर्यंत दोनचार दोनचार करत बारा झाले. कधी दिलेयस परत? मी भिडस्त आहे, मूर्ख नाही. तेव्हा आता पुरे” मी असं म्हटल्यावर तो चिडून “मला वाटलं तू माझा मित्र आहेस. पण हीच किंमत केलीस मैत्रीची. चार दिवसांत तुझे बारा हजार तुझ्या तोंडावर नाही मारले तर नाव बदलेन” असं मलाच सुनावून तरातरा निघून गेला. चार दिवस काय, एक महिना झाला तरी अर्थातच त्याने मला एक पैसाही परत केला नाहीये. मी विचार करत होतो की सबबी न देता खरं बोललो तर मैत्री पूर्ण तुटलीच. मग वाटलं मैत्री खरोखरीच उरली तरी होती का? मी त्याला टाळत होतो, तो मैत्रीच्या आठवणींचा फायदा घेत होता. मैत्री तर केव्हाच संपली होती. आता फक्त दिखावा संपला.

काल एका मध्यस्थांचा फोन आला. एक स्थळ बघण्याचा कार्यक्रम ठरला होता पण त्या मुलीचं आधीच लग्न ठरल्यामुळे तो कॅन्सल झाला. मला तर मनातून आनंदच झाला. आईने माझा चेहरा बघितला आणि म्हणाली “तुला तर बरंच वाटलं असेल? दिसतंय चेहर्यावर” तेव्हा मी तिला म्हटलं “आई, तुमचा आग्रह आहे म्हणून मी होय म्हटलंय पण खरं आहे की मला काही अशी घाई नाहीये लग्नाची.” यानंतर मग मी एक तास आईचं ‘सगळ्या गोष्टी कश्या वेळच्या वेळी झाल्या पाहिजेत. ज्यांची ट्रेन सुटली ते कसे स्टेशनवरच मागे राहिले’ अश्या अर्थाचं एक लेक्चर पुन्हा एकदा ऐकलं.

गेला महिनाभर आजोबा गावाहून आमच्याकडे आले आहेत. त्यांची तब्बेत फारच खालावली आहे. गेल्या आठवड्यात त्यांना हॉस्पिटलला अॅडमिट केलं. दोन अॅटॅक आधीच येऊन गेलेत. आता त्यांचं हृदय पंधरा टक्केच काम करतय असं डॉक्टरांनी सांगितलय. मला त्यांना असं बघवत नाही. ते काही नेहमी आमच्या सोबत रहात नव्हते. आईचे आई वडील अगदी बाजूलाच रहात असल्याने आमचं कधी अडत नव्हतं आणि त्यांनाही कदाचित थोडं पाहुण्यासारखं, उपरं वाटत असावं. पण दर वर्षी एक दोन महिने यायचे तेव्हा आमचं चांगलं जमायचं. तर त्या रात्री मी त्यांच्याबरोबर थांबणार होतो. संध्याकाळची मोठ्या डॉक्टरांची फेरी झाली. नंतर त्यांनी मला त्यांच्या केबिनमध्ये बोलावलं आणि सांगितलं की त्यांना उद्या घरी घेऊन जा, फार फार तर आठवडा उरलाय त्यांचा. त्यांना घरी शांतीने राहूदेत. मी जड मनाने पुन्हा आजोबांच्या खोलीत आलो. ते माझी वाटच बघत होते. त्यांनी मला जवळ बोलावलं. बाजूला बसायची खूण केली. “काही दुखतंय का?” मी काळजीने विचारलं. तर ते म्हणाले, “दुखण्याचं काही नाही रे. तुला एक सांगायचंय. माझ्या मनावर खूप ओझं आहे. आता सांगितल्याशिवाय गत्यंतरच नाही.” एक दीर्घ श्वास घेऊन ते बोलू लागले. “तुला माहितीये ना मी आधी मुंबईला नोकरी करत होतो. पण तेव्हा तुम्ही बडोद्याला होतात. नंतर तुझी आजी गेली. दोन वर्षानी निवृत्त झाल्यावर मी गावी गेलो. आठवतं का?”

“हो, तुम्ही नेहेमी बागाईतीचं काम बघत होता ना?”

“हो, ही गेल्यावर मला फार एकटेपण आलं, निराश वाटू लागलं होतं. तुम्ही बडोद्याला, अल्का अमेरिकेत. मग मी मन रमवायला म्हणून गावी आंबे, फणस, चिक्कू लावले. त्यांच्या देखभालीत माझा वेळ जाऊ लागला. तुझी चुलत आजी, माझ्या धाकट्या भावाची गजाननाची बायको, शांतला, मला मदत करू लागली. हळू हळू आम्हा दोघांना एकमेकांची सोबत होऊ लागली, सवय होऊ लागली. हिच्या जाण्याने जी पोकळी झाली होती ती शांतलाने भरून काढली. त्याच दरम्यान मला पहिला अॅटॅक आला. तुम्ही नेमके अल्काच्या बाळंतपणासाठी अमेरिकेला गेला होतात. शांतलाने त्यावेळी मला खूप सांभाळलं. गजानन खूप लवकर गेला. तिच्या पोटी मूलबाळही नाही. ती तर माझ्याहूनही एकटी होती. आयुष्याच्या संध्याकाळी आम्ही दोघांनी एकमेकांमधे सोबत शोधली. तिची काहीच अपेक्षा नव्हती. पण मला असं बिननावाचं नातं नको होतं. देवघरासमोर तिला उभं करून मी तिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं. काहीही सोपस्कार नाहीत, कागदपत्र नाहीत पण मी तिच्याशी लग्न केलं. मला पश्चात्ताप नाहीये त्याचा. गेली अठरा वर्षं आम्ही एकमेकांना साथ दिली. तारुण्यात जशी साथ हवी असते तशीच या म्हातारपणातसुद्धा अश्या सोबत्याची गरज असतेच. कुणालातरी आपण हवे आहोत, आपली कमी त्यांना जाणवेल ही जाणीव मनुष्याला रोज जागं करते, आशा देते. शांतलाने मला ती जगण्याची इच्छा दिली. आधी वाटलं की तुझ्या बाबाला सांगावं पण कोण काय म्हणेल, अल्काच्या सासरचे, तुझ्या आजोळचे सगळे काय म्हणतील असे विचार करून हिम्मतच झाली नाही. तुमचे कोणाचे गावाशी तसे काही संबध राहिलेच नव्हते. आणि शांतलालासुद्धा फार संकोच वाटत होता. मग सांगणं टाळलं ते कायमचंच. ती काही प्रॉपर्टी वगैरे मागणार नाही. पण मला तिची सोय करून जायला हवं. माझं चेकबुक घेऊन येशील उद्या? अजून एक होतं, माझे फार दिवस राहिले नाहीयेत हे कळतंय मला. जाण्याआधी तिला शेवटचं भेटायची इच्छा आहे. तिचीसुद्धा असणारच. तिची मुंबईला यायची सोय करशील? पण तुझ्या बाबाच्या नकळत हे  कसं होणार? ती मुंबईत कुठे रहाणार?”

त्यांचं ते बोलणं ऐकून मला एवढा धक्का बसला होता की मी काही न बोलता तसाच आ वासून राहिलो होतो. “दिगंत.....” आजोबांनी मला पुन्हा हाक मारली.

“म्हणजे काकीआजी तुमची......” मी अडखळत म्हटलं.

“हो.... बायको आहे ती माझी” ते बोलताना माझ्या नजरेला नजरसुद्धा देत नव्हते. शेवटच्या दिवसांत आजोबा मला असं काही सांगतील असं मला कधी स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. शेवटी मी त्या धक्क्यातून सावरलो. त्यांचा तो हडकुळा झालेला हात मी हातात घेतला आणि म्हटलं, “आजोबा हे सगळं आधी का नाही सांगितलत. तुम्ही आम्हांला हवेच आहात. अगदी काकीआजीसकट.”

सकाळी घरी परत आलो तेव्हाही माझ्या मनात तेच विचार होते. आजोबांनी बाबांना काही न सांगायला म्हटलं होतं. सहाजिकच त्यांच्या मनात hesitation असणार. पण मी बाबांना पूर्ण ओळखतो. मुन्गीलासुद्धा न दुखवणार्यांपैकी आहेत ते. आजोबांच्या छातीवरचं हे मणभराचं ओझं हलकं व्ह्यायला हवं असं मला वाटलं. मी बाबांना सांगायचं ठरवलं. आणि खरोखरीच हे चॅलेंज आहे म्हणून नाही तर because I felt that was the right thing to do!

नंतर बाबा आणि मी दोघेही आजोबांना घरी घेऊन जायला हॉस्पिटलमधे आलो. बाबा आजोबांच्या बाजूला बसले. आजोबांचा हात त्यांनी हातात घेतला आणि म्हणाले, “बाबा हीच परीक्षा केलीत माझी? आधी सांगितलं असतंत तर केव्हाच काकीला इथे बोलावून घेतलं असतं. गाडी पाठवलीये तिला घेऊन यायला. मीच गेलो असतो पण तुम्हाला असं सोडून कसा जाऊ! हा घ्या चेक, तुमच्या एकटेपणात तिने तुम्हांला सोबत दिलीये. तिची सगळी काळजी मी घेईन. अगदी नक्की घेईन.” दुसर्या दिवशी काकीआजी आली. त्यानंतर एका आठवड्याने आजोबांनी कायमचे डोळे मिटले. पण ते जाताना खूप समाधानाने गेले. त्यांना तसं समाधानी पाहून माझे बाबा, ते मुलगा आणि मी बाबा असल्यासारखे माझ्या गळ्यात पडून रडत होते. रूमीने किती बरोबर सांगितलय ‘That which is false troubles the heart, but the truth brings joyous tranquillity’*”

दिगन्तचं वाचून झालं. क्षणभर कोणालाच काही सुचेना. सगळे गप्प! शेवटी अवनी उद्गारली, “so proud of you Digant!!” बाजूला बसलेल्या मीराने काही न बोलता हलकेच त्याच्या हातावर थोपटलं. शौनकनेही त्याच्या पाठीवर थाप दिली.

“तर हा झाला माझा अनुभव,” दिगंत म्हणाला, “who’s next?”

क्रमशः

डॉ. माधुरी ठाकुर

https://drmadhurithakur.blogspot.co.uk/




* रूमी नावाच्या प्रसिद्ध तत्त्ववेत्त्याचा quote – मनाला खरी शांतता हे सत्यानेच मिळते.